म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
श्री अंबाबाई मंदिरासंदर्भात आज (गुरुवार) मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. येत्या पावसाळी अधिवेशनात अंबाबाई मंदिरासंदर्भात सभागृहात प्रश्न उपस्थित होण्याची शक्यता असल्याने राज्याच्या विधी व न्याय विभागाने ही तातडीची बैठक बोलविल्याचे मंत्रालयातील खात्रीशीर सूत्रांकडून समजते. बैठकीला पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष, जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार उपस्थित राहणार आहेत.
सध्या अंबाबाई मंदिराचे व्यवस्थापन पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडे आहे. अंबाबाई मंदिराचे व्यवस्थापन आणि रोजचे कामकाज करताना येणाऱ्या अडचणींबरोबरच अंबाबाई मूर्ती संवर्धन, पुरातत्व विभागाचा अहवाल, गांभाऱ्यातील पुजाऱ्यांचा वाद या विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. बैठकीचा अहवाल राज्य मंत्रिमंडळापुढे जाऊन, मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाल्यानंतरच बैठकीतील निर्णयांवर शिक्कामोर्तब होईल. महसूल विभागातील प्रधान सचिवांच्या दलनात दुपारी बाराच्या सुमारास ही बैठक सुरू होणार असून, विधी व न्याय विभागाचे राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
अंबाबाईची घागरा-चोलीची पूजा बांधल्यानंतर सुरू झालेल्या वादात मंदिरातील पुजाऱ्यांना हटवून तेथे सरकारनियुक्त पुजारी नेण्याची मागणी भाविकांनी केली आहे. यासंदर्भात श्री अंबाबाई मंदिर पुजारी हटाओ संघर्ष समिती स्थापन झाली आहे. वादाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांपुढे सुनावणी घेण्याचे आदेश २२ जूनला दिले आहेत. त्यानुसार पहिल्या सुनावणीवेळी संघर्ष समितीने पुजारी हटाओसाठी दोन हजार पानांचे पुरावे सादर केले आहेत. याची पुढील सुनावणी २० जुलै रोजी होणार आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट