उन्हाच्या झळांनी सोलापूरकरांची पुरती दैना उडाली आहे. उन्हामुळे शहरवासियांना घराबाहेर पडणेसुद्धा मुश्कील झाले आहे. झळांनी वाहनधारकसुद्धा हैराण झाले आहे. एरव्ही वाहनांच्या गर्दीने फूलून जाणारे रस्ते सामसूम दिसत आहेत. बाजारपेठांवरही परिणाम झाला असून, बाजारपेठाही ओस पडल्या आहेत. पत्र्यांच्या घरांत राहणाऱ्यांची झोप उडाली आहे. वातानुकूलीत यंत्रणाही कडक उन्हापुढे तोकडी पडत आहे. उन्हाच्या चटक्यांनी सोलापूरकरांच्या अंगाची लाही लाही होत आहे.
उन्हामुळे रस्ते प्रचंड तापले आहेत. वाहनधारकांचे सर्वाधिक हाल होत आहेत. उन्हाच्या झळांमुळे वाहनधारकांना घराबाहेर पडताना तोंडाला पांढरा रुमाल बांधूनच बाहेर पडावे लागत आहे. दुचाकी वाहन चालविणे तर अधिकच त्रासदायक ठरत आहे.
कडक उन्हाचा परिणाम शहरातील प्रमुख बाजारपेठांवरही झाला आहे. लग्नसराईचे दिवस सुरू असूनही, बाजारपेठा ओस पडल्या आहेत. नवी पेठ, मधला मारुती, टिळक चौक, सराफ बाजार, कुंभारवेस, फलटण गल्ली, चाटी गल्ली आदी ठिकाणांच्या दुकानांमध्ये दुपारी कोणीही फिरकताना दिसत नाही.
गर्दीने फुलून जाणारे शहरातील रस्तेही उन्हामुळे ओस पडले आहेत. सात रस्ता, पार्क चौक, भैय्या चौक, विजापूर रोड, होटगी रोड, एसटी स्थानक, पुणानाका, तुळजापूर रोड, मार्केट यार्ड आदी रस्त्यांवरील वाहनांची गर्दी पूर्णपणे ओसरली आहे. सकाळी सात वाजल्यापासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत उन्हाचा तडाखा कायम असतो. अनेक जणांनी घरामध्ये कुलर तसेच वातानुकूलीत यंत्रणा बसवली आहे. परंतु, यंदाच्या उन्हाळ्याने वातानुकूलीत यंत्रणेलाही हात टेकायला लावले आहेत. उन्हामुळे हवा गरम झाल्यामुळे एसी आणि कुलरमधूनही गरम हवा बाहेर पडू लागली आहे.
जलतरणसाठी गर्दी
उन्हाळा सुरू झाल्यानंतर सर्वांना वेद लागतात ते पोहण्याचे. ज्याला पोहोता येते तो आणि ज्याला पोहता येत नाही परंतु, शिकण्याची इच्छा आहे, अशी लहान-मोठी मुले जलतरण तलावावर गर्दी करताना दिसत आहेत. वीर सावरकर आणि मार्कंडेय या दोन्ही तलावावर पोहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट