म. टा. वृत्तसेवा, सातारा
'रयत शिक्षण संस्थेने स्वायत्त होण्याच्या दृष्टीने पावले टाकली असून, रयतची वाटचाल क्लस्टर युनिव्हर्सिटीच्या दिशेने सुरू झाली आहे. टप्याटप्प्याने ही प्रक्रिया पूर्ण होईल. पहिल्याच टप्प्यात शिवाजी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील पहिले स्वायत्त महाविद्यालय म्हणून साताऱ्याचे धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालय लवकरच जाहीर होईल,' अशी माहिती रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ. अनिल पाटील यांनी दिली.
डॉ. अनिल पाटील म्हणाले, 'मराठी शाळांचा दर्जा टिकवणे ही अत्यंत अवघड गोष्ट झाली आहे. इंग्रजी शाळांमध्ये आपली मुले शिकली तरच त्यांना भवितव्य आहे, अशी पालकांची भावना झाली आहे. त्या शिक्षणासाठी किती खर्च येतो याचा विचार न करताच इंग्रजी माध्यमाला प्रवेश घेणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. आपण जे शिक्षण घेतो त्याचा उपयोग आपल्याला भविष्यात होत नसेल तर त्याकडे जाण्याचा कल कमी होतो. त्यामुळे बीएड, डीएड, इंजिनिअरिंगच्या हजारो जागा आता रिक्त राहिल्या आहेत. रयतच्या अनेक शाळांमधून गुरुकुल पद्धत सुरू करून मराठी भाषांच्या शाळेमधूनही उच्च दर्जाचे शिक्षण मिळू शकते, हे आम्ही सिद्ध केले आहे. त्यामुळेच पहिल्या टप्प्यात रयतची महाविद्यालये स्वायत्त करणार आहोत आणि त्यानंतर संपूर्ण संस्थेचे कामकाजच स्वायत्त करण्यावर आमचा भर राहील. त्यासाठी केंद्र सरकारच्या धोरणानुसार आम्ही क्लस्टर युनिव्हर्सिटीच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. त्यामुळे आम्हाला अभ्यासक्रम तयार करण्याचे आणि गुणवत्तापूर्ण परीक्षा पद्धती राबवण्याचे स्वातंत्र्य मिळणार आहे. हे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आजच्या काळाप्रमाणे शिक्षणाची रचना आम्ही करणार आहोत. विद्यार्थ्यांना उपयुक्त असे अभ्यासक्रम तयार केले जातील. त्याला जर सीए व्हायचे असेल तर पदवीच्या तीन वर्षांचा कार्यकाळ त्यासाठी निश्चित केला जाईल आणि त्यामध्येच त्याला आवश्यक सर्व प्रशिक्षण दिले जाईल. पदवी पूर्ण केल्यानंतर त्याला जे शिक्षण घ्यावे लागते ते घेण्याची आवश्यकता असणार नाही इतक्या उच्च दर्जाचे अभ्यासक्रम तयार केले जातील. इंग्रजी भाषांच्या शाळांना पर्याय म्हणून आम्ही उच्च दर्जाची सेमी इंग्रजी पद्धती अस्तित्वात आणली आहे. आम्ही फक्त सामाजिक शास्त्रे हा एकच विषय मराठीमधून शिकवत आहोत. हा विषयही आम्हाला इंग्रजीमधून शिकवण्याची परवानगी द्या, अशी मागणी आम्ही सरकारकडे केली आहे. मात्र, त्यावर कोणत्याही प्रकारचा निर्णय घेतला जात नाही. धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालयानंतर श्रीरामपूर येथील एक महाविद्यालय आणि साताऱ्याचे यशवंतराव चव्हाण विज्ञान इन्स्टिट्यूटला स्वायत्त दर्जा मिळेल. त्यानंतर शिक्षणाची संपूर्ण प्रक्रिया आणि पद्धती बदलून टाकण्यात आम्हाला यश येईल.' रयतमधील वादग्रस्त शिक्षकांवर कारवाई करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
'नगरपालिकेच्या शाळा चालवायला द्या'
अण्णासाहेब कल्याणी शाळेत आणखी विद्यार्थ्यांना प्रवेश मिळायला हवा. त्यासाठी तुकडी वाढवावी, अशी पालकांची मागणी असल्याकडे डॉ. अनिल पाटील यांचे लक्ष वेधले असता पाटील म्हणाले, 'तुकडी वाढवता येईल, पण जागा कुठून आणणार? जागा दिली तर तुकडी वाढवता येईल. जागा मिळण्याची शक्यता नाही. त्यामुळे आम्ही सरकारकडे जिल्हा परिषद आणि नगरपालिकांच्या शाळा आम्हाला चालवायला द्याव्यात., आम्ही त्यांचा दर्जा रयतच्या शाळांसारखा करून दाखवायला तयार आहोत, असे त्यांनी सांगितले. मात्र, सरकार त्यावर काहीच निर्णय देत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
शिक्षणविचार व्याख्यानमाला
रयतच्या अण्णासाहेब कल्याणी विद्यालयाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त माजी विद्यार्थी, शिक्षक व मुख्याध्यापक यांचा मेळावा १९ एप्रिल रोजी होणार आहे. विद्यालयातर्फे २१ ते २७ एप्रिल या कालावधीत शिक्षणविचार व्याख्यानमाला होणार आहे. अपर्णा रामतीर्थकर, विवेक वेलणकर, विशाखा वेलणकर, डॉ. श्रुती पानसे, व्ही. टी. पाटील, डॉ. अजयकुमार लोळगे, गणेश शिंदे आणि प्रा. नितीन बानुगडे-पाटील यांचे विविध विषयांवर व्याख्यान होणार आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट