म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
एखाद्या रिक्षाचालकाने हॉटेल किंवा लॉजिंगच्या दारात पर्यटकाला सोडले, तर संबंधित लॉजिंग किंवा हॉटेलचे व्यवस्थापन रिक्षाचालकाला किरकोळ कमिशन देते. हा जवळपास प्रत्येक शहरातील अलिखित नियम. कोल्हापूरही त्याला अपवाद नाही. मात्र, गेल्या आठवड्यात ख्रिसमस आणि इयर एन्डच्या सुट्यांमध्ये काही रिक्षाचालकांनी लॉजिंग मालकांकडे अव्वाच्या सव्वा कमिशन मागितल्याचे प्रकार घडले आहेत. या कमिशनगिरीला कंटाळून काही लॉज मालकांनी तर, पर्यटकांना रूम शिल्लकच नसल्याचे सांगून कमिशनचा प्रकार टाळल्याचे सांगितले.
एसटी स्टँड किंवा रेल्वे स्टेशन परिसरात उतरलेल्या भाविक किंवा पर्यटकांना अंबाबाईच्या मंदिराजवळ एखाद्या लॉजिंग किंवा निवासी हॉटेलची गरज असते. पहिल्यांदाच कोल्हापुरात आलेल्या पर्यटकांना यासाठी रिक्षाचालक हाच एकमेव आधार असतो. रिक्षाचालक नेईल त्या लॉजमध्ये जाणे, ही त्यांची हतबलता असते. मात्र, रिक्षाचालकाने संबंधित लॉजमध्ये पोहचविल्यानंतर लॉजकडून कमिशनही मिळते. लॉज मालकांचाही व्यवसाय होणार असल्याने त्यांची कमिशन देण्याची तयारी असते. सुरुवातीला पन्नास आणि शंभर रुपयांपर्यंत कमिशन देणे लॉज मालकांनाही शक्य होते. मात्र, आता काही रिक्षाचालक दोनशे-तीनशे रुपये कमिशन मागतात. त्यामुळे लॉजचे भाडे पाचशे किंवा सहाशे रुपये आणि कमिशनची रक्कम दोनशे, असे अजब गणित मांडले जात आहे.
इतके कमिशन देण्यास लॉज मालकांनी नकार दिल्यास पर्यटकांना 'हा लॉज चांगला नाही, इथे आत्महत्या झाल्या आहेत, ही वस्ती चांगली नाही', अशी कारणे सांगून दुसऱ्या हॉटेल किंवा लॉजकडे नेले जाते. त्यामुळे व्यवसाय कमी होईल, या भीतीने लॉजमालक नाईलाजास्तव कमिशन देण्यास तयार होतात. ही कमिशनची रक्कम पर्यटकांच्या खिशातूनच घेतलेली असते. त्यामुळे 'कोल्हापुरात लॉजिंग खूप महाग आहे', असा गैरसमज पर्यटकांमध्ये होण्याचा धोका आहे. यासह जेवण, नाष्ट्यासाठी एखाद्या रेस्टॉरंटमध्ये पर्यटकांना घेऊन गेल्यास किंवा चप्पल खरेदीसाठी एखाद्या दुकानाच्या दारात थांबल्यास त्यांच्याकडूनही काही रिक्षाचालक कमिशन घेत असल्याचे दिसत आहे.
फर्स्ट इम्प्रेशन
प्रत्येक शहरातील रिक्षाचालक हा त्या शहराचे फर्स्ट इम्प्रेशन असतो. त्यामुळे तो कसा बोलतो, तो कसा वागतो, तो फसवतो की नाही, यावरून पर्यटक शहराविषयी आपले एक मत तयार करत असतो. त्यामुळे रिक्षाचालकांचा हा कमिशनचा प्रकार पर्यटकांच्या डोळ्यासमोर झाला किंवा इतर कोणत्यातरी मार्गाने त्यांना कळाला, तर कोल्हापूरचे नाव खराब होते, याची संबंधित रिक्षाचालकांनी जाण ठेवावी, असे मत सामान्य कोल्हापूरकरांमधून व्यक्त होत आहे.
'शहरातील सर्वच हॉटेल किंवा लॉजिंग व्यवसायिक कमिशन देत नाहीत. मात्र, काही ठराविक रिक्षाचालक आणि लॉज यांच्यातील संगनमतामुळे कोल्हापूरचे नाव खराब होत आहे. कमिशनच्या प्रकारामुळे पर्यटन व्यवसायाचे भविष्यात खूप मोठे नुकसान होईल.
- आनंद माने, अध्यक्ष, चेंबर ऑफ कॉमर्स
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट