म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
ऑनलाइन व डिजिटल साधनसुविधांच्या मदतीने विद्यापीठीय परीक्षा पद्धतीत क्रांतिकारक बदल शक्य असल्याचे प्रतिपादन बेळगावच्या विश्वेश्वरय्या टेक्नॉलॉजीकल विद्यापीठाचे (व्हीटीयू) कुलगुरू डॉ. एच. महेशप्पा यांनी केले.
शिवाजी विद्यापीठात गुरुवारपासून भारतीय विश्वविद्यालय संघातर्फे (एआययू) पश्चिम विभागीय कुलगुरू परिषदेची सुरुवात झाली. त्यावेळी ते बोलत होते. गुजरात, राजस्थान, महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील २५ विद्यापीठाचे कुलगुरू परिषदेत सहभागी झाले आहेत.
डॉ. महेशप्पा म्हणाले, 'परीक्षा यंत्रणा विद्यापीठीय यंत्रणेतील सर्वांत महत्त्वाचा व विद्यार्थ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. विद्यापीठावर परीक्षा सुरळीत घेण्याचे आणि वेळेत निकाल लावण्याचे महत्त्वाचे आव्हान असते. येथे ऑनलाइन व डिजिटल साधन-सुविधांचा वापर करून परीक्षा पद्धतीत अधिकाधिक पारदर्शकता येऊ शकते. वेळ आणि श्रमाची तसेच कागदाचीही बचत करणे शक्य आहे. प्रश्नपत्रिकांचे सुरक्षितपणे ऑनलाइन वाटप करण्यासह उत्तरपत्रिकांची डिजिटल तपासणी करता येईल. पीएचडीसह विविध परीक्षांतर्गत शोधनिबंध व शोधप्रबंधांच्या बाबतीत वाङ्मयचौर्य तपासणी आणि रोखणेही ऑनलाइन पद्धतीने शक्य आहे.'
दुसऱ्या सत्रात नॅसकॉम (मुंबई)च्या सेक्टर स्कील कौन्सिलचे प्रादेशिक प्रमुख युधिष्ठर यादव म्हणाले, सद्यस्थितीत माहिती तंत्रज्ञानाधारित उद्योगांत सर्वाधिक मनुष्यबळ रोजगारात सामावून घेतले जाते आहे. देशात या उद्योगांची उलाढाल २२५ अब्ज डॉलरच्या घरात आहे. २०२० पर्यंत ती ३०० अब्ज डॉलरच्या घरात जाईल. सध्या साडेतीन दशलक्ष विद्यार्थी या क्षेत्रात असून ही संख्या सहा टक्के दराने वाढते आहे..' प्रा. देबजानी दासगुप्ता, प्रा. डी.एच. राव, डॉ. ए.एम. महाजन होते. प्रा. डी. एच. राव आदिंनी विविध विषयांवर मते मांडली. तंत्रज्ञानाचा गतीने स्वीकारकरणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
देशाच्या विकासाची विचारसरणी ठेवा
'भारत सरकारच्या महत्त्वाकांक्षी 'डिजिटल इंडिया' अभियानाला यशस्वी करण्याची सर्वाधिक क्षमता उच्चशिक्षण क्षेत्रातच आहे. देशाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी सर्वांनी 'प्रो-भारत' किंवा 'प्रो-इंडिया' विचारसरणी अवलंबण्याची गरज आहे. अधिकाधिक युवकांना उच्च शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याची गरज आहे', असे प्रतिपादन 'बिट्स पिलानी'चे माजी संचालक व गोव्याच्या के. के. बिर्ला कॅम्पसचे प्रा. जी. रघुरामा यांनी केले. शिवाजी विद्यापीठ व भारतीय विश्वविद्यालय संघ (एआययू) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पश्चिम विभागीय कुलगुरू परिषदेच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. विद्यापीठातील राजर्षी शाहू सभागृहात गुरुवारी सकाळी रोपाला पाणी घालून उदघाटन झाले. अध्यक्षस्थानी भारतीय विश्वविद्यालय संघाचे सरचिटणीस प्रा. फुरकान कमर होते.
'डिजिटल इंडिया व उच्चशिक्षण' या विषयावर प्रा. जी. रघुरामा म्हणाले, 'माहिती तंत्रज्ञान व दळणवळण क्रांती यांमुळे सुविधांचा होणारा गतिमान विकास या पार्श्वभूमीवर उच्चशिक्षण क्षेत्रात अनेकानेक उपयुक्त व्यासपीठे निर्माण होत आहेत. त्यांचे लाभ विद्यार्थ्यांना मिळवून देण्यासाठी विद्यापीठांसह सर्व शिक्षण संस्थांनी तत्परतेने प्रयत्न केले पाहिजेत. विद्यापीठे डिजिटल इंडिया अभियानामध्ये व्यापक सहभाग नोंदवू शकतात.
त्याचप्रमाणे त्याचे लाभही घेऊ शकतात. डिजिटल इंडिया अभियानातील डिजिटल लॉकर सुविधेचा वापर करून विद्यार्थ्यांना अधिकृतपणे ऑनलाइन प्रमाणपत्रे, पदवी कशा प्रकारे प्रदान करता येऊ शकतील याचा विचार करता येईल. ऑनलाइन परीक्षा, असेसमेंट, प्रवेश प्रक्रिया, सुपर फॅकल्टी किंवा मॅसिव्ह ऑनलाइन अभ्यासक्रम, नवनिर्मिती व उद्योजकता प्रशिक्षण व कौशल्य विकास आदींबाबतही या अभियानाचा चांगला वापर करता येऊ शकतो.'
प्रा. जी. रघुरामा म्हणाले, 'अध्ययन-अध्यापन प्रक्रियेसाठी समाजमाध्यमांचा उपयुक्त वापर, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग, अद्ययावत अभ्यासक्रम निर्मिती यांच्यासाठीही ऑनलाइन व्यासपीठांचा प्रभावी वापर करता येईल. ऑनलाइन माध्यमांमुळे आता विद्यापीठांनी अधिक स्वतंत्र, स्वायत्त व गतिमान होण्याची वेळ आली आहे. डिजिटल इंडिया अभियानाच्या यशस्वितेमध्ये आर्थिक व पायाभूत तांत्रिक बाबींचा अडथळा असला तरी भारताच्या भवितव्याच्या दृष्टीकोनातून त्याकडे अत्यंत सकारात्मकपणे पाहण्याची गरज आहे.'
प्रा. फुरकान कमर म्हणाले, 'उच्चशिक्षणाच्या क्षेत्रात डिजिटल इंडिया अभियानाच्या माध्यमातून देशाचे चित्र बदलण्याची क्षमता आहे. विद्यापीठांवर सातत्याने होणारे बदल स्वीकारणे, सामोरे जाणे आणि विद्यार्थ्यांना अद्ययावत ज्ञान देण्याची प्रमुख जबाबदारी आहे. उच्चशिक्षण क्षेत्रातील धुरिणांनी जगाला मार्गदर्शन करण्याची अपेक्षा असताना प्रत्यक्षात उलट चित्र दिसते. हे चित्र नव तंत्रज्ञानाच्या आधारावर बदलण्याची गरज आहे. त्यासाठी देशातील जास्तीत जास्त युवकांना उच्चशिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. सद्यस्थितीत विद्यापीठीय अभ्यासक्रमांमध्ये प्रचंड लवचिकता आणण्याची गरज आहे.
स्वतःच्या वेळेनुसार व गरजेनुसार ऑनलाइन स्वरुपात अध्ययन करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे. त्यामुळे शिक्षकांवर शंका निरसनाची जबाबदारी वाढली आहे. शिक्षकांनीही नवतंत्रज्ञानाच्या माध्यमातून त्यांच्यावरील अतिरिक्त भार कमी करून नव अध्यापन तंत्रांचा अंगिकार केला पाहिजे. संशोधन व नवनिर्मितीच्या नवसंकल्पनांना आविष्कृत करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रेरित केले पाहिजे.'
एआययूचे साप्ताहिक 'युनिव्हर्सिटी न्यूज'च्या विशेषांकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. या वेळी शहीद दिनानिमित्त शहीदांच्या स्मृतींना अभिवादन करण्यात आले. संविधान दिनानिमित्त प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे यांनी संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन केले.
परिषदेसाठी उपस्थित राहिलेल्या चार राज्यांतील कुलगुरू व त्यांच्या प्रतिनिधींसह बेळगावच्या विश्वेश्वरय्या टेक्नॉलॉजिकल विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एच. महेशप्पा, एआययूचे सहसचिव सॅम्पसन डेव्हीड, सहसचिव वीणा भल्ला, 'युनिव्हर्सिटी न्यूज'च्या संपादक डॉ. रमा देवी पाणी, विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक महेश काकडे, प्रभारी वित्त व लेखाधिकारी अजित चौगुले, विद्यार्थी कल्याण संचालक डॉ. डी. के. गायकवाड, क्रीडा विभागप्रमुख पी. टी. गायकवाड आदी उपस्थित होते. कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी स्वागत केले. बीसीयुडी संचालक डॉ. डी. आर. मोरे यांनी आभार मानले.
सकाळी ९.३० वाजता : बॉश कंपनीतर्फे सादरीकरण
सकाळी १० ते ११ वाजता : सत्र चौथे - आयसीटी बेस्ट फ्युचरिस्टीक टेक्नॉलॉजी अॅण्ड पोटॅशियल रोल ऑफ इंडिया इन हॉरिझॉन २०२०, अध्यक्ष : प्रा. ओंकार सिंग, कुलगुरू, मदनमोहन मालवीय तंत्रज्ञान, विद्यापीठ, गोरखपूर. मार्गदर्शक : महेश कुलकर्णी, सहसंचालक, जिस्ट डब्ल्यूडीजी सी डॅक, पुणे, स्थळ : कलातपस्वी आबालाल रेहमान दालन
११.३० ते १२.३० : ए. आय. यू बिझनेस सत्र : समन्वयक प्रा. फुरकान कमर, सरचिटणीस ए. आय. यू, स्थळ : कलातपस्वी आबालाल रेहमान दालन
दुपारी १२.३० ते १.०० समारोप
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट