कळंबा तलावातील पाण्याचा साठा संपण्याच्या मार्गावर असल्याने शुक्रवारपासून पाणी उपसा बंद होणार आहे. तलावातील पाणी उपसा बंद झाला तर पाचगावच्या पश्चिम भागातील २७ कॉलन्यांमधील सुमारे दहा हजार नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. पाणी टंचाईवर मात करण्यासाठी ग्रामपंचायतीने गिरगावमधील दोन पाणी पुरवठा संस्थेतून पाणी उपसा करून त्याचा पुरवठा करण्याचे ठरविले आहे. तात्पुरत्या स्वरूपातील पाइपलाइनसाठी दहा लाखांचा खर्च होणार आहे. त्याचा आराखडा तयार करून जिल्हा परिषद आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर केला आहे. प्रशासकीय पातळीवर येत्या चार दिवसात आराखडा मंजूर होऊन पाइपलाइन टाकण्यास सुरूवात झाली नाही तर पाचगावकरांना पाण्यासाठी धावाधाव करावी लागणार आहे.
पाणी टंचाईवर मात करण्यासाठी ग्रामपंचायतीने गिरगावमधील शाहू पाणी संस्था व भैरवनाथ संस्थेतून उपसा करण्याचे ठरविले आहे. सायफन पद्ध्तीने तात्पुरत्या स्वरूपात पाइपलाइन टाकून पाचगाव फिल्टर हाऊसपर्यंत पाणी आणण्याचे नियोजन आहे. त्यासाठी ९,९९,८३८ रुपये खर्चाचे इस्टीमेट तयार करून मंजुरीसाठी करवीर पंचायत समिती, जिल्हा परिषदेतून हा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयात सादर झाला आहे. टंचाई योजनेतून दीड किलोमीटर अंतरावरील पाणी पुरवठ्यासाठी मदत केली जाते.
जि.प.कडील काही निधी यासाठी खर्ची टाकून काम त्वरित सुरू करणे गरजेचे आहे. अद्याप जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेने निधी मंजूर केलेला नाही. शुक्रवारपासून कळंबा तलावातील पाणी उपसा पूर्ण बंद झाला तर पश्चिम भागातील नागरिकांसमोर पाण्याचा प्रश्न आ वासून उभा राहणार आहे.
सध्या आठ ते दहा दिवसांतून एकदा पाणी पुरवठा होतो. प्रशासकीय दिरंगाई झाली तर नागरिकांसमोर पिण्यासह वापरायच्या पाण्याचा मोठा प्रश्न राहणार आहे. खासगी टँकरने काहीजण पाणी पुरवठा करतात, पण त्यांच्यावर कुणाचेही नियंत्रण नाही.
गुरुवारी मासिक सभा
ग्रामपंचायतीने पाचगावच्या गावठाणमधील लोकवस्तीला पाणी पुरवठा करण्यासाठी दोन बोअर ताब्यात घेतले आहेत. पाचगावच्या पश्चिम भागातील कॉलन्यांना पाणी पुरवठा करण्यासाठी आणखी पाच खासगी बोअर ताब्यात घेतले जाणार आहेत. पाचगाव ग्रामपंचायतीची गुरूवारी मासिक सभा आहे. पाणी टंचाई हाच प्रमुख विषय आहे. सभेत खासगी बोअर ताब्यात घेण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब होणार आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट