कोल्हापूर परिक्षेत्रातील पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबईत पोलिस उपनिरीक्षकाने पोलिस निरीक्षकांवर केलेल्या गोळीबाराच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला आहे. सरकारी रूग्णालयात ही तपासणी होणार असल्याने पोलिसांची तपासणी सरकारी पध्दतीने होणार की वस्तूनिष्ठपणे होणार याबाबत शंका उपस्थित केली जात आहे.
मुंबईत वाकोला पोलिस ठाण्याचे निरीक्षक विलास जोशी यांच्यावर उपनिरीक्षक दिलीप शिर्के यांनी गोळीबार केला. जोशी यांचे शनिवारी उपचार सुरू असताना निधन झाले. या घटनेने पोलिस दलातील ताणतणावाचे स्वरूप उघड झाले. वाढती लोकसंख्या, अपुरे पोलिस कर्मचारी, तपासाचे ओझे आणि बंदोबस्तामुळे पोलिसांवर कामाचा ताण पडत आहे. त्यांना रजा मिळत नसल्याने व तणावाच्या काळात सुट्याही मिळत नसल्याने पोलिस कर्मचारी व अधिकाऱ्यांत सातत्याने वाद होत असतात. मुंबईतील घटनेतही पोलिसांतील ताण ठळकपणे नजरेस आल्याने कोल्हापूर परिक्षेत्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्याचा निर्णय विशेष पोलिस महानिरीक्षक संजय वर्मा यांनी घेतला आहे.
तपासणी 'सरकारी' नको
पोलिसांची आरोग्य तपासणी सरकारी रूग्णालयात होणार आहे. सरकारी रूग्णालयातील पायाभूत सुविधा व तज्ज्ञ डॉक्टरांची वानवा पाहता पोलिसांची आरोग्य तपासणी 'सरकारी तपासणी' होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. चांगल्या हॉस्पिटलशी पोलिस प्रशासनाचा करार झाला आहे. अशा हॉस्पिटलमध्ये तपासणी झाल्यास पोलिसांच्या आरोग्याची तपासणी खऱ्या अर्थाने होईल, अशी चर्चा कर्मचाऱ्यांत सुरू आहे.
वाढत्या लोकसंख्येमुळे गुन्ह्यांचे प्रमाण वाढले आहे. तपासासाठी वेळेचे बंधन नसल्याने पोलिस कर्मचारी दिवसरात्र काम करतात. त्यातून पोलिसांत नैराश्य येते. पोलिस कर्मचारी व अधिकाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात येईल. तणावग्रस्त पोलिसांची स्वतंत्र यादी केली जाईल. त्यांच्यासाठी मानसोपचारतज्ज्ञांची मदत घेतली जाईल. अशा पोलिसांचे कौन्सेलिंग करण्यात येईल.
- संजय वर्मा, विशेष पोलिस महानिरीक्षक
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट