सत्ता जवळ असली की सत्ताधीश वेगवेगळी अमिषे दाखवतात. कोल्हापूरला स्मार्ट सिटीचे अमिष दाखवून काही पक्ष मतांचा सट्टा लावू पाहात आहेत. नागरिकांनी अशा अमिषांना बळी पडू नये, असे सांगत खासदार विनायक राऊत यांनी रविवारी नाव न घेता भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष्य दानवेंवर निशाणा साधला. शिवसेनेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यामध्ये ते बोलत होते. तोरस्कर चौकामध्ये आयोजित करण्यात आलेल्या या मेळाव्यावेळी आमदार राजेश क्षीरसागर उपस्थित होते.
राऊत म्हणाले, 'जनतेने वर्षभरापूर्वी परिवर्तनाच्या अपेक्षेने केंद्रात व राज्यामध्ये सत्ताबदल केला होता. मात्र, अद्यापही जनतेला अपेक्षित असलेले परिवर्तन घडू शकलेले नाही, हे खेदाने नमूद करावे लागते. काँग्रेस व राष्ट्रवादीने पाडलेले चुकीचे पायंडेच सध्या सत्तेमध्ये असणारी मंडळी पुढे चालवत आहेत. पंचगंगा शुद्धिकरणासाठी अद्याप निधी मंजूर झालेला नाही. टोलमुक्तीचा प्रश्नही भीजत ठेवण्यात आला आहे. कोल्हापूरसारख्या शहराचे परिवर्तन करायचे असल्यास वीस कोटींचा निधी पुरेसा नाही. हे चित्र बदलण्यासाठी शिवसेनेकडे एकहाती सत्ता येणे गरजेचे आहे.' या वेळी एकाच कुटुंबातील सदस्य वेगवेगळ्या पक्षामध्ये असल्याबद्दलही राऊत यांनी यावेळी टीका केली.
आमदार क्षीरसागर यांनी मागील पाच वर्षांत शहराच्या खुंटलेल्या प्रगतीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस यांना लक्ष्य केले. शिवसेना महानगरपालिकेत सत्तेवर आल्यास शहरातील रस्त्याबरोबरच शहरातून बाहेर जाणाऱ्या रस्त्यांच्या चौपदरीकरणासाठी प्रयत्न करू, तसेच शहरातील विमानसेवा व रेल्वेसेवा यामध्ये तातडीने सुधारणा करू, असे आश्वासन क्षीरसागर यांनी दिले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट