म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
कोल्हापूर शहरातील मुलींच्या जन्मदाराचे सर्वाधिक प्रमाण असल्याबद्दल कौतुकास पात्र ठरलेल्या कसबा बावड्यातील हनुमान तलाव या प्रभागात स्मशानभूमी, सार्वजनिक शौचालये, झोपडपट्टीधारकांच्या प्रॉपर्टीकार्डाचा प्रश्न गंभीर बनला आहे. भागातील ३० ते ४० वर्षापूर्वी जुन्या असलेल्या तब्बल दीडशे शौचालये मोडकळीस आली आहेत. महिन्याकाठी केवळ २५ हजार रूपयांच्या तुटपुंज्या निधीत या सार्वजनिक शौचालयांची देखभाल शक्य नसल्याने अवस्था बिकट झाली आहे. १०० फूटी डीपीरोडमध्ये स्मशानभूमीची जागा गेली आहे. तर स्मशानभूमीतील रक्षा थेट पंचगंगा नदीत मिसळत असल्यामुळे हा धोका वाढला आहे. गेल्या तीन वर्षापासून स्मशानभूमीचे काम रखडले आहे.
या प्रभागातील संकपाळ नगर, निगवे नाका, दत्तमंदिर अशा तीन झोपडपट्ट्यांसह आंबेडकरनगर, सावरकर नगर, जय शिवराय कॉलनी, हनुमान तलाव, पिंजार गल्ली, शिंदे गल्ली, वाडकर गल्ली, जयभवानी गल्ली, कागलवाडी, आंबेडकर वसाहत, कसबा बावडा, हनुमान तलाव या भागाचा समावेश या प्रभागात आहे. नगरसेवक संदीप नेजदार या भागात प्रथमच निवडून आले आहेत. त्यांचा संपर्क भागात चांगला आहे. राजाराम बंधाऱ्यापासून ते प्रिन्स शिवाजी शाळेपर्यंत तसेच मूळ गावठाणातील काही गल्ल्यांमध्ये हा प्रभाग विस्तारलेला आहे. त्यामुळे या प्रभागात प्रत्येक नागरिकांशी संपर्क साधून नागरी वस्तीपर्यंत पोहोचताना नगरसेवकाला तारेवरची कसरत करावी लागते. मध्यमवर्गीय व कष्टकरी लोकांची याठिकाणी जास्त वस्ती आहे. प्रभागात (राजाराम बंधाऱ्याजवळ) स्मशानभूमी आहे. स्मशानभूमीवर प्रस्तावित शंभरफुटी रस्ता डीपी रोडच्या जागेत जात असल्याने स्मशानभूमीचे दोन भाग होणार आहेत. त्यामुळे स्मशानभूमीच्या दुरुस्तीकडे म्हणावे तसे पालिकेचे लक्ष नाही. स्मशानभूमीच्या दुरुस्तीसाठी आंदोलने झाली, निधीची घोषणा झाली; परंतु स्मशानभूमीचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. स्मशानभूमीतील राख सध्या थेट पंचगंगा नदीत सोडली जाते. नगरसेवकांनी काही प्रमाणात स्मशानभूमीचे काम केले आहे; परंतु ते अपूर्ण आहे. निधीची कमतरता असल्याचे कारण सांगितले जात आहे. या प्रभागात सुमारे १५० सार्वजनिक शौचालये व दहा मुताऱ्या आहेत. ही शौचालये २५ ते ४० वर्षांपूर्वीची असल्याने मोडकळीस आलेली आहेत. किरकोळ दुरुस्ती करण्याऐवजी ही शौचालये पुन्हा नव्याने बांधण्याची गरज आहे. प्रभागात ठिकठिकाणी दहा मुताऱ्या आहेत. त्यांचीही मोडतोड झालेली आहे. काही मुताऱ्यांना आडोसा नाही. यात प्रभागातील हनुमान तलाव, मिनी चौपाटीचीही काही प्रमाणात दूरवस्था झालेली आहे. नगरसेवकांनी खेळण्यांची दुरुस्ती करून काही ठिकाणी विद्युत बल्ब बसविले आहेत; परंतु तलावातील पाणी मोठ्या प्रमाणात दूषित झाले आहे. तसेच त्या पाण्याच्या बाजूला गवत, झुडपे वाढलेली आहेत. त्यामुळे तलावाच्या सौंदर्याला बाधा येते. रस्ते, पाणीपुरवठा, रस्त्यावरील दिवे यांची स्थिती ठीक आहे मात्र, मोडकळीस आलेली स्मशानभूमी, शौचालये, आंबेडकरनगरमधील खराब झालेले रस्ते दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहेत. प्रभागातील प्रिन्स शिवाजी नगर झोपडपट्टीतील नागरिक प्रॉपर्टी कार्डाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांना ७/१२ मिळावा म्हणून ते प्रतीक्षेत आहेत. नगरसेवकांनी अशा ३७० फाइल्स जिल्हा प्रशासनाकडे सादर केल्या आहेत; परंतु त्यांना अद्याप यश आलेले नाही. प्रभागात अन्य ठिकाणाचे रस्ते चांगले आहेत. पिण्याच्या पाण्याची तक्रार नाही. रस्त्यावरील दिव्यांची सोयही चांगली आहे.
भागात पाइपलाइन टाकून पिण्याचा पाण्याची चांगली सोय केली आहे. दहा लाख रुपयांचे एलईडी बल्ब बसविले आहेत. भागातील रस्ते केले. आंबेडकरनगरमधील रस्ते लवकरच केले जातील. प्रभागात ४८ घरकुल योजना मार्गी लावल्या. दत्तमंदिर, निगवेनाका आणि संकपाळनगर झोपडपट्टीतील ३७० प्रकरणे प्रॉपर्टीकार्डासाठी केली आहेत, मात्र अद्याप ती पूर्ण झालेली नाहीत. लोकवर्गणीतून १६ लाख रूपये निधी उभारून महापालिकेची पहिली शाळा असलेली शिवाजी विद्यालयाचा विकास केला. - डॉ. संदीप नेजदार, नगरसेवक
आंबेडकर उद्यानाचे गेट नादुरूस्त झाल्याने येथे फिरस्त्यांचा सुळसुळाट होण्याची शक्यता आहे. अद्याप पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. २५० फुटावरून पाइपलाइनबाबतही कार्यवाही झालेली नाही. अंतर्गत रस्त्यांबाबत उदासीनता आहे. भागात सार्वजनिक शौचालये आहेत, मात्र त्यांच्या दुरूस्ती आणि स्वच्छतेबाबत कोणतेही काम होत नाही. परिणामी परिसरात दुर्गंधी पसरते. स्मशानभूमीमध्ये शेडची अवस्था वाईट झाली आहे. नागरिकांच्या मुलभूत गरजांबाबत दखल घेतली जात नाही. - धीरज मोरे, नागरिक
इच्छुक उमेदवार - डॉ. संदीप नेजदार, सुरेश पाटील, सुरेश उलपे, सचिन कोटकर.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट