गर्भवती माता व बालमृत्यू यांचे प्रमाण अत्यल्प होण्यासाठी सरकारी आरोग्य यंत्रणा मोठ्या प्रमाणावर प्रयत्नशील आहेत. त्याचे फलित म्हणून सातारा जिल्ह्यातील गरोदर मातांचा मृत्यूदर कमी झाला आहे. त्यामुळे जिल्हा आरोग्य यंत्रणेला आपल्या कामाची पोच पावती मिळाली आहे.
राज्यस्तरावर गर्भवती माता आणि नवजात बालकांचे संगोपन व संवर्धन करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. गर्भधारणा झाल्यानंतर गर्भवतींना आवश्यक असणाऱ्या आरोग्य विषयक सेवा, औषधोपचार व संतुलित आहार यांची सरकारी पातळीवर तपासणी केली जाते. गरोदर महिलांना वेळोवेळी आरोग्य तपासणी करावी लागते. तालुका व जिल्हा सरकारी रूग्णालयात त्यांची आरोग्य तपासणी करून आवश्यकती औषधे देण्यात येतात. मोफत आरोग्यसेवा, सल्ला व मार्गदर्शन केले जाते. ग्रामीण भागातील जिल्हा उपकेद्रांमार्फत गर्भवतींना आरोग्यविषयक सुविधा पुरविल्या जातात. मात्र, प्रा. आ. केंद्रे अजूनही औषधांच्या बाबतीत दुबळी असल्याचे दिसून येत आहे. सध्या राज्यस्तरांवर गर्भवती मातांच्या संगोपनासाठीच्या जननी सुरक्षा योजना राबविलेल्या आहेत. प्रसुतीनंतरही त्यांच्या संगोपनासाठी त्यांना आर्थिक मदतीचा धनादेशही दिला जातो.
इतर कारणांनीही माता मृत्यू
माता गरोदर असल्यापासून प्रसूतीनंतरच्या ४५ दिवसांपर्यंत आवश्यक त्या सर्व आरोग्य विषयक सेवा सुविधा पुरवल्या जातात. त्यामुळे गरोदर मातांच्या मृत्यूचे प्रमाण घटले आहे. सातारा जिल्ह्यात २०१३मध्ये २६, २०१४ मध्ये १३ गरोदर मातांचा मृत्यू झाला आहे. तर जानेवारीपासून ते एप्रिल २०१५अखेर एकाही गर्भवती मातेचा मृत्यू झालेला नाही. प्रबोधनाचा अभाव असल्यामुळे गर्भवती मातांचा मृत्यू होत असेल तर उच्च रक्तदाब, निगेटिव्ह रक्तगट असणे तसेच गरोदरपणामध्ये येणारे झटके, रक्तातील आवश्यक घटकांची उणीव असलेल्या महिलांचा मृत्यूमध्ये समावेश होतो. अशा महिलांना तातडीने उपचार मिळणे गरजेचे असते.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट