मुलीच्या आत्महत्येचा सूड उगवण्यासाठीच सांगलीच्या बाप-लेकांनी शिरोळच्या पोलिसपुत्राचा ‘दृष्यम’ सिनेमा स्टाइलने खून केल्याचे स्पष्ट झाले आहे. ‘दृष्यम’ हा हिंदी सिनेमा पाहून कोणताही पुरावा मागे राहू नये, या पद्धतीने शाहरुख बोजगर याचा खून करण्यात आला. चित्रपट पाहून चित्रपटाला साजेशा या थरारनाट्याचा निपाणी व कोल्हापूर पोलिसांनी अत्यंत शिताफीने छडा लावला.
याप्रकरणी निपाणी ग्रामीण पोलिस स्टेशनमध्ये वडील रवींद्र जीवन नगरकर, मुलगा रोहित व सुमित रवींद्र नगरकर व नातेवाईक आकाश जफान मंच्छर (सर्वजण रा. कुपवाड, सांगली) या चौघांना ताब्यात घेतले आहे. निपाणी सीपीआय किशोर भरणी व ग्रामीणचे फौजदार निंगनगौडा पाटील यांनी पत्रकार परिषदेत या सूडनाट्याचा उलगडा केला.
सांगलीतील बांधकाम व्यावसायिक रवींद्र जीवन नगरकर यांना प्रिया, रोहित व सुमित ही तीन अपत्ये. २००७ मध्ये प्रियाचा पुण्यातील एका युवकाशी विवाह झाला होता. दोन वर्षांत प्रियाला एक मुलगी झाली. मात्र, पतीशी न पटल्याने ती २००९ मध्ये सांगली येथे वडिलांकडे राहण्यासाठी आली होती. २०१४ - १५ मध्ये प्रियाने सांगलीतील पतंगराव कदम भारती विद्यापीठ येथे बीएससी पहिल्या वर्षासाठी प्रवेश घेतला. बीएससीच्या तिसऱ्या वर्षामध्ये शाहरुख शब्बीर बोजगर याने प्रवेश घेतल्यानंतर त्याच्याशी तिची ओळख झाली. काही दिवसांतच प्रिया आणि शाहरुख यांचे प्रेमसंबंध जुळले. या दोघांमध्ये अनेकवेळा अनैतिक संबंधही घडून आले. दोघांच्या या प्रेमप्रकरणाची कुणकुण प्रियाच्या भावांना लागल्यानंतर प्रेमसंबंध तोडण्यास सांगितले. मात्र प्रिया व शाहरुख यांच्यातील संबंध कायम राहिले. अखेर भावांनी शाहरुखला गाठून धमकीही दिली. त्यावेळी प्रियाचे लग्न झाले असून तिला एक मुलगी असल्याचे सांगितले. प्रियाने लग्न आणि मुलाची बातमी लपवून ठेवल्याने लग्नाबद्दल कळताच त्याला धक्का बसला. प्रिया आणि शाहरुख लग्न करण्याचा विचारात असताना ही माहिती कळल्याने शाहरुख आणि प्रियामध्ये वाद सुरू झाला. शाहरुखने प्रियाला लग्नासाठी नकार दिल्याने नैराश्यातूनच प्रियाने २८ डिसेंबर, २०१६ रोजी राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. शाहरुखमुळेच तिने आत्महत्या केली, असा समज करून घेऊन वडील रवींद्र, रोहित व सुमित पेटून उठले. लहान सुमितच या थरारनाट्याचा मास्टरमाईंड बनला. शाहरुख हा एका पोलिस कॉन्स्टेबलचा मुलगा आहे. व्यायामाची सवय असणारा पिळदार शरीरयष्टीचा आणि चपळ आहे. त्यामुळे शाहरुखचा गेम असा सहजासहजी करता येणार नाही. याचा विचार करून बाप लेकांनी चार महिने थंड डोक्याने प्लॅन करायला सुरुवात केली. याचाच एक भाग म्हणून या सर्वांनी ‘दृष्यम’ सिनेमाची अक्षरश: पारायणे केली. खून कसा करावा, पुरावे कसे मिटवावेत याचा बारकाईने विचार केला. सुमितचाच दूरचा नातेवाईक आकाश याला या कटामध्ये सामील करून घेण्यात आले.
शाहरुखवर ‘हनी ट्रॅप’
आकाश याची एका दूरच्या मैत्रिणीची मदत घेण्यात आली. या मैत्रिणीच्या सहाय्याने मुंबईतल्या एका वेश्या व्यवसाय करणाऱ्या मात्र दिसायला सुंदर तरुणीची मदत घेण्यात आली. त्या तरुणींने शाहरुखला आपल्या जाळ्यात ओढायचे आणि बाप लेकांच्या हवाली करायचे असे डील ठरले. यासाठी ५० हजार रुपयेही त्या तरुणीला देण्यात आले. चोर बाजारातून एक मोबाइल आणि दुसऱ्याच्याच नावावर असलेले सीमकार्ड त्या तरुणीला देण्यात आले. शाहरुखचा मोबाइल नंबरही तिला देण्यात आला. शाहरुख तो अलगदच त्या तरुणीच्या जाळ्यात सापडला. त्या तरुणीनेच शाहरुखशी मोबाइलवरुन चॅटिंग सुरू केले. त्याला शाहरुखही प्रतिसाद देत गेला. त्या तरुणीने आपण शिवाजी विद्यापीठात शिक्षण घेत असल्याचे खोटेच शाहरुखला सांगितले होते. त्या तरुणीला प्रत्यक्ष भेटण्यासाठी शाहरुख उतावीळ झाला होता. अखेर ११ जुलै रोजी त्या तरुणीने शाहरुखला सकाळी शिवाजी विद्यापीठात भेटायला येण्यास सांगितले. त्यानुसार शिवाजी विद्यापीठात एमएसस्सीला प्रवेश घेण्यासाठी जात असल्याचे सांगून शाहरुख शिरोळ येथील घरातून बाहेर पडला. दुपारी १२ च्या सुमारास एका भाड्याने घेतलेल्या गाडीतून ती तरुणी विद्यापीठात आली. या गाडीचा चालक होता आकाश. प्लॅनमध्ये ठरल्याप्रमाणे सरनोबतवाडी येथे एक बंगला भाड्याने घेण्यात आला होता. त्या बंगल्यात आपण राहत असून घरी कोणीच नाहीत असे सांगून त्या तरुणीने शाहरुखला आपल्या कार पाठोपाठ येण्यास सांगितले. त्या कारच्या पाठोपाठ शाहरुख आपली दुचाकी घेऊन गेला. त्या बंगल्यात तरुणी आणि शाहरुख यांनी प्रवेश केला. त्यावेली बंगल्यात आधीच नगरकर पितापुत्र दबा धरून बसले होते. आकाशही त्या बंगल्यात आला. त्यांनी शाहरुखला पकडून एका खुर्चीला बांधले. ठरल्याप्रमाणे कामाचा व पैशांचा व्यवहार पुर्ण झाल्याने ती तरुणी त्याच वेळी तेथून निघून गेली.
अपघाताचा बनाव
दुपारी एक ते रात्री आठ वाजेपर्यंत चौघांनी शाहरुखला जबरदस्तीने दारू पाजून बेदम मारहाण केली. त्यानंतर आडी मल्लय्या ते हणबरवाडी या निर्जन रस्त्यावर नेऊन पुन्हा मारहाण केली. शाहरुखची दुचाकी रोहितने घेतली. स्कार्पिओमध्ये सुमित शाहरुखला घेऊन बसला. रात्री साडेनऊच्या सुमारास महामार्गावरील टोल नाका चुकवून कोगनोळी मार्गे सुमितने शाहरुखला ‘पुन्हा असे कोणत्याही मुलीबरोबर करू नकोस. तुझ्या गाडीने तू परत जा’ असे सांगितले. दारुची धुंदी आणि दिवसभराच्या मारहाणीमुळे थकलेल्या शाहरुखने आपल्या दुचाकीवर बसताच वेगाने धूम ठोकली. मात्र, पुन्हा त्याला गाठून स्कॉर्पिओने शाहरुखच्या दुचाकीला धडक दिली. धडकेच्या आवाजाने त्या रस्त्यावरील फार्महाऊसमधील काहीजण धावत आले. यावेळी दुचाकी पडलेली होती तर शाहरुख तळमळत होता. यावेळी अपघातात कोणीतरी तरुण पडल्याचे सांगत आकाश, सुमित व रोहितने शाहरुखला रुग्णालयात नेतो, असे सांगून स्कॉर्पिओमध्ये घेतले. दुचाकी तिथेच सोडून एक किलोमीटर अंतरावर निर्जनस्थळी थांबून स्कॉर्पिओतून शाहरुखला बाहेर काढले. रस्त्यावर त्याला टाकून त्याच्या अंगावर तीनवेळा स्कॉर्पिओ गाडी घातली व पलायन केले. त्यानंतर तरुणीला दिलेला मोबाइल, शाहरुखचे दोन मोबाइल आणि हेल्मेट रात्री ११ च्या सुमारास पंचगंगा नदीमध्ये टाकले. तेथेच चौघांनी दुसरे कपडे घालून खुनात वापरलेले कपडेही नदीत टाकले. रात्री १२ च्या सुमारास रवींद्र यांनी आपल्या मुलांसह घरातील महिलांना घेऊन तुळजापूर गाठले. प्लॅनप्रमाणे सर्वकाही पार पडल्याने रवींद्रसह इतर मारेकरी निवांत राहिले. दरम्यान निपाणी पोलिसातील सीपीआय स्कॉड असोदे आणि जंबगी सांगलीत तळ ठोकून होते. दुसऱ्या दिवशी तुळजापूरहून घरी येत असताना रवींद्र, रोहित आणि आकाश शहरात मधेच उतरले. तर सुमित महिलांसोबत घरी आला. यावेळी असोदे व जंबगी यांनी सुमितला ताब्यात घेतले. सांगली व इचलकरंजी पोलिसात कळवून सुमितला निपाणी पोलिस स्टेशनमध्ये आणले. यानंतर इचलकरंजी व शहापूर पोलिसांनी रवींद्र, रोहित आणि आकाश यांना पकडून निपाणी पोलिसांच्या ताब्यात दिले. यानंतर या चौघांनी गुन्ह्याची कबुली देत गुन्ह्याचा प्लॅनही सांगितला. या कारवाईत सहाय्यक फौजदार कोतवाल, राजू दिवटे, संतोष बडोदे, खडकलाटचे पीएसआय बसवनगौडा पाटील यांनीही सहभाग घेतला.
दृष्यम पाहून केले कृत्य
प्रसिद्ध अभिनेता अजय देवगण आणि तब्बू यांचा दृष्यम चित्रपट चांगलाच गाजला होता. यामध्ये एका पोलिस अधिकाऱ्याच्याच मुलाच्या खुनाच्या प्रकरणातून आरोपी सहीसलामत सुटतो. हाच धागा वापरुन शाहरुखचा खून करण्यात आला. मात्र, सिनेमा आणि प्रत्यक्ष आयुष्यात फरक असतो हे न कळल्याने ते पोलिसांच्या जाळ्यात अडकले.
प्रियाच्या आत्महत्येची नोंद नाही
प्रियाने नैराश्यातून राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याचे नगरकर पितापुत्रांनी सांगितले. घरच्यांनी तातडीने तिच्यावर अंत्यसंस्कार केले. याप्रकरणाची कोणतीच नोंद स्थानिक पोलिस स्टेशनमध्ये करण्यात आलेली नाही. असेही पुढे आले आहे.
इतक्या लवकर तपास कसा केला?
चार महिने या खुनाची आम्ही तयारी करत होतो. कोणताही पुरावा मागे राहू नये, याची काळजी घेतली होती. तरीही इतक्या लवकर या खुनाचा तुम्ही तपास कसा केला? असा सवाल आरोपींनीच निपाणी पोलिसांना केला.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट