पलूस तालुक्यातील चोपडेवाडीत सोमवारी मगरीने ओढून नदीत नेलेल्या अजय शहाजी यादव (वय १३) याचा मृतदेह मंगळवारी सकाळी पाण्यावर तरंगताना सापडला. मगरींचा मुक्काम असलेल्या हाळ (महावीरनगर) भागात सकाळी शोध कार्य सुरू केल्यानंतर शोधपथकाला अजयचा मृतदेह पाण्यावर आल्याचे दिसले. आजअखेर जितक्या माणसांचा मगरीने बळी घेतला, त्या सर्वांचे मृतदेह सापडल्याने मगर माणसाचा जीव घेते. पण ती खात नाही, असा दावा करण्यात येत आहे.
मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास अजयचा मृतदेह सापडल्यानंतर त्याच्या डाव्या खांद्याजवळ आणि बरगडीजवळ मगरीने पकडल्याच्या जखमा आढळल्या. त्यानंतर वन विभागाचे अधिकारी, तलाठी, पोलिसांच्या उपस्थितीत शवविच्छेदन केल्यानंतर त्याच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. वन विभागाने नदीकाठच्या प्रत्येक पाणवठ्यावर फलक लावून मगरींपासून सावधान राहण्याचे आवाहन केले आहे. परंतु, ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला नदीवर जाण्याशिवाय पर्यायच नाही. म्हणून वन विभागाला जबाबदारी टाळता येणार नाही. संबधित मगरींचा बंदोबस्त करण्याची उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे स्थानिकांनी सांगितले.
मगरीची दहशत कायम
मंगळवारी सकाळी सांगलीत नदीकाठी एकत्र आलेल्या नागरिकांनी मगरींचा बंदोबस्त करण्याची मागणी करत वन विभागाने नदीकाठी लावलेले फलक फाडून टाकले. शहराच्या ठिकाणी कृष्णेत मगरीचा वावर इतका वाढला आहे की, पावलो पावली मगरीचे दर्शन होत आहे. आजवर असा मगरीचा वावर होत नव्हता. मगरीने कृष्णाकाठ धास्तावला आहे. वन विभागाने नेमलेले दोन कर्मचारी नागरिकांना केवळ आवाहन करण्यापलिकडे काहीच करू शकत नाहीत., असा दावा करत नागरिकांनी मगरींचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट