'सांडपाणी थेट हिरण्यकेशी नदीत' अशा मथळ्याची बातमी 'महाराष्ट्र टाइम्स' मध्ये प्रसिद्ध होताच पक्ष, संघटना आणि प्रशासन जागे झाले आहे. गेली काही वर्ष अव्याहतपणे सुरु असलेल्या या प्रकाराची प्रशासनाने सुद्धा गंभीर दखल घेतली असून यासंदर्भात पालिकेला नोटीस देत असल्याचे सहाय्यक जिल्हाधिकारी कुणाल खेमनर यांनी सांगितले.
गडहिंग्लज शहराचे सांडपाणी नदीवेस परिसरात साठप करून शेतीला वापरले जाते. या पाण्यावर कोणत्याही प्रकारची प्रक्रिया केली जात नाही. तसेच गेली चार वर्ष गाळसुद्धा काढण्यात आलेला नाही. त्यामुळे त्याची साठप क्षमतासुद्धा कमी झाली आहे. सांडपाण्यासंदर्भात पालिका प्रशासन आणि सत्ताधारी यांनी सकारात्मक भूमिका घ्यावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
पालिकेमार्फत चार वर्षांपूर्वी सांडपाणी प्रक्रिया करणारे सुमारे १५ कोटींचे प्रकल्प उभारण्यासाठी प्रयत्न झाले. तसेच शहरातील विविध भागातील सांडपाळयासाठी संपूर्ण भुयारी गटर योजनासुद्धा राबविण्यात येणार होती. दोन्ही मिळून सुमारे २५ कोटींचा हा प्रस्ताव मध्येच रखडला. मात्र सांडपाणी आणि त्याचे दुष्परिणाम पाहता या प्रस्तावाबाबत फेरविचार होऊन अंमलबजावणी होणे गरजेचे आहे.
शरीरावर हिरवट तवंग
याबाबत बोलताना हिरण्यकेशी जलविहार मंडळाचे सदस्य गंगाधर हिरेमठ म्हणाले, 'नदीवेस परिसरासह शहरातील नागरिक मोठ्या संख्येने नदीघाटावर आंघोळीसाठी येतात. मात्र गेल्या काही दिवसांपासून सांडपाणी नदीत मिसळत असल्याने अंगाला खाज सुटणे, लाल होणे यासारखे त्वचारोग सुरु झाले आहेत. आंघोळ करून बाहेर पडताना शरीरावर हिरवट तवंग साचलेला असतो. याप्रश्नी त्वरित उपाययोजना होणे आवश्यक आहे.
सांडपाणी हिरण्यकेशी नदीपात्रात थेट मिसळणे ही गंभीर गोष्ट आहे. यासंदर्भात आपण स्वतः पाहणी करून पालिकेला नोटीस पाठवत आहे. जनतेच्या आरोग्याशी खेळण्याचा कुणालाही अधिकार नाही.
- कुणाल खेमनार, सहाय्यक जिल्हाधिकारी
गडहिंग्लज शहरातील सांडपाण्यामुळे पूर्व भागातील गावांना दुषित पाणीपुरवठा होत आहे. याविषयाबाबत शिवसेनेकडून वेळोवेळी निवेदने देण्यात आली आहेत. मात्र प्रशासनाकडून कोणतीही हालचाल झालेली नाही. लवकरच प्रदूषण मंडळालासोबत घेऊन योग्य अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे.
- विजय देवणे, शिवसेना जिल्हाप्रमुख
नदीवेस परिसरातील सांडपाणी ठिकाणाची कालच पाहणी केली. तातडीने दोन टप्प्यात यासंबंधी योग्य निर्णय घेणार आहे. येत्या आठवड्याभरात सर्वप्रथम सांडपाणी साठपातील गाळ काढण्याचे काम हाती घेतले जाईल. तसेच पुढील टप्प्यात सांडपाणी प्रक्रियासंदर्भात प्रकल्प सादर करून पाठपुराव्यासाठी प्रयत्न करू.
- तानाजी नरळे, मुख्याधिकारी नगरपरिषद
गडहिंग्लज हे निसर्गसंपन्न शहर म्हणून ओळखले जाते. सांडपाणी थेट नदीत मिसळत असल्यामुळे पाणी प्रदूषित होते. ज्याचा पूर्व भागातील नागरिकांच्या आरोग्यावर थेट परिणाम होतो. जुलाब, त्वचारोगासारख्या रुग्णांची संख्या वाढली आहे. मात्र समस्येचे नेमके मूळ या लोकांना माहित नाही.
- अनंत पाटील, पर्यावरणप्रेमी
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट