म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
'शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी यापूर्वी या चिमण्यांनो परत या असे आवाहन केले होते. त्यामुळे सध्या शिवसेनेत सुरू असलेल्या घरवापसीत काही गैर नाही. कोल्हापुरातही माजी शिवसेनेचे नगरसेवक, पदाधिकारी पक्षात परतत आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षप्रवेश होत असल्याची टीका निरर्थक आहे', अशी माहिती शिवसेनेचे सचिव खासदार विनायक राऊत यांनी पत्रकार परिषदेत दिली. 'जे निष्ठावंत आहेत, ज्यांची निवडून येण्याची क्षमता आहेत, त्यांना उमेदवारी देण्यात येईल' असे राऊत म्हणाले.
खासदार राऊत म्हणाले, 'शिवसेनेकडे हुशार व विकासाची जाण असलेल्या उमेदवारी मागितली आहे. उद्धव ठाकरे यांचे विचार पटल्याने आणि त्यांचे नेतृत्व मानणारे माजी नगरसेवक, पदाधिकारीही शिवसेनेत प्रवेश करत आहेत. घरवापसीची प्रक्रिया जोरात सुरू आहे. निष्ठावंत, निवडून येण्याची क्षमता असलेल्यांना उमेदवारी दिली जाणार आहे. एकाच प्रभागात तीन ते पाच इच्छुकांनी उमेदवारी मागितली आहे. त्यांनी बंडखोरी करणार नसल्याचे सांगितले आहे. शिवसेना जो उमेदवार जाहीर करेल, त्यांच्या पाठीशी राहणार असल्याचे मुलाखत देणाऱ्या उमेदवारांनी सांगितले आहे. सेनेत कोटा सिस्टीम नाही. हवसे, गवशांना उमेदवारी मिळणार आहे. आमच्याकडे निष्ठावंताची फळी आहे. विधानसभा निवडणुकीत त्याचा प्रत्यय आला आहे. मंगळवारीही निलम गोऱ्हे यांच्यासह पदाधिकारी मुलाखती घेतील. इच्छुकांची यादी कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांना देण्यात येईल. निवडणूक जाहीर झाल्यावर उमेदवार यादी प्रसिद्ध केली जाईल.'
खासदार राऊत म्हणाले, 'कोणीही बंडखोरी करण्याचा प्रयत्न करू नये. पक्षाकडून योग्य व्यक्तींना संधी दिली जाईल. ज्याला संधी पक्ष देईल त्याच्या पाठीमागे इतर कार्यकर्त्यांनी आपली ताकद लावावी. अन्य पक्ष आम्हाला खिंडीत पकडण्याचा प्रयत्न करीत आहेत. पण शिवसेना स्वबळावर लढणार आहे. केंद्र आणि राज्यात शिवसेना व भाजपमध्ये समन्वय असल्याने तसा कोल्हापुरातही व्हावा असा आमचा प्रयत्न होता. मात्र त्याला यश आले नाही. त्यांनी आपमतलबी मताचे नाटक केल्याने आम्ही स्वबळावर लढणार आहे.'
मुश्रीफ सैरभैर झालेत
शिवसेनेवर आमदार हसन मुश्रीफ टीका करीत असल्याबद्दल विचारणा केली असता खासदार राऊत म्हणाले, 'मुश्रीफ हे सैरभैर झाले आहेत. ते स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. रविवारी ते महाडिक यांच्यावरही घसरले होते. सैरभैर झाल्यामुळेच मुश्रीफ सध्या शिवसेनेवर टीका करीत आहेत. मात्र हा त्यांचा सगळा प्रयत्न स्वतःकडेच लक्ष वेधून घेण्यासाठी आहे.'
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट