जिल्हाधिकारी कार्यालयाचे नवे बांधकाम उमेदपुरी येथील विकास आराखड्यातील एका रस्त्याला अंशतः बाधित होत असल्याचे प्रजासत्ताक सामाजिक सेवा संस्थेने मंगळवारी उघड केले. त्याचबरोबर नव्या बांधकामाचे भोगवटा प्रमाणपत्र नसताना त्या इमारतीचा बेकायेदशीर वापर सुरू असल्याचा आरोपही केला. त्यामुळे महापालिकेच्या यंत्रणेने तातडीने रस्त्याच्या परिसरातील मोजणी करुन घेतली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दक्षिणेकडील नव्या इमारतीच्या प्रवेशद्वाराने व संरक्षक भिंतीने विकास आराखड्यात त्या परिसरातून आखण्यात आलेल्या २० मीटर रुंदीच्या रस्त्याला बाधित होत असल्याचे संस्थेचे अध्यक्ष दिलीप देसाई यांचा आरोप आहे. त्यानुसार त्यांनी जिल्हाधिकारी, आयुक्त, नगररचना विभागाचे सहायक संचालक, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांना निवेदन दिले. उमेदपुरी येथून जयंती नाला पंपिंग स्टेशनपुलापर्यंत हा रस्ता आहे. यावर काही ठिकाणे अतिक्रमणे, अनाधिकृत बांधकामे, बेकायदा भराव टाकण्यात आला आहेत. त्याचबरोबर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीचे व संरक्षक भिंतीचे बांधकामही अंशतः बाधित होत आहे. रस्त्यासाठी आवश्यक जागा सोडल्याचे दिसून येत नसल्याचा आरोप देसाई यांनी निवेदनात केला आहे. याबरोबरच अजून त्या इमारतीचे भोगवटा प्रमाणपत्र दिलेले नसताना बेकायदेशीरपणे त्या इमारतीचा वापर सुरू आहे. त्याचे उदघाटन होत आहे. हा प्रकार कायद्याचा भंग करणारा असून दखलपात्र गुन्हाही असल्याचे नमूद केले आहे.
विकास आराखड्याप्रमाणे तो रस्ता खुला झाल्याशिवाय इमारतीला भोगवटा प्रमाणपत्र देण्यात येऊ नये. या रस्त्याची पाहणी करुन त्याचे मार्किंग करण्यात यावे. तसेच रस्त्यावरील बांधकामे त्वरीत हटवून तो रस्ता खुला करावा अशी मागणी केली आहे. त्यामुळे याबाबत वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महापालिकेच्या यंत्रणेने तातडीने त्या रस्त्याची मोजणीही सुरू केली होती.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट