म. टा. वृत्तसेवा, सांगली
बचत गटांतील महिलांना बँका कर्ज देत नसल्यामुळेच फायनान्स कंपन्यांना लुबाडणुकीसाठी रान मोकळे झाले आहे. तोंडी आणि रोखीने कर्ज देणाऱ्या कंपन्या महिलांची घोर फसवणूक करीत आहेत. अशा महिलांना कोणीच तारणहार नसल्याने खेड्यांपाड्यातील महिलांचे संसार उध्वस्त होत आहेत. त्यामुळे लुबाडणूक करणाऱ्या कंपन्यांच्या मुसक्या त्वरीत आवळाव्यात अन्यथा तीव्र आंदोलन करावे लागेल, असा इशारा एकात्म समाज केंद्राचे अध्यक्ष बापूसाहेब पुजारी यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना दिला.
एकात्म समाज केंद्राच्या माध्यमातून चाळीस हजार सभासद असणारे दोन हजार महिला बचत गट चालविण्यात येत आहेत. गेली तीस वर्षे हे काम अव्याहतपणे सुरू आहे. परंतु अलिकडे बँकांनी बचत गटांना कर्ज देणे बंद केल्याने फायनान्स कंपन्यांचे चांगलेच फावले आहे. गेली दहा वर्षे कंपन्या लुबाडणूक करीत आहेत. फायनान्स कंपन्यांची कार्यालये निघतात आणि लुबाडणुकीचे टार्गेट पूर्ण करून एका रात्रीत गायब होतात. राजरोसपणे सुरू असलेला हा फसवणुकीचा धंदा बंद झाला पाहिजे. संबधितांच्या हातात बेड्या पडल्या पाहिजेत, अशी मागणी पुजारी यांनी केली.
बचत गट ही गोरगरिबांची चळवळ आहे. या मधील महिलांना रोखीने कर्ज देऊन रोखीने वसूल करून फसवणूक केली जात आहे. त्यामुळे अशा फायनान्स कंपन्या बंदच झाल्या पाहिजेत. त्यांची वसुली त्वरीत थांबवावी, वसुलीसाठी त्यांनी महिलांच्या दारात जायचे नाही. बचत गटांना कर्ज देण्याचे आदेश बँकांना देणे आवश्यक आहे. या गोष्टी तत्काळ झाल्या नाहीतर महिलांच्या समोर आत्महत्या केल्याशिवाय पर्याय उरत नाही, इतकी भयावह स्थिती आहे, असेही पुजारी म्हणाले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट