बाळासाहेब पाटील
जागतिकीकरणात सर्वत्र फॅसिस्ट प्रवृत्ती वाढताहेत. भारतात अलीकडच्या काही दिवसांत या शक्तींना राजकीय सत्तेचे बळ मिळाले आहे. लोकशाहीचे अंकूर खुडण्याचे धाडस या शक्ती करीत आहेत. विवेकवादी विचारांच्या माणसांची त्यांना भीती वाटतेय. परंतु, फॅसिझमचा हा उन्माद उतरविण्याची ताकद लोकशाहीतच आहे, असा ठाम विश्वास शाहीर संभाजी भगत यांनी 'मटा'शी बोलताना व्यक्त केला.
विवेकवाद्यांच्या हत्या झाल्यानंतरच्या एकूण परिस्थितीकडे कसे बघता?
उत्तर : अशा हत्या होणे हे संवेदनशील घटकांना हादरवून सोडणाऱ्या आहेत. त्यामुळे सामान्य माणसांना प्रश्न पडतो की लिहिणारे, बोलणारे, जागृती करणाऱ्यांना का मारले जाते? त्यांच्या हातात चाकू, सुरा, बंदुका नाहीत तरीही ते तुम्हाला डेंजर का वाटताहेत? माणसांना का मारले जातेय हा मोठा प्रश्न पडला आहे. कलाकार, बुद्धीवादी लोकांमध्ये दहशत निर्माण करण्याचे काम फॅसिस्ट लोक नेहमी करतात. भारतात लोकशाही आहे असे वाटते, तरीही असे कसे काय मारू शकते असे वाटते. पण, महाराष्ट्रात वातावरण चांगले होते. भांडवलशाहीचा विकास होतो, मक्तेदारी केंद्रित होते, तीही काही लोकांच्या हातातच. तेव्हा छोट्या छोट्या देशांमध्ये लोकशाहीचा अवकाश लहान होत जातो. कुठला पक्ष सत्तेवर आहे याला जास्त महत्त्व नसते. एक विशिष्ट वर्ग या सगळ्या गोष्टी नियंत्रित करत असतो, अशा वेळी फॅसिस्ट लोकांना नेहमी बंदुकांची, चाकू, सुऱ्यांची भीती वाटत नाही. ते त्यातले नसतात. त्यांना भीती वाटते ती विचारांची. विवेकाची भीती वाटते. आपण टाकलेली भूल एवढी मजबूत असते की ती भूल उतरवण्याचे काम विवेक करतो. खरा शिवाजी कळला तर, खरा विज्ञानवाद, बुद्धिप्रामाण्यवाद कळला तर... लोक आपल्याला प्रश्न विचारतील या भयगंडातून हत्या होतात. या हत्या समझदारीने, ठरवून केलेल्या आहेत. ज्यावेळी प्रतिक्रांतीला सुरूवात होते, तेव्हा असे खून झालेले आहेत. समाजाला हा एक प्रकारचा इशारा असतो. आपण फॅसिझमच्या दिशेने चाललेलो आहे हे स्पष्ट होत आहे. गेल्या २०-२५ वर्षांत ते अधिक गतीने काम करत आहे. बाबरी मशिदीवरील हल्ला हा काही मशिदीवर नव्हता. येथे जी काही लोकशाही मूल्ये रूजत होती तिचे अंकूर खुडून टाकण्याचे कारस्थान या हल्ल्यात झाले. जागतिकीकरणाच्या जगात संकुचित फॅसिझम रुजताना दिसतो आहे. विशिष्ट लोकांना दुय्यम स्थान देण्याचे काम, लोकशाहीने दिलेले हक्क काढून घेण्याचे काम कोणतेही हत्यार न वापरता सुरू आहे. हा फॅसिझमचा उन्माद आपल्याला सोशल मीडियातून दिसतोच आहे. जे दबक्या आवाजात सुरू होते ते आता खुलेआम बोलले जाऊ लागले आहे.
हिदुत्वाच्या मुद्द्यावर शेषराव मोरे यांनी मांडलेले मुद्द्यांबाबत काय सांगाल?
उत्तर : अंदमानमध्ये विश्व साहित्य संमेलनात शेषराव मोरेंनी मांडलेले मुद्दे काही आश्चर्यकारक नाहीत. ते दुसरं काही बोलू शकत नाहीत. सत्ता आली की लहान मोठे घटक बोलायला लागतात. त्यांना बळ येणारच ना? हा काही एकट्या मोरेंचा विषय नाही. त्यांच्यासारख्यांनी बाबासाहेबांना देशद्रोही ठरवले, फुल्यांवर जहरी टीका केली. आता आमच्यासारख्यांना बोलतात त्यावेळी आम्ही एकच विचार करतो की जर महामानवांना अशी टीका सहन करावी लागली असेल तर आम्ही 'किस झाड की पत्ती...?' शेषराव मोरेंचे जे वक्तव्य आहे हे फॅसिझमचा पुरस्कार करणाऱ्यांचे नेतृत्व आहे. आत्ता सत्ता आल्याने त्यांना स्फुरण चढले आहे.
आम्ही मांडू तोच इतिहास खरा, असा अट्टाहासही दिसतोय...
उत्तर : बाबासाहेब पुरंदेरेंनी जो शिवाजी मांडला त्याला ते इतिहास लेखन म्हणतात. पण, ज्यांना इतिहास कळतो ते त्याला ललित शिवचरित्र असा शिक्का मारतील. सांस्कृतिक अधिसत्ता नेहमी प्रतिकांना आपलेसे करत असतात. बाबासाहेब आबेडकरांच्या बाबतीतही झाले. ही राष्ट्रवादाची प्रतिके म्हणून हायजॅक केली. महात्मा फुले, डांगे, शाहीर अमर शेख यांनी शिवाजी मांडल्यानंतर शिवाजी महाराजांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. बुद्धिवादी लोकांनी खूप संशोधन केले. शेतकऱ्यांची मुले शिकायला लागल्यानंतर त्यांना खरा शिवाजी कळायला लागला. त्यांनी सांगायला सुरुवात केली. नवा शिवाजी कळला तर तो सांगितलाच पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांनी जसा अस्पृश्य निवारणाच्या चळवळीत जसा समतोल आणला तसा कॉ. गोविंद पानसरेंनी शिवाजी महाराज मांडताना आणला. खरा शिवाजी सांगायला सुरू केल्यानंतर त्यांचा खून झाला. त्यांना भीती होती की खरा शिवाजी लोकांना कळेल. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना प्रत्यक्षात मारता आले नाही, मात्र, त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचा खून केला गेलाय. काही लोकांना शारीरिकदृष्ट्या मारू शकत नाहीत मग त्यांच्या मृत्यूनंतर त्यांना स्वीकारतात, त्याला देवत्व देतात आणि त्यांचे भक्तगण त्यांचा खून करतात. पानसरेंनी शिवाजी महाराज माणूस म्हणून मांडले. शिवरायांना संपवता आले नाही. मग त्यांना स्वीकारले आणि त्यांना प्रतिगामी इंजेक्शन देऊन मांडायला सुरूवात केली. अशा संपत चाललेल्या माणूसपणाला पुन्हा माणसात येण्याची प्रक्रिया सुरूच असते. प्रतिकांची खेचाखेची सातत्याने सुरू असते. कारण त्या प्रतिकांच्या आड उभे राहून राज्य करायचे असते. आपण शाहू, फुले, आंबेडकरांचे नाव घेऊन राजकारण करायचे कारण असे की, सर्वसामान्य माणूस या तिघांच्या जवळचा आहे.
विवेकवाद्यांची हत्या होत असताना सत्य मांडताना गोळ्यांची भीती वाटत नाही?
उत्तर : एखादे काम हातात घेतल्यानंतर त्याचे परिणाम माहीत आहेत. मग भीती कशाची? ज्या काळात मी काम करतोय तेथे काहीही होऊ शकते. म्हणून घाबरून काही न करता घरात बसून चालणार नाही. खूप अंधाराच्या काळात माणसांनी उभा राहिले पाहिजे. नाही उभे राहिले तर अधिक गंभीर परिस्थिती निर्माण होईल. आपण काही महामानव नाही. मी रस्त्यावर गाणारा माणूस आहे. आज अशी परिस्थिती आहे की, आपण गप्प बसलो तरी आपल्याला मारणारच आहेत. फॅसिझमचा काळ येतो तेव्हा लहान मोठे कलाकार निशाण्यावर असतात. फॅसिझमच्या काळात मुस्कटदाबी होते. त्यावर मात करण्याचीही तयारी ताकदीने ठेवली पाहिजे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट