जुनी शाहुपूरी येथील पोलिस ठाण्याच्या जागेवर राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारावे, या मागणीसाठी सोमवारी शाहू-भीम मानवी साखळी आंदोलन करण्यात आले. जोरदार घोषणांनी दसरा चौक व शाहूपुरीचा परिसर दणाणून सोडला.
माणगाव येथे झालेल्या अस्पृश्य परिषदेनंतर डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांनी २० मार्च १९२० रोजी दोन दिवस शाहूपुरीतील तत्कालीन विश्रामगृहात वास्तव्य केले होते. त्या ठिकाणी राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक बांधावे. तसेच या इमारतीचा कोल्हापूर हेरिटेजमध्ये समावेश करण्याची मागणी गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे. मात्र ही इमारत बेकायदेशीररित्या उद्ध्वस्त केली आहे. त्याबाबत प्रतिकात्मक आंदोलन करत याच जागी स्मारक उभारावे, अशी मागणी करण्यात आली. प्रथम दसरा चौक येथे आंदोलकांनी मानवी साखळी करुन घोषणा देण्यात आल्या. यावेळी काही काळ वाहतुकीची कोंडी झाली होती. दरम्यान, पोलिस आणि आंदोलकांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. यानंतर आंदोलकांनी शाहूपुरी येथील जुन्या पोलिस ठाण्याच्या इमारतीच्या जागेवर साखळी आंदोलन केले.
या आंदोलनामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले), पीपल्स रिपब्लिकन पार्टी (गवई), लोक जनशक्ती पार्टी, रिपब्लिकन सेना असे आंबेडकरवादी पक्ष, संघटनांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. या आंदोलनाचे नेतृत्व प्रा. शहाजी कांबळे यांनी केले.
यावेळी उत्तम कांबळे, विश्वास देशमुख, सखाराम कामत, विद्याधर कांबळे, विलास भामटेकर, दिलीप कांबळे, अविनाश शिंदे, गुणवंत नागटिळे आदी कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट