अंबाबाई मंदिरातील सध्याच्या पुजाऱ्यांना हटवून तेथे सरकारी पुजारी नेमण्यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी बुधवारी झालेल्या पहिल्या सुनावणीत श्री अंबाबाई पुजारी हटाओ संघर्ष समितीने जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांना दोन हजार पानांचे पुरावे सादर केले. यात ऐतिहासिक दाखल्यांसह पुजाऱ्यांनी गेल्या काही वर्षांत गाभाऱ्यात केलेल्या चुकांचे पुरावे असल्याचे समितीकडून सांगण्यात आले. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या सूचनेवरून ही सुनावणी घेण्यात येत आहे.
अंबाबाईला घागरा चोलीची पूजा बांधल्यावरून सुरू झालेल्या वादात मंदिरातील पुजाऱ्यांना हटवून पंढरपूरप्रमाणे सरकारी पुजारी नेमावेत, अशी मागणी सुरू झाली. यावर तोडगा काढण्यासाठी २२ जूनला पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बोलविलेल्या बैठकीत पुजारी अजित ठाणेकर यांना मारहाण झाली होती. त्या बैठकीतच पालकमंत्री पाटील यांनी सरकारी पुजारी नेमण्यासंदर्भात विचार करण्यासाठी जिल्हाधिकारी सुभेदार यांच्या अध्यक्षतेखाली सुनावणी घेऊन दोन्ही बाजू ऐकून घ्याव्यात, असे आदेश दिले. तीन महिन्यांत या संदर्भातील अहवाल विधी व न्याय विभागाला पाठविण्याच्या सूचनाही पालकमंत्र्यांनी दिल्या आहेत. त्यानुसार पहिली सुनावणी बुधवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या कक्षाजवळील शिवाजी सभागृहात झाली.
सुनावणीला श्री अंबाबाई पुजारी हटाओ संघर्ष समितीचे सर्व पंधरा सदस्य उपस्थित होते. सुनावणीनंतर समितीचे प्रवक्ते संजय पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘सुनावणीमध्ये सदस्यांपैकी अनेकांनी ऐतिहासिक मुद्दे कागदपत्रे आणि ठोस पुराव्यांसह मांडले आहेत. अन्य ठिकाणी महाराष्ट्रात ज्या पद्धतीने सरकारने मानधनावर पुजारी नेमले आहेत त्याचप्रमाणे अंबाबाई मंदिरातही निर्णय व्हावा, अशी समितीची एकमुखी मागणी आहे. सदस्यांनी आंदोलनाची ही ठिणगी पडली आहे, वणवा पेटू देऊ नका, असा इशारा दिला आहे.’
पुढील सुनावणी २० जुलैला
समितीचे सदस्य आणखी काही पुरावे गोळा करत आहेत. त्यासाठी थोडा अवधी हवा असल्याने समितीकडूनच जिल्हाधिकाऱ्यांकडे पंधरा दिवसांची मुदत मागण्यात आली. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी येत्या २० जुलैला सकाळी साडेदहा वाजता पुढील सुनावणीची वेळ निश्चित केली आहे.
तोपर्यंत देणगी सरकार जमा
मंदिरात जे दानधर्म होते, देणगी येते ती सरकार जमा करावी, अशी मागणी समितीकडून करण्यात आली आहे. मंदिरात पुजारी नेमण्याबाबत तीन महिन्यांत अहवाल विधी व न्याय विभागाकडे द्यायचा आहे. तोपर्यंत मंदिरात येणाऱ्या देणगीचे काय?, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. त्यावर यासंदर्भात निर्णय होईपर्यंत सर्व देणगी सरकार जमा करावी आणि निर्णय झाल्यानंतरच त्या निधीविषयी अंतिम निर्णय घ्यावा, असे म्हणणे समितीने मांडले.
लाडू प्रसाद बंद करा
आंध्र प्रदेशातील तिरुपती देवस्थानप्रमाणे कोल्हापुरात अंबाबाई मंदिरात लाडूच्या प्रसादाची सुरुवात करण्यात आली आहे. त्याला पुजारी हटाओ संघर्ष समितीने बैठकीत विरोध दर्शविला. अंबाबाई मंदिरात फुटाणे आणि खडीसाखर हा पारंपरिक प्रसाद आहे. तिरुपतीप्रमाणे सुरू झालेली अंबाबाई मंदिरातील ही पद्धत उद्यापासूनच (५ जुलै) बंद करावी, अशी मागणी करण्यात आली.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट