चोपडेवाडी (ता. पलूस) येथे कृष्णा नदीत तेरा वर्षांच्या मुलाला मगरीने ओढून नेले. सयाजी शहाजी यादव, असे त्या मुलाचे नाव आहे. तो आई-वडिलांच्याबरोबर नदीवर गेला होता. सोमवारी सकाळी आठ वाजता ही घटना घडली. सायंकाळपर्यंत त्याचा शोध सुरू होता. दोन महिन्यांतील ही दुसरी घटना आहे, त्यामुळे नदीकाठावरील गावांत खळबळ उडाली आहे.
जिल्ह्यातील कृष्णेच्या पात्रात मगरींचा वावर वाढल्याची केवळ चर्चाच होत होती. मात्र, या मगरी नागरिकांच्यावर जीवावर उठल्या असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. चोपडेवाडीतील मुलगा अजय यादव हा सोमवारी सकाळी आई-वडिलांबरोबर नदीवर गेला होता. आई-वडील धुणे धुण्यात मग्न होते. त्या वेळी अजय नदीत डुबक्या घेत होता. वडील धुतलेले धुणे वाळत टाकण्यासाठी पाण्यातून बाहेर आले. त्याचवेळी अन्य दोन महिला तेथे येत होत्या. त्यांच्या देखतच मगरीने अजयवर झडप घालून त्याला पाण्यात ओढून नेले. त्या महिलांचा आरडाओरडा ऐकूण गावकरी धावले. तेथील बोटीतूनही लोकांनी अजयचा शोध घ्यायला सुरुवात केली. पण, तो सापडला नाही. तेथून काही अंतरावरील लोकांना मगर त्याला मुलाला तोंडात धरुन जात असताना दिसली. त्यामुळे शोधपथकाने तिकडे धाव घेतली. सांगलीतील हेल्पलाईन टीम, वनाधिकारी घटनास्थळी पोहचले आहेत. शोध पथकाला मगर अधून-मधून दिसते. पण, तिने ओढून नेलेला मुलगा मात्र सायंकाळपर्यंत सापडला नव्हता. दिवसेंदिवस हिंस्त्र होत चाललेल्या मगरींचा बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. दोन महिन्यांतील ही दुसरी घटना आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट