शहरापासून दहा किलोमीटरच्या परिसरातील गावांचा हद्दवाढीचा प्रस्ताव तयार करण्याची प्रक्रिया महापालिकेने आता बाजूला ठेवत महापालिका आता दोन किलोमीटरच्या परिसरातील गावांच्या हद्दवाढीचा प्रस्ताव तयार करणार आहे. यामुळे नवा प्रस्ताव राज्य सरकारकडे मंजुरीसाठी तातडीने पाठवणे शक्य होईल.
शहराची हद्दवाढ झाली नसल्याने यापूर्वी दोन प्रस्ताव तयार करण्यात आले होते. त्यामधील एक ४२ गावांचा तर नुकताच राज्य सरकारने रद्द केलेला १७ गावांचा हद्दवाढीचा प्रस्ताव होता. या दोन्हीमध्ये 'एमआयडीसी'सह अनेक मोठी गावे होती. नव्या सरकारने १७ गावांचा प्रस्ताव नामंजूर केल्यानंतर पालिकेच्या पदाधिकारी व नगरसेवकांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली होती. त्यावेळी शहराच्या हद्दीवरील मोजक्याच गावांचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना पाटील यांनी दिल्या होत्या. पण महापालिकेनेच पाच व दहा किलोमीटरपर्यंतच्या गावांची माहिती संकलित करण्याचा प्रयत्न केला. या सर्व गावांची माहिती घेऊन त्याचा प्रस्ताव तयार करण्याची प्रक्रिया वेळखाऊ आहे. तसेच ४२ आणि १७ गावांचा प्रस्ताव यापूर्वी नामंजूर केलेला असताना आता ९३ गावांचा पाठवायचा हेही न पटण्यासारखे होते. त्यामुळे पालिकेने आता एक ते दोन किलोमीटरच्या अंतरातील गावांचा प्रस्ताव तयार करण्यास सुरुवात केली आहे.
दहा गावांचा समावेश शक्य
याबाबत नगररचना विभागाचे सहाय्यक संचालक धनंजय खोत यांनीही दहा किलोमीटरच्या परिसरातील ९३ गावांचा प्रस्ताव तयार करण्यास बराच वेळ लागणार असल्याचे सांगितले. त्यामुळे आता तो प्रयत्न सोडून नजीकच्या गावांचा प्रस्ताव तयार करण्यात येत आहे. नव्या प्रस्तावानुसार शिंगणापूर, बालिंगा, कळंबा, पाचगाव, मोरेवाडी, कंदलगाव, उचगाव, सरनोबतवाडी, उजळाईवाडी, गांधीनगर अशा गावांचा समावेश होऊ शकतो.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट