म. टा. वृत्तसेवा, राधानगरी
शाहू काळापासून येथे कार्यरत असलेल्या भोगावती पाटबंधारे उपविभाग अधिकाऱ्यांच्या उपविभागीय कार्यालयाचे परिते (ता.करवीर) येथे स्थलांतर करण्याचे प्रयत्न सरकारस्तरावर सुरु असल्याचे खात्रीदायक वृत्त आहे. यामुळे धरणाची सुरक्षा अणि कर्मचारीवर्गाच्या गैरसोयींसह अनेक प्रश्न नव्याने निर्माण होणार आहेत. धरण प्रवेशबंदी आणि अनेक सुविधांच्या अभावामुळे आधीच भकास झालेल्या राधानगरी धरण परिसराला यामुळे पूर्णतः अवकळा येणार आहे. यामुळे या निर्णयास स्थानिक जनतेतून विरोध होत आहे.
धरण निर्मितीपासून धरणाच्या पायथ्याशी भोगावती पाटबंधारे विभागाचे हे उपविभागीय कार्यालय कार्यरत आहे. जिल्ह्यातील भोगावती, कुंभी, कोगे, परिते, धामोड,कळे, आदी मुख्य प्रकल्पांसह वलवण,वेशरफ,आन्दुर अशा तीन लघुपाटबंधारे प्रकल्पाचा कारभार येथूनच चालतो. याशिवाय कोल्हापूर पद्धतीच्या बत्तीस बंधाऱ्यांची देखभाल, दुरुस्ती आणि इतर दैनंदिन कामकाजासह पाऊस आणि महापूर काळात धरण क्षेत्रांचे निंयत्रण आणि नियोजनाची महत्त्वाची जबाबदारी या कार्यालयावर असते. कर्मचाऱ्यांचा सतत वावर येथे असल्याने दिवस-रात्र धरण क्षेत्रातील सुरक्षाही इथल्या कर्मचाऱ्यांना करावी लागते.
सुरक्षेच्या कारणावरुन पाच-सहा वर्षांपासून धरणावर पर्यटकांना प्रवेशबंदी केली असल्याने कर्मचारी वगळता इकडे फारसे कोणी फिरकत नाहीत. रस्ते, वीज, पर्यटक निवारा सुविधाची वानवा असल्याने स्थानिकासह पर्यटकही येथे येणे टाळतात. तर प्रवेशबंदीमुळे स्थानिक व्यापारी वर्गाला मोठा बसला आहे. त्यामुळे हळूहळू हा परिसर भकास होत असताना केवळ मध्यवर्ती अंतराचे कारण पुढे करुन हे कार्यालय परिते (ता.करवीर) येथे स्थलांतरित करण्यासाठी पंधरा दिवसापूर्वी सरकारच्या जलसंपदा विभागाने दीर्घ चर्चा केल्याचे समजते.
विभाजन करा, पण स्थलांतर नको
धरण, वीजनिर्मितीगृह आणि हे उपविभागीय कार्यालय शाहूकालीन असल्याने त्याचे स्थलांतर करू नये. हवे तर विभाजन करा,केवळ काही कर्मचाऱ्यांसाठी असा निर्णय घेवू नये,नियोजित ठिकाणही गैरसोयीचे असल्याने हे मुख्यालय हलवूच नये, अशी स्थानिकांची मागणी आहे. त्यातच धरण सुरक्षा आणि महापूर नियंत्रणास मर्यादा येणार असून हा परिसर निर्मनुष्य होण्याची शक्यता असल्याने येत्या काळात हा विरोध अधिकच तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.
केवळ मध्यवर्ती ठिकाण याच कारणास्तव संबधित उपविभाग स्थलांतरित होणार असल्याची चर्चा मंत्रालयस्तरावर सुरू आहे. मात्र याबाबत संबधित कार्यालयास अद्याप कोणतेही आदेश प्राप्त झालेले नाहीत.
- बी. एस. घुणकीकर, उपअभियंता भोगावती पाटबंधारे उपविभाग
धरण, वीजनिर्मिती केंद्र याबरोबरच हे उपविभागीय कार्यालय शाहूकालीन असल्याने त्याला ऐतिहासिक व भावनिक महत्त्व आहे. स्थलांतराऐवजी या पाटबंधारे उपविभागाचे विभाजन करा पण त्याचे स्थानिक अस्तित्व कायम ठेवा. यामुळे धरणावरील नियोजित शाहू स्मारकाचीही देखभाल होण्यास मदत होईल.
- अभिजीत तायशेटे, अर्थ व शिक्षण सभापती, जिल्हा परिषद
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट