मलेरियामुळे होणाऱ्या मृत्यूंचे सर्वांत कमी प्रमाण कोल्हापूर जिल्ह्यात असल्याने जिल्ह्यातील मलेरिया नियंत्रणाचा अभ्यास राष्ट्रीय पातळीवर केला जाणार आहे. या प्रकल्पाची सुरुवात नुकतीच झाली असून, वर्षभरात जिल्ह्यातील दोन लाख लोकांचे सर्वेक्षण करून त्याचा अहवाल केंद्राला सादर करण्यात येणार आहे.
कोल्हापूरबरोबरच सहा जिल्ह्यांत हे संशोधन सुरू करण्यात आले आहे. त्यामध्ये राजस्थानमधील जयपूर, ओरिसातील कोरापुट, झारखंडमधील छत्रा, कर्नाटकातील दक्षिण कन्नड आणि मध्य प्रदेशातील जबलपूर यांचा समावेश आहे. कोल्हापूर आणि जयपूरमध्ये मलेरियाचे प्रमाण सर्वांत कमी आहे. कोरापुट आणि छत्रामध्ये मलेरियामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. जबलपूर आणि दक्षिण कन्नडमधील प्रमाण मध्यम आहे. वेगवेगळ्या भागातील ही ठिकाणे असल्यामुळे या संशोधनाचा देशभर उपयोग होऊ शकतो. कोल्हापूरमध्ये २०१०पासून एकाही व्यक्तीचा मलेरियामुळे मृत्यू झाल्याची नोंद नाही.
सध्या ४० प्रशिक्षणार्थींचे प्रशिक्षण सुरू आहे. करवीर, भुदरगड आणि हातकणंगले तालुक्यांतील कुटुंबांचा अभ्यास करण्यात येणार आहे. करवीर तालुक्यातील तापाच्या रुग्णांवर वडणगे प्राथमिक आरोग्य केंद्रात तर मृत्यूंबाबत कणेरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात संशोधन होणार आहे.
शहरी आणि ग्रामीण भागातील मलेरियाची नेमकी स्थिती संशोधनामुळे कळणार आहे. कोल्हापूर शहरात विशेषतः झोपडपट्टीत राहणाऱ्या सुमारे ७० हजार लोकांची माहिती घेतली जाणार आहे. संशोधनासाठी प्रथमच अशी माहिती उपलब्ध होणार आहे.
- महेश खलिपे, उपसंचालक, मलेरिया नियंत्रण कार्यक्रम
आरोग्य विभागाशी संबंधित सर्व विभागांशी संपर्क साधून खासगी दवाखाने, प्रयोगशाळा, आरोग्य संघटना यांना पाहणीत सामावून घेतले आहे. ताप आणि मृत्यू याबाबत स्वतंत्र माहिती घेतली जाईल. मलेरियाचा उद्रेक रोखण्यासाठी या माहितीचा उपयोग होईल.
- अश्विनी कुमार, प्रकल्प प्रमुख, एनआयएमआर, गोवा
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट