कोल्हापूर जिल्ह्यातील महत्त्वाचे, पण दुर्लक्षित राहिलेल्या भात पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांचा सहकाराच्या माध्यमातून विकास होणार आहे. भाताची खरेदी, त्यावर प्रक्रिया करून पोहे तयार करणे आणि या पोह्यांची विक्री व्यवस्था उभारण्यापर्यंतची साखळी सहकारी संस्थांच्या माध्यामातून करण्याचे नियोजन आमदार सुरेश हाळवणकर यांनी केले आहे.
शेती हा कोल्हापूर जिल्ह्याच्या अर्थकारणाचा आणि समाजजीवनाचा कणा आहे. पण शेतीमालावर प्रकिया करण्यात मात्र जिल्हा मागेच राहिला आहे. साखर, गूळ, दूध सोडले तर कोल्हापुरात प्रकियाउद्योग उभे राहू शकलेले नाहीत. कोल्हापूर जिल्ह्यातील १ लाख हेक्टर क्षेत्रावर भात पीक घेतले जाते. उसाच्या खालोखाल भात पिकाचे क्षेत्र आहे. विशेषत: जिल्ह्यातील पश्चिम भागात, सह्याद्रीच्या डोंगरांगात भात मोठ्या प्रमाणावर घेतला जातो.
हाळवणकर म्हणाले, 'उसावर प्रकिया करणारे साखर कारखाने उभे राहिल्यामुळेच ऊसकरी शेतकऱ्यांना चांगले दिवस पाहता आले. त्याच धरतीवर भातावर प्रकिया करता येऊ शकते. भातपासून बनणारे पोहे घरोघरी लागतात, त्याचा लाभ शेतक ऱ्यांना मिळावा असे प्रयत्न करण्यात येणार आहेत. काही साखर कारखान्यांनी ऊस पीक विकास कार्यक्रम राबवले त्यांचा फायदा शेतकऱ्यांना झाला आहे. त्याच धरतीवर पोहे बनवण्यासाठी लागणाऱ्या भाताचे बियाणे शेतकऱ्यांना उपलब्ध करून देणे, त्यांना पीक घेण्यासाठी सहकार्य करणे असे कार्यक्रमही हाती घेता येतील.'
सहकारी संस्था स्थापून शेतकऱ्यांकडून भात विकत घ्यायचे आणि त्यापासून पोहे बनवयाचे, तसेच या पोह्यांचे मार्केटिंगही करायचे यासाठी संस्था उभारण्यासाठी हाळवणकर यांनी पुढाकार घेतला असून त्यासंदर्भात प्राथमिक चाचपणी सुरू आहे.
हाळवणकर म्हणाले, 'सर्वसाधारपणे भात पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती फारशी चांगली नाही. प्रक्रिया उद्योगांतून भात पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांना आधार देता आला तर निश्चितच शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावेल. जिल्ह्याच्या विकासातही याचा नक्कीच हातभार लागेल. सर्वसाधारणपणे हाच विचार मका पिकासाठी करता येईल. इचलकरंजीतील वस्त्रोद्योगाला लागणारा स्टार्च मक्यापासून बनतो. स्टार्चला मागणीही मोठी आहे. स्टार्च निर्मिती सहकारी संस्थांच्या माध्यमातून करता येईल. त्यातून शेतकऱ्यांच्या पिकाला चांगला दर मिळवून देता येईल.'
कष्टाचे पीक
भात पीक घेणे हे अधिक कष्टाचे असते. कामगारांची कमी उपलब्धता, महाग झालेली खते अशा समस्या भात उत्पादकांसमोर आहेत. पुरेसा दर मिळत नसल्याने बरेच शेतकरी भात पीक फक्त घरगुती वापरासाठी घेतात. कोल्हापुरातील डोंगररांगात भातपीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट