सांगली, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यांत रविवारी सायंकाळी अनेक ठिकाणी हलक्या ते जोरदार पावसाने हजेरी लावली. सातार शहरात गारांचा वर्षावही झाला. सांगली जिल्ह्याच्या आटपाडी, कवठेमहांकाळ आणि तासगाव तालुक्याच्या काही भागांत रविवारी चांगला पाऊस झाला. सायंकाळी सुमारे अर्धा तास पाऊस झाला. वादळी वारे आणि ढगांच्या गडगडाटात अवकाळी पावसाने हजेरी लावली. पावसामुळे द्राक्षे, डाळिंब आणि रब्बी हंगामातील गहू पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. सोलापूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी हलका पाऊस झाला. करमाळा तालुक्यात हलका पाऊस झाला आहे. पावसामुळे आंब्यांचा मोहोर गळून पडण्याची भीती व्यक्त होत आहे. सातारा शहरातही सांयकाळी चार वाजता हलक्या पावसाला सुरुवात झाली. काही काळ थांबून पुन्हा साडेपाचच्या दरम्यान वादळी वाऱ्यांसह गारांचा पाऊस सुरू झाला.
द्राक्ष-बेदाण्याचे नुकसान
कुपवाड : सांगली जिल्ह्यातील आटपाडी, तासगाव तालुक्याच्या पूर्व भागासह कवठेमहांकाळच्या काही भागात रविवारी वादळी वाऱ्यासह हलका पाऊस झाला. तासगावच्या पूर्व भागात चांगला पाऊस झाला आहे. खानापूरमध्ये गारांचा पाऊस झाला. आटपाडी परिसरात अर्धातास पावसाची रिमझीम सुरू राहिल्याने काढणी करुन शेतातच ठेवलेली ज्वारी, हरभरा, मका, गहू भिजले. डाळींब बागांनाही या पावसाने काही प्रमाणात फटका बसला आहे. जतमध्ये वादळी वाऱ्याने द्राक्ष बाग कोसळून मोठे नुकसान झाले आहे. तासगाव पूर्वभागातील द्राक्ष बागाईतदार शेतकरीही या अवकाळी पावसाने हबकला आहे. काढणीला आलेली द्राक्षे कुजून आणि बेदाण्याच्या शेडवरील बेदाणा काळा पडून मोठे नुकसान होणार आहे.
रविवारी सकाळीही वातावरण झाकोळलेले होते. सायंकाळी अचानक वादळी वाऱ्याचे झोत येऊ लागले. त्यापाठोपाठ अवकाळीनेही हजेरी लावली. आटपाडी तालुक्यातील जरंडी, करगणी, दिघंची या भागात. तासगाव तालुक्यातील सावळज, वायफळे, गव्हाण, अंजनी आणि कवठेमहांकाळ तालुक्यातील मळगाव, कुची या परिसरात सुमारे अर्धा तास पाऊस झाला.
करमाळ्यात हलका पाऊस
सोलापूर : दुष्काळाची आणि उन्हाची तीव्रता दिवसागणिक वाढतच चालली असताना रविवारी सायंकाळच्या सुमारास वातावरणात अचानकपणे बदल होऊन ढगांचा गडगडाट होऊन जिल्ह्याच्या काही भागात हलका पाऊस झाला. करमाळा तालुक्याच्या काही भागात चांगला पाऊस झाला आहे. मागील चार-पाच दिवसांपासून उन्हाच्या झळा वाढत होत्या. रविवारी सायंकाळी पाचनंतर अचानकपणे ढगाळ वातावरण तयार झाले. ढगांचा गडगडाट सुरू होवून जिल्ह्याच्या काही भागात पावसानेही हजेरी लावली. करमाळा शहरासह परिसरात चांगला पाऊस झाला. पावसामुळे आंबा उत्पादकांत चिंतेचे वातावरण आहे.
मुलांनी लुटला पावसात भिजण्याचा आनंद
सातारा : साताऱ्यात सायंकाळी चारच्या सुमारास पावसाच्या तुरळक सरींनी शिडकाव केला. त्यानंतर साडेपाचच्या सुमारास वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला. पावसाने हवेत काहीस गारवा निर्माण झाला. तुरळक स्वरुपाचा हा पाऊस यंदाच्या हंगातील पहिलाच पाऊस असल्याने आणि रविवारची सुटी असल्याने लहान मुलांनी पावसात भिजण्याचा आणि गारा वेचून खाण्याचा आनंद लुटला.
पहिल्यांदा पावसात जोर नव्हता मात्र, फिरून आलेल्या पावसाने शहरात पाणीपाणी केले. पावसाने नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. जनजीवन विस्कळीत झाले होते. रस्ते जलमय झाले होते. अनेक सखल भागात पाणी साचले होते. राजवाडा, राधिका रोड, देवीचौकात पाण्याची तळी साचली होती. शहरातील अनेक सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करण्यात आले. वाऱ्यामुळे सिल्व्हर ओकचे झाड पडून वाहतूक कोंडी झाली होती. बाजाराचा दिवस असल्याने बाजारहाट करण्यासाठी ग्रामीण भागातून आलेल्या व पुन्हा गावाकडे परतणाऱ्या ग्रामस्थांची तारांबळ उडाली. पावसामुळे आंब्यांचा मोहोर गळून पडण्याची भीती आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट