February 26, 2016, 1:30 pm
म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
मैदानावरून टोलवलेला चेंडू शोधताना मुलांना मानवी कवटी आणि जळालेल्या अवस्थेतील हाडे सापडल्याने एकच खळबळ उडाली. शुक्रवारी सकाळी साडेआठच्या सुमारास नागाळा पार्कातील वारणा कॉलनीच्या कम्पाउंडमध्ये ही घटना उघडकीस आली. या प्रकारामुळे कुणाचा तरी खून करून कवटी व हाडे या परिसरात टाकल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
मेरी वेदर मैदानावर सकाळी मुले क्रिकेट खेळत होती. एका फलंदाजाने टोलवलेला चेंडू मैदानाच्या पूर्वेकडील वारणा कॉलनीमागे मोकळ्या जागेत पडला. वाळलेल्या गवतात चेंडू शोधत असताना मानवी कवटी आढळली. संबंधित मुलाने अन्य सहकाऱ्यांना त्याची माहिती दिली. अन्य मुलेही घटनास्थळी आली. कवटी आणि हाडे पाहून त्यांची घाबरगुंडी उडाली. मुलांना तेथे जळलेली कवटी आणि सात ते आठ हाडे आढळली. एखादा मृतदेह जाळून नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा सुरू होती. कवटीचा काही भाग, हाडेही अर्धवट जळाली होती.
दरम्यान, याची माहिती वारणा कॉलनीत पसरली. काही जागरुक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत शाहूपुरी पोलिसांना माहिती दिली. निरीक्षक अरविंद चौधरी, सहाय्यक निरीक्षक विद्या जाधव, उपनिरीक्षक श्याम देवणे आदींसह कर्मचारी घटनास्थळी गेले. त्यांनी कवटी, हाडे ताब्यात घेतली.
यासंदर्भात निरीक्षक चौधरी म्हणाले, 'कवटी आणि हाडे फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात येणार आहेत. घटनास्थळी सहा ते सात हाडे मिळाल्याने ती बाहेरून आणून टाकल्याची शक्यता जास्त वाटते.'
तपास न लागलेल्या खुनाचा फायली उघडल्या
बेपत्ता व तपास न लागलेल्या खुनाच्या फायली पुन्हा उघडण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती शहर पोलिस उपअधीक्षक भारतकुमार राणे यांनी दिली. या परिसरात एक वर्षापूर्वी हौदात पडून मुलाचा मृत्यू झाला होता. त्यामुळे हा हौद संरक्षित केला आहे. या परिसरातील कचरा दरवर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये पेटवण्यात येतो. कचरा व गवत पेटवले असते तर कवटी व हाडे जळून खाक झाली असती अशी चर्चा सुरू आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
↧
February 26, 2016, 5:30 pm
म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
अपुऱ्या पावसामुळे धरणात कमी पाणीसाठा असल्यामुळे शहरवासीयांना टंचाईच्या झळा सोसाव्या लागणार आहेत. एप्रिल आणि मे महिन्यात यंदा शहरात पाणी टंचाई जाणवण्याची दाट शक्यता आहे. उन्हाळ्याची चाहूल लागली असतानाच नदीची पातळी खालावली आहे. मुळातच यंदा धरणे पूर्ण क्षमतेने भरली नाहीत. यामुळे जल संपदा विभागाकडून नदीत पाणी सोडण्याच्या दिवसाचा कालावधी वाढला आहे. शिंगणापूर बंधाऱ्यातील पातळी कमी झाल्याने शनिवारी आणि रविवारी शहरात कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे. महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने जलसंपदा विभागांशी संपर्क साधून नदीत पाणी सोडण्याची विनंती केली आहे. तसेच नागरिकांना काटकसरीने पाणी वापरण्याचे आवाहन केले आहे.
कोल्हापूरला तुळशी आणि राधानगरी धरणातून पाणी पुरवठा केला जातो. पंचगंगा नदीतून नागदेववाडी, बालिंगा आणि शिंगणापूर उपसा केंद्रातून पाणी उपसा केला जातो. यंदा पाऊस कमी झाल्याने जल संपदा विभागाकडून पाणी सोडण्याचे नियोजन सुरू आहे. पाणी सोडण्याच्या कालावधीत वाढ झाल्याने नदीपातळी कमी झाली आहे. शिंगणापूर बंधाऱ्यातील पातळी कमी झाल्याने बालिंगा आणि शिंगणापूर उपसा केंद्रातील पाणी उपशावर परिणाम झाला आहे. या दोन्ही केंद्राकडील उपसा कमी झाल्याने शुक्रवारी आणि शनिवारी पूर्ण क्षमतेने पाणी पुरवठा होणार नाही. दुसरीकडे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने जलसंपदा विभागांशी संपर्क साधल्याचे जल अभियंता मनीष पवार यांनी सांगितले. जलसंपदा विभागाला नदीमध्ये पाणी सोडण्याची विनंती केली आहे. शुक्रवार सायंकाळपर्यत पाणी येण्याची शक्यता आहे. त्यानंतर पाणी वितरण व्यवस्था सुरळीत होईल, असे सूत्रांनी सांगितले.
एप्रिल, मेमध्ये टंचाई जाणवणार
धरणातील पाणीसाठा, शहराला आवश्यक पाणी त्यासंदर्भातील नियोजन याविषयी पुढील आठवड्यात जलसंपदा विभाग आणि महापालिका अधिकाऱ्यांत पुढील आठवड्यात बैठक होण्याची शक्यता आहे. उन्हाच्या झळा आतापासूनच जाणवू लागल्या आहेत. त्यामुळे धरणातील साठा आणखी कमी होणार आहे. या पार्श्वभूमीवर शहराला नियमित पाणी पुरवठा व्हावा, याबाबत नियोजन केले जाणार आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
February 26, 2016, 1:30 pm
म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
नागरिकांना अपुरा पाणी पुरवठा, पाणी टंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागत असताना शहरातील विविध भागात पिण्याच्या पाइपलाइनला गळतीमुळे हजारो लिटर पाणी वाया जात आहे. वर्षानुवर्षे दुरूस्ती केली जात नाही असे खडे बोल शुक्रवारी स्थायी समितीच्या सदस्यांनी अधिकाऱ्यांना सुनावले. राजारामपुरी व राजेंद्रनगरमध्ये पिण्याच्या पाण्यामध्ये ड्रेनेजचे पाणी मिसळते. पाइपलाइनची गळती काढा, दुरूस्तीची कामे तत्काळ हाती घ्या. तीन वर्षे दुरूस्ती का होत नाही? नागरिकांचा रोष निर्माण होणार नाही याची खबरदारी घ्या अशा शब्दात सदस्यांनी प्रशासनावर पाणी नियोजन आणि वितरणाच्या सूचना केल्या. सभापती मुरलीधर जाधव बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते.
राजारामपुरी ९ वी व १० वी गल्लीतील पॅसेज बोळामध्ये पिण्याच्या पाण्यात ड्रेनेजचे पाणी मिसळत आहे. नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्याचे नगरसेविका प्रतिज्ञा निल्ले यांनी निदर्शनास आणले. रुपाराणी निकम यांनी राजेंद्रनगर बर्ड स्कूलजवळील पाइपलाइन गळती, ड्रेनेज पाणी मिसळण्याचा प्रकार मांडला. रिना कांबळे, दीपा मगदूम यांनी रिंगरोड परिसरातील नरसिंह कॉलनी व राजलक्ष्मीनगरमध्ये अपुऱ्या पाणी पुरवठ्याकडे लक्ष वेधले. मनीषा कुंभार, अजित ठाणेकर यांनी नवीन वाशी नाका परिसरातील पाइपलाइन गळती, एका अपार्टमेंटला परस्पर तीन इंची लाइन मंजूर केल्याने इतर भागाला कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याचे सांगितले. उमा इंगळे, महेजबीन सुभेदार यांनी अनधिकृत केबिन्सचा मुद्दा उपस्थित केला. जयश्री चव्हाण, निलोफर आजरेकर, सुनील पाटील यांनी चर्चेत भाग घेतला. सदस्यांनी नेचर इन नीड कंपनीच्या कामकाजावरून आक्षेप घेतले. कंपनीचे काम १५ दिवसात न थांबविल्यास कार्यालयाला ठाळे ठोकू असा इशारा दिला.
नगरोत्थानची कामे पुन्हा चर्चेत
सूरमंजिरी लाटकर यांनी झोपडपट्टीधारकांना पंतप्रधान आवास योजनेतून घरे मिळणार अशी विचारणा केली. सत्यजित कदम यांनी कपूर वसाहतीत अंगणवाडी सुरू करण्याची मागणी केली. राजारामपुरी मख्य मार्गावरील नगरोत्थानचे काम संथगतीने सुरू असून काम निकृष्ट दर्जाचे होत आहे. राजोपाध्येनगर येथील स्ट्रॉमवॉटरचे काम खराब आहे आदी विषय यावेळी चर्चेला आले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
February 26, 2016, 1:30 pm
म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
शिवाजी विद्यापीठाचा ५२ वा दीक्षान्त सोहळा शनिवारी (ता. २७) विद्यापीठाच्या लोककला केंद्रात दुपारी दीड वाजता होत आहे. मुंबईच्या इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीचे कुलगुरू आणि ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मश्री डॉ. जी. डी. यादव यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा होत आहे.
यावर्षी सोहळ्यात सर्वाधिक ५२ हजार १६० पदव्या प्रदान केल्या जाणार आहेत. आतापर्यंत झालेल्या पदवी प्रदान समारंभातील ही संख्या उच्चांकी आहे. प्रत्यक्षात २४ हजार ३६० स्नातक उपस्थित राहून पदवी घेणार आहेत. ३०१ जणांना पीएचडी पदवी प्रदान केली जाणार आहे. विद्यापीठाने सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत. सर्वसाधारण कौशल्याचे राष्ट्रपती सुवर्णपदक इंग्रजी विभागाची विद्यार्थिनी प्रियांका पाटील आणि एमए (संस्कृत) विषयात सर्वाधिक गुण मिळाल्याबद्दल माधवी पंडित हिला कुलपतीपदक प्रदान केले जाणार आहे. दीक्षान्त समारंभानिमित्त शुक्रवारपासून ग्रंथमहोत्सव सुरू झाला आहे. शनिवारी सकाळी साडेसात वाजता कमला कॉलेज येथून ग्रंथदिंडी, पालखी सोहळा होईल. 'मेक इन इंडिया'अंतर्गत असलेल्या पुस्तकांचा विशेष स्टॉल राहील.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
February 26, 2016, 1:30 pm
Anuradha.kadam @timesgroup.com
कोल्हापूर : अंबाबाई मंदिर तीर्थक्षेत्र विकास आराखड्याची तीन टप्प्यात रचना करत असताना मंदिर परिसरातील रहिवासी नागरिक, व्यापारी यांच्या पुनर्वसनाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्याला मंजुरी मिळण्याच्या मार्गावर असताना विकास आराखड्याची अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक असलेल्या भूसंपादनाबाबत मात्र परिसरातील नागरिक, व्यापारी यांच्यात नाराजी असल्याची स्थिती आहे. मार्चअखेर आराखड्यावर मंजुरीचा शिक्का मारण्यापूर्वी प्रशासन परिसरातील नागरिकांच्या पुनर्वसनासाठी कोणता पर्याय काढणार याकडेही लक्ष लागून राहिले आहे.
अंबाबाई मंदिर परिसर हा शहराच्या मध्यवस्तीत आहे. त्यामुळे या भागात नागरीवसाहत, व्यापारी, शैक्षणिक संस्था, ऐतिहासिक इमारती आहेत. जेव्हा मंदिराच्या तीर्थक्षेत्र विकास आराखड्याची चर्चा सुरू झाली तेव्हापासून मंदिर परिसरात, किंबहुना आराखड्याच्या रचनेतंर्गत समाविष्ट होणाऱ्या किमान ४० मीटर परिसरातील दुकाने, शिक्षणसंस्थाचे स्थलांतर करण्याचा विचार आहे. त्यामुळे या विकास आराखड्यात अडकणाऱ्या स्थानिकांचा विचार न करता केवळ प्रशासकीय पातळीवर याचा निर्णय होणार असेल तर त्याला तीव्र विरोध करण्याचा पवित्रा परिसरातील नागरिकांनी घेतल्यामुळे मंदिर विकास आराखड्याला गेल्या दोन वर्षात वेगळे वळण लागले आहे.
आराखड्याअंतर्गत मंदिर परिसराचा विकास होणार आहे. त्यामध्ये साधारणपणे ३० रहिवाशांचा समावेश आहे. यापैकी १८ इमारतमालक तर १२ भाडेकरू आहेत. १०८ व्यावसायिकांपैकी ५४ मालक तर ५४ भाडेकरू आहेत. आराखड्यातील रचनेनुसार या सर्वांचे विस्थापन होणार असल्याचे नमूद केले आहे. एक दोन बैठका घेण्यापलिकडे प्रशासनाने परिसरातील नागरिक, व्यापारी यांच्यासोबत कोणतीही विश्वासार्ह चर्चा केली नसल्याचीही तक्रार करण्यात आली आहे.
अंबाबाई दर्शनासाठी येणाऱ्या पर्यटकांसाठी आराखड्यातील प्रस्तावानुसार टेंबलाई मंदिराजवळ भक्तनिवास आहे. भाविकांच्या सोयीचा विचार करता हे भक्तनिवास गैरसोयीचे असल्याचेही नागरिकांनी दिलेल्या तक्रारीमध्ये म्हटले आहे. तर बिंदू चौक ते भवानी मंडप हा वॉक वे करण्याचाही प्रस्ताव या आराखड्यात आहे. त्यामुळे साहजिकच या मार्गावरील वाहतूकही बंद होण्याची शक्यता आहे. यासंदर्भातही परिसरातील नागरिकांनी आक्षेप नोंदवला आहे. या मार्गावर घरे आहेत, बंदी केली तर नागरीकांची मोठी गैरसोय होणार आहे.
अंबाबाई मंदिर तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यात मंदिराच्या बाह्यपरिसराचा विकास होणार असल्यामुळे परिसरातील नागरिक, व्यापारी यांच्या विस्थापनासंदर्भात प्रशासनाच्या पातळीवर चर्चा सुरू आहेत. मात्र परिसरातील लोकांचे रोजगार थांबवून, घरे, दुकाने पाडून तीर्थक्षेत्र विकास होणार असेल तर त्याचा प्रशासनाने पुनर्विचार करणे आवश्यक आहे. गेल्यावर्षी नागरिकांनी याबाबत काही सूचना सांगितल्या होत्या, त्याचाही प्रशासनाने विचार करायला हवा. - सुभाष वोरा, संचालक, कोल्हापूर जनशक्ती
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
↧
February 26, 2016, 1:30 pm
म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
कसबा बावडा रोडवरील जिल्हा न्यायसंकुलाच्या आवारात दोन गटांत मारामारी झाली. तेथे उपस्थित पोलिसांनी धाव घेत मारामारी करणाऱ्यांना ताब्यात घेतले. शाहूपुरी पोलिस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हा नोंद झाला आहे. शुक्रवारी दुपारी दीड वाजता ही घटना घडली. याप्रकरणी सुमित्रा श्रीकांत पिसे व शारदा संदीप ढेकणे यांनी परस्परविरोधात फिर्याद दिली आहे.
कोर्टाच्या बाहेर दाव्यासाठी आलेल्या वादी व प्रतिवादींच्यात एकमेकांच्या अंगावर धाऊन जाण्याचा प्रकार घडला. यावेळी वादाचे रुपांतर मारामारीत झाले. मारामारी सरू असताना सुरू झालेल्या मोठ्या आवाजामुळे वकील कोर्टाच्या खिडक्या, गॅलरीतून ही घटना पाहत होते. दरम्यान खटल्यासाठी दाखल झालेल्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दोन्ही गटांतील मारामारी करणाऱ्यांना ताब्यात घेतले. काहींना पोलिसांनी पाठलाग करून तिला ताब्यात घेतले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
February 27, 2016, 1:33 pm
म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
'ध्येयवादी आणि नाविन्याचा शोध घेणारे संशोधकच विद्यापीठांची शक्तिस्थाने आहेत. त्यांना पूर्ण स्वातंत्र्य देऊन समाजोपयोगी मूलभूत संशोधनासाठी विद्यापीठांनी सहकार्य करावे,' असे आवाहन मुंबईच्या इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीचे कुलगुरू प्रा. डॉ. जी. डी. यादव यांनी केले. शिवाजी विद्यापीठाच्या ५२ व्या दीक्षान्त समारंभप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे होते. विद्यापीठाच्या लोककला केंद्राच्या प्रांगणात हा नेटका सोहळा झाला.
डॉ. यादव म्हणाले, 'देशासमोर अनेक प्रश्न आहेत. शहरातील सांडपाणी, घनकचरा, वायूप्रदूषण, रस्तेबांधणी, नवी ऊर्जा निर्मिती, सौरऊर्जा, वायूऊर्जा, बायोगॅस, स्मार्ट सिटीची नवीन कल्पना विज्ञान तंत्रज्ञानाच्या जोरावरच पुढे जाऊ शकणार आहे. कोल्हापूर शहराने यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याची गरज आहे. विद्यापीठांनी नवे जग, नवे ज्ञान आणि नवी समाजरचना निर्माण करण्यात नेहमी अग्रेसर राहायला हवे. नावीन्यामुळेच प्रगती होते. संशोधकांत कठीण प्रश्न सोडविण्याची क्षमता असते. अफाट कल्पनाशक्तीचा ठेवा असतो. अशा स्वप्ने सत्यात उतरवणाऱ्या संशोधकांना विद्यापीठाने पूर्ण स्वातंत्र्य देण्याची गरज आहे. उच्च शिक्षणासाठी संशोधक, प्राध्यापक आणि विद्यार्थी विद्यापीठांनी सर्व राज्यातून आणि देशातून आणण्याची गरज आहे. संशोधक प्राध्यापकाला नवीन स्टार्टअप कंपन्या उभारण्याचे विद्यापीठांचे धोरण असले पाहिजे.'
बलाढ्य राष्ट्रनिर्मितीसाठी काही महत्त्वाच्या क्षेत्रांत काम करावे लागेल, असे सांगून डॉ. यादव यांनी ऊर्जा, पाणी, अन्नधान्य उत्पादन, स्वस्त आरोग्यसेवा, पर्यावरण आणि पायाभूत सुविधांच्या विकास झपाट्याने साधत असतानाच शाश्वत विकासाची गरजही अधोरेखीत केली. देशाचे उत्पादनही सरासरी साडेनऊ टक्क्यांनी वाढले पाहिजे. त्या माध्यमातून आगामी शतकातील आव्हानांचा सामना करण्यासाठी विद्यापीठे आणि उद्योगांनी एकत्र आल्यास प्रगतीचा आलेख निश्चितच उंचावेल.'
व्यासपीठावर परीक्षा नियंत्रक महेश काकडे, बीसीयूडी डॉ. डी. आर. मोरे, प्रभारी कुलसचिव व्ही. एन. शिंदे आदी उपस्थित होते.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
February 27, 2016, 1:30 pm
'गुरुत्व भरारी'ला कष्टांचे इंधन
भौतिकशास्त्राचा आणि गणिताचे अभ्यासक असणाऱ्या न्यूटन यांनी १६८७ मध्ये गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडला. त्यानंतर तब्बल ३२८ वर्षांनंतर पृथ्वीवरच्या माणसाला गुरुत्व लहरींचे अस्तित्व शोधता आले. १९८० पासून सुरू असलेल्या या संशोधनाला मूर्त स्वरूप येण्यास ३५ वर्षे लागली. जगभर या संशोधनाचे कौतुक झाले. केवळ भौतिकशास्त्र म्हणून नव्हे, तर पृथ्वीवरच्या माणसासाठी हे यशस्वी संशोधन अतिशय महत्त्वाचे आहे. या संशोधनाच्या प्रक्रियेत कोल्हापूरचा एक तरुण गेल्या काही वर्षांपासून मेहनत घेत होता. चिन्मय कलघटगी असे त्याचे नाव. एवढ्या मोठ्या संशोधनात कोल्हापूरचा तरुण असणे, ही निश्चितच प्रत्येक कोल्हापूरकरासाठी अभिमानाची बाब आहे. मात्र, शहरवासियांपेक्षा चिन्मयचे आई-वडील, त्याच्या या यशामुळे भारावून गेले आहेत.
रविराज गायकवाड
००००००००००००००
चिन्मयच्या या गुरुत्व भरारीचा आढावा घेण्यासाठी, कोल्हापुरातील त्याच्या आई-वडिलांची भेट घेतली. रुक्मिणीनगरातील कलघटगी कुटुंबाच्या बंगल्यात चिन्मयची आई भाग्यश्री यांनी स्वागत केले. सोफ्यावर बसलेले चिन्मयचे वडील वासुदेव यांच्या बाजूच्या टेबलावर चिन्मय संदर्भात प्रसिद्ध झालेल्या बातम्यांची कात्रणे आणि त्यांचे अभिनंदन केलेल्या इ-मेल आणि फेसबुक पोस्टच्या प्रिंट ठेवल्या होत्या. आई-वडिलांबरोबरच चिन्मयची वाग्दत्त वधू समृद्धीदेखील घरात होती. चहापाण्याचे सोपस्कार झाल्यानंतर चिन्मयविषयी चर्चा सुरू झाली.
माझे काही मोजके प्रश्न आणि मुलाच्या यशाने भारावून गेलेल्या आई-वडिलांची एकापाठोपाठ येणारी उत्तरं, असा संवाद जवळपास अर्धा ते पाऊणतास सुरू होता. चिन्मयच्या शालेय जीवनातील यशापासूनच चर्चेला सुरुवात झाली. छत्रपती शाहू विद्यालयाचा चिन्मय सुरुवातीपासूनच हुशार विद्यार्थी होता. गणित आणि विज्ञान हे त्याचे आवडीचे विषय. या विषयांमध्ये तो कधीही मागे पडला नाही. गणितात, तर त्याने ९० च्या खाली कधी गुण मिळविल्याचे आठवत नसल्याचे वडील वासुदेव कलघटगी सांगत होते. सहावीत असताना त्याचा हात मोडला होता; पण तरीही रायटर घेऊन त्याने परीक्षेत ७५ टक्क्यांहून अधिक गुण मिळविल्याचे त्यांनी सांगितले.
सुरुवातीपासून गणित आणि विज्ञानाचे आकर्षण असलेल्या चिन्मयचे आयआयटीकरून इंडियन इंस्टिट्यूट ऑफ सायस एजुकेशन अँड रिसर्च सेंटरमध्ये (आयसर) जाण्याचे धेय्य होते. अप्लाइड सायन्सपेक्षा रिअल सायन्समध्ये काहीतरी करण्याची त्याची इच्छा होती. त्यासाठी त्याने सहावी, सातवीपासूनच तयारी सुरू केली होती. राजस्थानातील कोटा येथे जाऊन विशेष तयारी करण्याचेही त्याने नियोजन केले होते. मात्र, काही कारणास्तव ते बारगळले. मिलिंद तोरो यांच्याकडे स्पर्धा परीक्षेसाठीचे प्रशिक्षण घेत असताना त्याची गणिताची गोडी आणखी वाढली; पण दुर्दैवाने आयआयटी क्रॅक करणं, चिन्मयला जमलं नाही. काहीसा निराश झालेल्या चिन्मयला त्यावेळी थोड्या आधाराची गरज होती. आई-वडिलांनी ब्रेक घेऊन पुन्हा प्रयत्न करण्याचा पर्याय सुचविला होता. मात्र, त्याचवेळी चेन्नई मॅथॅमॅटिकल इन्स्टिट्यूटच्या (सीएमआय) परीक्षेत चिन्मय पास झाला आणि त्याचा शास्त्रज्ञ होण्यापर्यंत प्रवास वेगाने सुरू झाल्याचे आई भाग्यश्री यांनी सांगितले.
आयआयटीला जाऊ न शकलेल्या चिन्मयला 'सीएमआय'मध्ये बहर आला. पारंपरिक शिक्षण मोडून काढणाऱ्या या संस्थेत त्याने पाच वर्षे शिक्षण घेतले. त्यात एमएससी करताना त्या गुरुत्व लहरी हाच विषय घेतल्याने त्याचे भविष्यातील संशोधनातील सहभागाचे दरवाजे खुले झाले होते. 'सीएमआय'मध्ये पहिल्या दिवसापासून शिष्यवृत्ती मिळविलेल्या चिन्मयने इंग्लंडमधील कार्डिक विद्यापीठातही शिष्यवृत्तीसाठी आग्रह धरला होता.
या दोन्ही महत्त्वाच्या संस्थांमध्ये प्रवेश मिळवताना चिन्मयचा स्पष्टवक्तेपणा त्याच्यासाठी खूप कामी आल्याचे त्याची आई सांगत होत्या. 'सीएमआय'मध्ये प्रवेश परीक्षेत एक प्रश्न चुकीचा होता. तो प्रश्न कसा चुकीचा आहे, याचे स्पष्टीकरण चिन्मयने त्याच्या पेपरमध्ये दिले होते. तर कार्डिक विद्यापीठात एका गुगली प्रश्नाला त्याने उत्तर देण्यास असमर्थता दर्शविली. प्रश्न विचारणाऱ्या प्राध्यापकांनी तेथेच 'हा प्रश्न तुला गोंधळात टाकण्यासाठीचा होता,' असे स्पष्ट केले आणि चिन्मयच्या प्रवेशाचा मार्ग मोकळा झाल्याचे भाग्यश्री कलघटगी कौतुकाने सांगत होत्या.
चिन्मय इतक्या मोठ्या संशोधनासाठी काम करत असल्याची तुम्हाला माहिती होती का? यावर घरातील सगळ्यांनीच नकारार्थी माना हरविल्या. याबाबत चिन्मयच्या आई म्हणाल्या, 'संशोधनाबाबत खूपच गोपनीयता बाळगण्याचे आदेश होते. 'आम्ही खूप मोठे काम करत आहोत, लवकरच तुम्हाला ते माहिती होईल,' एवढेच चिन्मय सातत्याने सांगायचा. जेव्हा संशोधन जाहीर झाले त्यावेळी तासाभरात पत्रकार परिषद होत आहे. तुम्ही टीव्हीवर पाहू शकता, असा निरोप त्याने दिला. त्यानंतर बीबीसी आणि सीएनएनवर पत्रकार परिषद पाहताना, मात्र आम्ही खूपच भारावून गेलो.'
संशोधनाची माहिती देणाऱ्या प्रेस नोटची एक प्रत चिन्मयने घरी इ-मेल केली आहे. त्यात सगळ्यात शेवटी सहभागी शास्त्रज्ञांची यादी आहे. ती यादी आणि त्यात चिन्मयचे सी. व्ही. कलघटगी हे नाव अखोरेखीत करून दाखवताना, वडील वासुदेव कलघटगी यांच्या चेहऱ्यावरचे भाव शब्दातीत आहेत.
सांख्यिकी विश्लेषण करण्यात योगदान
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
February 27, 2016, 3:04 pm
म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
'अंबाबाई की महालक्ष्मी हा वाद बिनबुडाचा असून जिच्या मस्तकावर नागप्रतिमा आणि शिवलिंग आहे ती पार्वती म्हणजे अंबाबाईच आहे. मूर्ती संवर्धनप्रक्रियेत अंबाबाईच्या मस्तकावरील नागमुद्रा हटवून विकृतीकरणाचा घाट घातला गेला आहे. शाहूंच्या नगरीत अशाप्रकारे लादलेला बदल सहन केला जाणार नाही,' असे परखड मत प्राचीन इतिहास मातृदेवता संशोधक डॉ. अशोक राणा यांनी व्यक्त केले.
येथील करवीर निवासिनी अंबाबाई भक्त मंडळातर्फे आयोजित 'शोध अंबाबाईचा' व्याख्यानमालेंतर्गत डॉ. राणा यांनी चौथे पुष्प गुंफले. त्यावेळी ते बोलत होते. शाहू स्मारक भवन येथे झालेल्या या व्याख्यानावेळी डॉ. राजेंद्र कुंभार, मंडळाचे सहकार्यवाह वसंतराव मुळीक, इतिहास संशोधक इंद्रजित सावंत, कार्यवाह दिलीप पाटील, बबन रानगे, शैलजा भोसले, अंजली समर्थ, सतीश कोळसे-पाटील, शिरीष देशपांडे, आदी व्यासपीठावर उपस्थित होते. डॉ. राणा म्हणाले, 'शाहू महाराजांच्या नगरीत दक्षिण काशीच्या भूमीत अंबाबाईला महालक्ष्मी बनविण्याची प्रक्रिया सुरू आहे. इतिहासात डोकावल्यास अंबाबाई म्हणजे पार्वती असल्याच्या अनेक खुणा मूर्तीवर कोरलेल्या आहेत. मात्र, अंबाबाईऐवजी महालक्ष्मी असे नामकरण करण्यासाठी त्या खुणाच नष्ट करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. संवर्धनाच्या निमित्ताने तर मूर्तीच्या मस्तकावरील नागमुद्राच काढून टाकली. शाहू महाराजांच्या वारसदारांनी यासंदर्भात ठोस भूमिका घेतली पाहिजे.'
'विष्णूपत्नी की अंबाबाई?' असा वाद जेव्हा निर्माण झाला तेव्हा मूर्ती अभ्यासकांनी संशोधनाच्या पातळीवर सत्य मांडणे आवश्यक होते. मात्र, मूर्ती अभ्यासाशी फारसा संबंध नसलेल्यांनी वादात आणखी भर घातली. त्यामुळे अंबाबाईचे अस्तित्व टिकवण्यासाठी अंबाबाई भक्त मंडळाने उभारलेला लढा हा सत्याचा लढा आहे. डॉ. राणा म्हणाले, 'शेतीचा शोध महिलांनी लावला. नंतर नांगराचा शोध लागल्यानंतर त्यावर पुरुषांची सत्ता आली. नाग चिन्हालाही जुना इतिहास आहे. पूर्वी कुळांचे किंवा कुळवाड्यांची ओळख कायम राहण्यासाठी चिन्ह ठेवावे लागायचे आणि नाग हा शेतकऱ्याचा मित्र म्हणून नागकूळ निर्माण झाले. त्यामुळे अंबाबाई मूर्तीच्या मस्तकावर नागमुद्रा असणे हे तिच्या मूळरूपाचे प्रतीक आहे.'
विजय पाटील यांनी सूत्रसंचालन केले. दिलीप पाटील यांनी ठरावाचे वाचन केले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
↧
February 28, 2016, 10:31 am
इस्लामपूर : वाळवा तालुक्यातील पेठ येथील सरपंच सुनिता पवार यांचे पती सुकुमार भगवानराव पवार (वय ४०) यांचा मृतदेह शनिवारी राष्ट्रीय महामार्गावरील उंब्रजनजीक संशयास्पद अवस्थेत निर्जनस्थळी आढळून आला. रविवारी सकाळी कराड येथील सरकारी हॉस्पिटलमध्ये मृतदेहाची उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. दुपारी बाराच्या सुमारास त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
पेठ येथील दिवंगत आमदार बी. एल. पवार यांचे ते पुत्र होत. शुक्रवारी रात्री मुंबईला जातो म्हणून ते घरातून बाहेर पडले. शनिवारी त्यांचा मृतदेह उंब्रजजवळ आढळला.
पोलिसांनी त्यांच्याच मोबाइलवरून पेठ येथे त्यांच्या घरी संपर्क साधला. मृत सुकुमार पवार सिव्हिल इंजिनिअर होते. ते आत्मशक्ती पतसंस्थेचे संचालक म्हणून काम पाहत होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी सरपंच सुनिता पवार, दोन मुले असा परिवार आहे.
सुकुमार पवार यांचा मृतदेह सापडल्याने पेठ आणि परिसरात उलट-सुलट चर्चा आहे. घातपात की अपघात या बाबत अद्याप काहीही माहिती उपलब्ध झाली नाही.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
February 28, 2016, 10:35 am
म. टा. वृत्तसेवा, कुपवाड
'अतांत्रिक लोकांनी अतांत्रिक पद्धतीने कामे केली असल्यामुळेच पाणीटंचाई आहे. पाणी टंचाईला पावसाचे प्रमाण नाही तर सरकार जबाबदार आहे. त्यामुळे दुष्काळ निसर्गनिर्मित नाही, तर सरकारनिर्मित आहे,' अशी टीका भूजलतज्ज्ञ आणि शिरपूर पॅटर्नचे प्रणेते सुरेश खानापूरकर यांनी रविवारी सांगलीत केली. महाराष्ट्रातील धरणांची मोठी संख्या हे ही एक दुष्काळाचे कारण असून, कोल्हापूर पद्धतीचे बंधारे काही कामाचे नाहीत, असेही ते म्हणाले.
सांगलीतील राजमती नेमगोंडा पाटील ट्रस्टच्या वतीने सुरेश खानापूरकर यांना रविवारी राज्यस्तरीय नेमगोंडा दादा पाटील जनसेवा पुरस्काराने तर मिरजेचे गटशिक्षणाधिकारी नामदेव माळी यांना विशेष सेवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. माजी आमदार प्रा. शरद पाटील यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. या वेळी उपस्थितांचे स्वागत आणि प्रास्ताविक ट्रस्टचे मानद सचिव सुरेश पाटील यांनी केले. माळी यांनी सत्काराला उत्तर देताना हा पुरस्कार प्रत्यक्ष काम करणारे शिक्षक, गुणवंत विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांना तसेच कुटुंबाला स्थलांतर व्हावे लागल्यानंतरही कष्ट करून आपल्या शिक्षण देण्यासाठी धडपडलेल्या आईला समर्पित केला. खानापूर म्हणाले, शास्त्रशुद्धरितीने भूगर्भाचा अभ्यास न करताच धरणे, बंधारे बांधले गेले. त्यामुळे वाहत्या नद्या मृत झाल्या. शहरातील, गावातील नदीनाले केवळ कचऱ्याची कोंडाळी आणि घाण पाणी सोडण्याची ठिकाणे झालीत.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
February 28, 2016, 10:38 am
म. टा. वृत्तसेवा, कुपवाड
सांगली कला महोत्सवातंर्गत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या चित्रकारांनी सांगलीची वैशिष्ट्ये 'कॅनव्हास'वर साकारली. मंदिर, मशिद, पुरातन वास्तु आणि नजरेला नजर भिडवतांना आपले वेगळेपण मनावर ठसविणारा निसर्ग चित्रकारांसमोरील पांढऱ्या शुभ्र कॅनव्हासवर आकारताना पाहण्यात सांगलीकर मग्न झाले होते. रंगाच्या छटा घेऊन कॅनव्हासवर सांगली अवतरली तेव्हा, ती आणखी सुंदर वाटू लागली.
सांगली जिल्हा प्रशासन आणि आर्ट फाउंडेशन यांच्या वतीने सुरू झालेल्या माई घाटावरील सांगली कला महोत्सवाचा शनिवारचा दुसरा दिवस चित्रकारांनी गाजवला. रसिकांची उस्फूर्त प्रतिसाद मिळत असलेल्या या कला महोत्सवाचा रविवारी राज्यनाट्य स्पर्धा गाजविणाऱ्या वृंदावन, या नाटकाने होत आहे.
शनिवारी सकाळी कला महोत्सवात राज्यस्तरीय निसर्गचित्र स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. यात सांगली, मुंबई, पुणे, नाशिक, रत्नागिरी यासह महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांतून सव्वासे युवा चित्रकार सहभागी झाले होते. सकाळी सात वाजता सुरू झालेली थेट चित्रकला स्पर्धा सायंकाळी सात वाजेपर्यत सुरू होती. या बारा तासांत या चित्रकारांनी संपूर्ण सांगली कॅनव्हासवर उतरविली. तैलरंग, पावडर शेडिंग, जलरंग, अॅक्रॅलिक कलरचा वापर चित्रकारांनी केला होता. नावनोंदणी करुन युवा चित्रकार स्पर्धक हातात कॅनव्हास पेपर, रंगाचे साहित्य हातात घेऊन शहरात विखुलरले. सांगलीकरांचे आराध्य दैवत श्री गणपतीचे मंदिर हे वास्तुशास्त्राचा एक उत्तम नमुना आहे. शहरात मुस्लिम समाजाच्या मशिदी, ख्रिश्चन धर्मियांचे चर्चसह जुन्या ठेवणीच्या इमारती कॅनव्हासवर चित्रकारांनी आणल्या. नजरेला दिसेल तसे चित्र रेखाटायला सुरुवात झाली. दुपारनंतर कॅनव्हासवरच्या चित्रांनी मूळरूप धारण केले. सकाळच्या कोवळ्या किरणांच्या उजेडात चित्रकारांनी चित्रे काढायला सुरवात केली. सायंकाळी चित्र पूर्ण होताच चित्रकार स्पर्धकाच्या चेहऱ्यावरचा आनंद अनुभवण्यासारखा होता. दुपारीच बालचित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. सायंकाळी शिवलिला सांस्कृतिक कला मंच आणि शिवसमर्थ सोंगी भजनी मंडळाचा संस्कृतीचा ठेवा, हा महाराष्ट्रीय लोककलांचा सुंदर कलाविष्काराचे सादरीकरण झाले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
February 28, 2016, 10:39 am
म. टा. वृत्तसेवा, शिराळा
समाजकल्याण विभागाचा विशेष घटक योजनेअंतर्गतचा निधी इतरत्र वळवून आर्थिक घोटाळा करणाऱ्या सांगली जिल्हा समाजकल्याण विभागाचे वरिष्ठ निरीक्षक बाळासाहेब धेंडे यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पश्चिम महाराष्ट्र सचिव विशाल घोलप यांनी पुणे समाजकल्याण विभागाचे आयुक्त यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
बोगस अभिप्राय कागदपत्रांद्वारे विशेष घटक योजनेअंतर्गतचा निधी इतरत्र वळवून २0 लाख रुपये खर्चाचे काही साकव बांधण्यात आले आहेत. मागासवर्गीय समाज नसणाऱ्या गावात साकव बांधले आहेत. या योजनेअंतर्गत २0१३-१४ वर्षात पाच २0१४-१५ वर्षात सहा, तर २0१५-१६ वर्षामध्ये ११ साकव बांधले आहेत. मागासवर्गीय समाजाच्या उपयोगासाठी म्हणून प्रत्येकी २0 लाख रुपये खर्चाचे हे बावीस साकव बांधले आहेत. काही साकवांचा व मागासवर्गीय वस्तीचा कोणताही संबंध नाही. यामध्ये मागासवर्गीय लोकांच्या नावे बोगस मागणी अर्ज तयार करून मागासवर्गीय लोकांच्या बोगस सह्या करुन ही कामे मंजूर केली आहेत.
शिराळा तालुक्यातील बेलदारवाडी व लादेवाडी या ठिकाणी मागासवर्गीय समाज नाही. तरीही निरीक्षक धेंडे यांनी या ठिकाणी मागासवर्गीय समाज आहे व तेथील साकव मंजूर करणे गरजेचे आहे, असा खोटा अभिप्राय सार्वजनिक बांधकाम विभागास दिला आहे. तसेच सागाव, कोंडाईवाडी या ठिकाणी मागासवर्गीय समाजाला उपयोग नसणाऱ्या ठिकाणी साकव बांधण्यात आले आहेत. त्यामुळे शिराळा तालुक्यातील सर्व साकवांची व त्यांच्या कामांची चौकशी करावी व या सर्व घोटाळ्यास जबाबदार धेंडे यांना निलंबित करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा, अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशारा देण्यात आला आहे. या निवेदनाच्या प्रती सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार रामदास आठवले, उपायुक्त पुणे, जिल्हाधिकारी सांगली, सहायक आयुक्त यांना पाठविण्यात आल्या आहेत.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
↧
February 28, 2016, 1:30 pm
Raviraj.gaikwad @timesgroup.com
कोल्हापूर : कला-संस्कृतीबरोबरच उद्योगनगरी म्हणून ओळख असलेल्या कोल्हापूरचा औद्योगिक विकास गेल्या काही वर्षांत मंदावला आहे. जागतिक मंदीचे परिणाम येथील फाउंड्री उद्योगावर झाले असून, जिल्ह्यात एखादा मोठा उद्योग येण्यात अडथळे येत असल्याने परिसरातील छोट्या उद्योगांना उर्जितावस्था मिळणे कठीण झाला आहे. त्यातच विकासवाडी-हालसवडे ही प्रस्तावित एमआयडीसी कागदावरच राहिल्याने स्थानिक उद्योजकांना विस्तारासाठी जागा मिळणेही मुश्कील बनले आहे.
'मेक इन इंडिया' आणि 'मेक इन महाराष्ट्र'ची सध्या जोरदार चर्चा सुरू असली, तरी कोल्हापूरला या माध्यमातून मोठा उद्योग येण्याची शक्यता सध्या धूसर दिसत आहे. एखाद्या मोठ्या कंपनीच्या प्लँटसाठी असणारा जागेचा अभाव त्याला कारणीभूत असून, महामार्गालगत गोकुळ शिरगाव आणि कागल एमआयडीसीच्या दरम्यान विकासवाडीतील एमआयडीसीचा प्रस्ताव सात वर्षांहून अधिककाळ कागदावरच पडून आहे. त्याचवेळेला उद्योगांसाठी दिलेल्या जामिनीतील काही प्लॉट अजूनही पडून असल्याने जमिनी दिलेल्या शेतकऱ्यांमध्ये रोष असून, यापुढे उद्योगांसाठी जमीन न देण्याच्या पवित्र्यात शेतकरी आहेत. या सगळ्या दुष्टचक्रात जिल्ह्यातील उद्योगवाच्या विकासाचा वेग मंदावला असून, लोकप्रतिनिधींनी हा तिढा सोडविण्यासाठी पुढे येण्याची गरज आहे.
शहराला लागून महामार्गालगत शिरोली, गोकुळ शिरगाव व कागल पंचतारांकित या तीन औद्योगिक वसाहती आहेत. या वसाहतींमध्ये आता जागा शिल्लक नसल्याने सात वर्षांपूर्वी विकासवाडी, नेर्ली, तामगाव, हालसवडे परिसरातील आणखी एक औद्योगिक वसाहत उभारण्याचा प्रस्ताव पुढे आला. मात्र, अजूनही हा प्रस्ताव कागदावरच आहे. नव्या एमआयडीसीसाठी ५२२ हेक्टर प्रस्तावित जागा होती. मात्र, गेल्या सात वर्षांत यातील तब्बल २५४ हेक्टर म्हणजे जवळपास निम्म्याहून जमिनीवर शेतीची कामे सुरू झाली आहेत. पूर्वी माळरान असलेल्या या जमिनीवर कोणतेही पिक घेतले जात नव्हते. मात्र, शाहू वॉटर स्किम आणि कणेरीवाडी लघू पाटबंधारे प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणावर पाणी उपलब्ध झाले. त्यामुळे शेतकऱ्यांनी जमीन कसायला सुरूवात केली. आता या परिसरात शेती वापरात असलेली जमीन सोडून इतर जमीन उद्योगांसाठी घ्यावी, अशी भूमिका शेतकरी घेत आहेत. स्थानिक लोकप्रतिनिधींनी याप्रकरणी विशेष लक्ष देऊन उद्योगांसाठीच्या जागेचा तिढा तातडीने सोडविण्याची गरज उद्योजकांमधून व्यक्त होत आहे.
कोल्हापूर परिसरात एखादा मोठा उद्योग यावा, यासाठी आम्हीही प्रयत्नशील आहोत. मात्र, उद्योगांसाठी जमीन घेताना ती लोकांना विश्वासात घेऊनच घेतली जावी. आजवर उद्योगांसाठी दिलेल्या जमिनी अजूनही पडून आहेत, याकडे कोण लक्ष देणार? वाठार परिसरात एमआयडीसीने शिक्के टाकले होते. मात्र, कंपन्या आल्या नाहीत म्हणून, ते रद्द करावे लागले. मोठा उद्योग आला, तर त्याला वाठार परिसरात जागा उपलब्ध होऊ शकते. - अमल महाडिक, आमदार
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
February 28, 2016, 1:30 pm
म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
शिवाजी पेठेतील लाड चौकात माजी महापौर प्रल्हाद चव्हाण यांच्या घराच्या स्लॅबचे काम सुरू असताना स्लॅबचा काही भाग कोसळून शालाबाई शामराव शिंदे (वय ६५, रा. पाडळी खुर्द तर्फे कोगे, ता. करवीर) ही महिला ठार झाली. रविवारी (ता. २८) दुपारी तीन वाजता ही घटना घडली. या अपघातात अन्य सहाजण जखमी झाले. दरम्यान, अपघातानंतर महिलेचा मृतदेह आधी सीपीआर आणि नंतर खासगी रुग्णालयात हलवून पुन्हा सीपीआरला आणण्यात आला.
अपघातात संदीप अरुण कारेकर (वय २५), युवराज वसंत भोसले (वय २२), शुभम कुंभार (वय १९), संतोष चौगुले (वय ३०), वसंत धोंडिराम मांडरे आणि शशिकला वसंत मांडरे हे सहा जण किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींवर सीपीआर रुग्णालयात उपचार केल्यानंतर त्यांना सोडण्यात आले. या घटनेची नोंद जुना राजवाडा पोलिस स्टेशनमध्ये झाली आहे.
कॉँग्रेसचे शहराध्यक्ष आणि माजी महापौर प्रल्हाद चव्हाण यांच्या शिवाजी पेठेतील घराच्या तळमजल्यावर असलेल्या सुप्रभामंच मंगल कार्यालयात राकेश प्रकाश जाधव (रा. लक्ष्मी गल्ली, पापाची तिकटी) या तरुणाचा विवाह होता. दुपारी साडेबाराच्या मुहूर्तानंतर जेवणावळीची गडबड सुरू होती. तीनच्या सुमारास नवऱ्याची आत्या शालाबाई शिंदे या मंगल कार्यालयाबाहेरील पत्र्याच्या शेडखाली उभ्या राहिल्या होत्या.
दरम्यान, या इमारतीच्या पाचव्या मजल्यावर स्लॅब टाकण्याचे काम सुरू होते. यी मजल्यावरील एकाबाजूची लाकडी फळी तटून स्लॅब पत्र्याच्या शेडवर कोसळला. शेडखाली उभ्या असलेल्या शालबाई शिंदे यांच्या डोक्यावर स्लॅबसह पत्राही कोसळल्याने त्या गंभीर जखमी झाल्या.
या घटनेत आणखी सहा जण किरकोळ जखमी झाले. सचिन प्रकाश जाधव याने तातडीने गंभीर जखमी शालाबाई शिंदे यांना उपचारासाठी रिक्षातून छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात दाखल केले. सीपीआरच्या अपघात विभागातील वैद्यकीय अधिकारी डॉ. विजयकुमार गाडवे यांनी तपासणी केली. डॉक्टरांनी इसीजी काढला असता उपचारापूर्वीच महिलेचा मृत्यू झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून मृत महिलेची रजिस्टरमध्ये नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असातना माजी महापौर चव्हाण यांच्या पंधरा ते वीस कार्यकर्त्यांनी आणि त्या महिलेच्या नातेवाईकांनी शिंदे यांचा मृतदेह बळजबरीने
ताब्यात घेऊन खाजगी दवाखान्यात हलवला. सीपीआरमधील डॉक्टरांनी विरोध करूनही मृतदेह उत्तरीय तपासणी होण्याआधीच नेल्याप्रकरणी लक्ष्मीपुरी आणि जुना राजवाडा पोलिस स्टेशनला कळविल्याचे अपघात विभागातील वैद्यकीय अधिकारी डॉ. विजयकुमार गाडवे यांनी सांगितले. संध्याकाळी सातच्या सुमारास पुन्हा मृतदेह सीपीआरमध्ये आणून उत्तरीय तपासणी करण्यात आली. उपचारासाठी पेशंटला खाजगी दवाखान्यात घेऊन गेल्याचे त्या महिलेच्या नातेवाईकांनी पोलिसांना सांगितले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
February 28, 2016, 1:30 pm
म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
कोल्हापुरात भर रस्त्यात महिलेची छेड काढणाऱ्या रोडरोमिओची नागरिकांनी धुलाई करून त्याला पोलिसांच्या स्वाधीन केले. शनिवारी रात्री उमा टॉकिज परिसरात हा प्रकार घडला. दरम्यान, दिवसभर कारवाई करण्यावरून लक्ष्मीपुरी आणि जुना राजवाडा पोलिस ठाण्यामध्ये हद्दीचा वाद रंगल्याने गोंधळात भर पडली. शनिवारी रात्री ओढ्यावरील सिद्धिविनायक मंदिर परिसरातून एक महिला आपल्या घराकडे जात होती. यावेळी पाठीमागून मोटारीतून आलेल्या एका युवकाने महिलेची छेड काढली. त्या महिलेने या प्रकाराची माहिती आपल्या कुटुंबीयांना दिली. कुटूंबियांनी संबंधित युवकाला छेड काढल्याचा जाब विचारत मारहाण करून पोलिसांच्या ताब्यात दिले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
February 28, 2016, 1:30 pm
म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
'मध्यंतरी समाजवादी शक्ती डळमळीत झाली. त्याचा फायदा घेत भारतीय जनता पक्ष सत्तेवर आला. सध्याचे सत्तारुढ सरकार भांडवलदार व उद्योजकांचे भले व्हावे यासाठी पावले उचलत आहे. सत्तेवर आल्यानंतर ते उद्योजकांचे भले होणारे कार्यक्रम राबवत आहेत. यामध्ये राजशिष्टाचार बाजूला ठेवून परदेश दौरे केले जात आहेत. भांडवलदार आणि उद्योजकांच्या हाती संपत्ती जाण्यासाठी पूरक निर्णय घेतले जात असून त्यासाठी धर्माचा वापर केला जात असल्याचे मत राष्ट्र सेवा दलाचे कार्याध्यक्ष अभिजित वैद्य यांनी केले.
राष्ट्र सेवादलाच्या अमृतमहोत्सव वर्षारंभी कार्यक्रमात 'धर्मनिरपेक्ष लोकशाहीला आव्हान धर्मांधतेचे' विषयावर आयोजित परिसंवादामध्ये बोलत होते.
अभिजित वैद्य म्हणाले, 'सत्तेवर आल्यानंतर सामान्यांच्या हिताला प्राधान्य देणे आवश्यक असते. मात्र सध्याच्या सरकारकडून सामान्यांच्या हिताचा विचार होत नाही. राजशिष्टाचार बाजूला ठेवून केलेल्या परदेश दौऱ्यामध्ये उद्योगांच्या भल्याचे निर्णय आणि चर्चा केली जात आहे. देशातील संपत्ती भांडवलशाहीच्या हाती वाट्याला अधिक द्यायची आहे. त्यांना पुरक निर्णय सत्ताधारी घेत
आहेत. अशा निर्णयाच्या अधारे अधिक संपत्ती मिळवण्यासाठी भांडवलदारांनी जोर वाढवला आहे. यासाठी धर्माचा वापर केला जात आहे. कोणी राष्ट्रप्रेमी, कोणी राष्ट्रद्रोही ठरवून चर्चेमध्ये सामान्यांचे लक्ष विचलीत केले आहे. चर्चेत गुंतवून भांडवलदारांच्या हिताचे निर्णय घेतले जात आहेत. यासाठी सजग राहून समाजवादी विचारांच्या चौकटीत लोकांना सत्त घडामोडी सांगितल्या पाहिजेत. त्यादृष्टीने प्रयत्न करण्याची गरज आहे. तरच आपण बदल घडवू शकतो.'
रजिया पटेल म्हणाल्या, 'पूर्वीच्या काळी आम्ही समाजवादी विचार मांडत होतो. देशाची एकता, अखंडता, राहण्यासाठी समाजवादी विचार पुरक ठरत होते. समाजवादी विचारधारेतील काही पक्षीय मंडळी जनसंघाशी हातमिळवणी करुन एखाद्या मिळत्या जुळत्या विचारांच्या मुद्यावर तडजोडी केल्या. अशी तडजोडी समाजवादी विचारधारेला मारक ठरत आहेत. अशा धर्मांध शक्तींशी हातमिळवणी करताना विचार करण्याची वेळ आली आहे. राष्ट्र सेवा दलाच्या शाखांचा विस्तार करुन समाजवादी विचार
रुजवण्याची निर्णायक आघाडी घ्यावी लागेल.'
यावेळी ओडिसा येथील प्रसिद्ध नृत्यांगना झेलन परांजपे यांच्या मार्गदर्शनाखाली सांस्कृतिक कार्यक्रम झाले. लेझिम, अॅरोबिक्स आदी कार्यक्रमात सेवा दलाच्या २० शाळांतील १३०० मुलांनी सहभाग घेतला होता. यावेळी 'समतेचा पुजारी, एस. एम. जोशी' पुस्तकाचे संकेतस्थळाद्वारे प्रकाशन करण्यात आले.
अमृतमहोत्सव प्रारंभ समारंभास प्राचार्य टी. एस. पाटील, ज्येष्ठ समाजवादी विचारवंत पन्हालाल सुराणा, किसान संघर्ष समितीचे सुनीलम, भरत लाटकर, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डी. बी. पाटील, सुरेश शिपूरकर, मिरासाहेब मगदूम, एम. एस. पाटोळे, बाबासाहेब नदाफ, व्यंकाप्पा भोसले, वसंतराव पाटील, वसंत पाठक आदींसह कार्यकर्ते मोठ्या कार्यक्रमाला संख्येने उपस्थित होते.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
↧
February 28, 2016, 1:30 pm
म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
फार्म हाऊसवर पार्टी झाल्यानंतर नजरचुकीने विष प्राशन केल्याने प्रदीप प्रकाश नाईकनवरे (वय २६, रा. शाहूपुरी, ६ वी गल्ली, कोल्हापूर) या तरुणाचा मृत्यू झाला आहे. माजी महापौर प्रतिभा प्रकाश नाईकनवरे आणि माजी नगरसेवक प्रकाश नाईकनवरे यांचा तो मुलगा आहे.
प्रदीप आणि त्याचा भाऊ स्वप्नील हे इतर चार ते पाच मित्रांसह शुक्रवारी (ता. २६) रात्री वडणगे येथील त्यांच्या फार्महाऊसवर पार्टी करण्यासाठी गेले होते. रात्री साडे अकरा वाजता जेवण झाल्यानंतर प्रदीप याने पाणी समजून नजरचुकीने विष प्राशन केले. प्रदीपला उलट्यांचा त्रास सुरू होताच त्याला भाऊ स्वप्नील आणि मित्रांनी तातडीने उपचारासाठी खासगी दवाखान्यात दाखल केले. मात्र, उपचार सुरू असताना रविवारी (ता. २८) पहाटे सहा वाजता प्रदीप याचा मृत्यू झाला. प्रदीपने जेवणानंतर नजरचुकीने विष प्राशन केले अशी नोंद करवीर पोलिस स्टेशनमध्ये झाली आहे. मात्र ही आत्महत्या की अपघात याची चर्चा सुरू होती.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
February 28, 2016, 1:30 pm
म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
हणबरवाडी (ता. करवीर) येथे घराच्या अंगणात खेळत असताना नातेवाईकांकडून जीप पार्क करताना झालेल्या अपघातात साक्षी संभाजी लवटे (वय २) ही चिमुरडी ठार झाली. डोक्यात रक्तस्राव झाल्याने साक्षी हिचा मृत्यू झाला. लहानग्या चिमुरडीचा अपघातात दुर्दैवी अंत झाल्याने तिच्या नातेवाईकांनी सीपीआर परिसरात हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश केला.
हणबरवाडी (ता. करवीर) येथे साक्षी संभाजी लवटे ही दोन वर्षे वयाची चिमुरडी घराच्या अंगणात खेळत होती. संध्याकाळी सातच्या सुमारास लवटे यांचे नातेवाईक जोतिराम ढेरे हे लवटे यांच्या घराच्या दारात महिंद्रा बोलेरो मोटार पार्क करीत होते. यावेळी गाडी मागे घेताना खेळत असलेली साक्षी ढेरे यांच्या नजरेस न आल्याने तिच्या डोक्याला गाडीचा जोरदार धक्का लागला. या धक्क्याने साक्षीच्या डोक्यात रक्तस्राव झाला. तिच्या नाका-तोंडातून रक्त आल्याने तिला उपचारासाठी तातडीने छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तपासणीनंतर सीपीआरच्या अपघात विभागातील अधिकाऱ्यांनी तिचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
February 28, 2016, 1:30 pm
म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
शिक्षण सहसंचालक कार्यालयाने ऑनलाइन, ऑफलाइन वेतनप्रणालीच्या निमित्ताने कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील अनेक प्राध्यापकांचा दोन महिन्यांचा रोखलेला पगार करण्यात यावा, असा आदेश सरकारने दिला आहे. त्याबाबत शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघाच्यावतीने (सुटा) शिक्षण सहसंचालक कार्यालयासमोर निदर्शने करुन रोखलेला पगार विनाविलंब करण्यात यावा अशी मागणी केली होती. दरम्यान, सहसंचालक कार्यालयाने डिसेंबर २०१५ व जानेवारी २०१६ या दोन महिन्यांची वेतनपत्रके तातडीने मागवून कोल्हापूर ट्रेझरी कार्यालयास सादर केली आहेत. तसेच फेब्रुवारीची वेतनपत्रकेही तातडीने मागवली आहेत.
सहसंचालक कार्यालयाने असंख्य प्राध्यापक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पगार रोखले होते. त्यामुळे सुटा संघटनेच्यावतीने तीव्र निदर्शने केली होती. शिक्षण संचालक प्रा. डॉ. धनराज माने यांनी प्राध्यापकांनी रोखलेल्या पगाराबाबत गंभीर दखल घेत थांबवलेले पगार तातडीने अदा करण्याबाबत सरकारच्या पातळीवर प्रयत्न केले. त्यानुसार कार्यासन अधिकारी जी. एस. कचरे यांनी आदेश दिले.
सरकारने पगार देण्याचे आदेश मार्च २०१६ पर्यंतचे आहेत. त्यामुळे हा आदेश अपुर्ण आहे. शिवाय पीएच. डी.च्या वेतनवाढी, वेतनप्रणालीबाबत केलेली नियमबाह्य वर्गवारी आदी मागण्यांबाबत काही कार्यवाही झालेली नाही. याबाबत सुटाचे आंदोलन सुरुच राहिल असे पत्रकात स्पष्ट केले आहे. त्यानुसार ४ मार्च रोजी शिक्षण सहसंचालक कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧