राज्य सरकारच्या राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचा गेल्या १९ महिन्यांत २० हजार ७९२ रुग्णांना लाभ झाला आहे. या योजनेअंतर्गत ५८ कोटी ७६ लाख रुपयांचा बिले जिल्ह्यातील ३१ हॉस्पिटलना अदा केली गेली आहेत.
दारिद्र्यरेषेखालील (पिवळी शिधापत्रिका) दारिद्र्यरेषेवरील (केशरी शिधापत्रिका), अंत्योदय, अन्नपूर्णा शिधापत्रिका असणाऱ्या कुटुंबातील व्यक्तींना योजनेचा लाभ मिळतो. कोल्हापूर जिल्ह्यात १ नोव्हेंबर २०१३ मध्ये ही योजना सुरू झाली. जिल्ह्यातील ३१ हॉस्पिटल्समध्ये ही सुविधा मिळते. सीपीआर हॉस्पिटलसह शहरातील नामवंत २३ तर ग्रामिण भागातील आठ हॉस्पिटल्सचा योजनेत समावेश आहे.
ज्या रूग्णाला योजनेतून उपचार हवे असतील त्यांनी शिधापत्रिका, मतदान ओळखपत्र, आधारकार्ड घेऊन सरकारने नियुक्त केलेल्या हॉस्पिटलशी संपर्क साधायचा असतो. हॉस्पिटलमधील आरोग्यमित्र या रुग्णांना मदत करतात. ऑनलाइन प्रक्रियेव्दारे रुग्णांची नोंद केली जाते. प्रत्येक हॉस्पिटलमध्ये यासाठी स्वतंत्र कक्ष किंवा कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. रुग्णाच्या आजारासंबधीची कागदपत्रे व रिपोर्ट ऑनलाइन पाठवले जातात. खर्चाला मान्यता आल्यावर उपचार सुरू होतात. प्रारंभी ही योजना किचकट वाटली असली तरी योजनेव्दारे जोडलेल्या हॉस्पिटलला कॅशलेस बिल मिळत असल्याने त्यांच्या खात्यात भारी रक्कम पडत आहे. प्रत्येक आजारासाठी विशिष्ट रक्कम विम्याव्दारे मिळते. राजकीय पक्ष व नेत्यांनी राजीव गांधी आरोग्यदायी योजनेचा लाभ नागरिकांना देण्यासाठी मदत म्हणून स्वतंत्र व्यक्तींची नोंद केली आहे.
योजनेतील ३१ हॉस्पिटलंना रुग्णांना सेवा दिल्याबद्दल ५८ कोटी ७६ लाख रुपये मिळाले आहेत. २१ नोव्हेंबर २०१३ ते २० नोव्हेंबर २०१४ या कालावधीत १२ हजार २३४ रुग्णांवर उपचार केले आहेत. बिलापोटी ३४ कोटी ९० लाख रुपये हॉस्पिटल्सना मिळाले आहेत. २१ नोव्हेंबर २०१४ ते ३१ मे २०१५ अखेर ८५५८ रुग्णांना योजनेचा लाभ झाला आहे. २३ कोटी ८६ लाख ८३ हजार रुपयांचे बिल हॉस्पिटलला मिळाले आहे.
९७१ आजारांवर मदत
या योजनेअंतर्गत ९७१ आजारांवरील उपचारांसाठी विम्याव्दारे मदत मिळते. कर्करोग, किडणी, कान, नाक घसा, पोटाचे आजार, हाडांचे आजार, लहान मुलांचे आजार यासह छोट्या व मोठ्या आजारांवर उपचार, शस्त्रक्रिया व औषधांसाठी मदत मिळते.
कोल्हापूर जिल्ह्यात शहर व ग्रामिण अशा दोन विभागात योजना राबवण्यासाठी सीपीआर हॉस्पिटलमध्ये समन्वयक आहेत. योजनेचा लाभ घेण्यात कोल्हापूर जिल्ह्याचा चौथा क्रमांक आहे. मुंबई, औरंगाबाद, अहमदनगर हे जिल्हेही योजनेचा लाभ घेण्यात आघाडीवर आहेत.
- डॉ. अशोक देठे, जिल्हा समन्वयक, राजीव गांधी आरोग्यदायी योजना
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट