मागील काही दिवसांपासून खासदार उदयनराजे व विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्यात सुरू असलेल्या कलगी-तुऱ्याने मंगळवारी साताऱ्यात हिंसक वळण घेतले. उदयनराजेंच्या कार्यकर्त्यांनी दुपारी रामराजेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केल्यानंतर सातारा शहरात तणाव वाढला आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी उदयनराजे यांनी फलटणमध्ये जाऊन पाणीप्रश्नावरुन रामराजेंचे टीका केली होती. विधान परिषदेचे सभापतीपद मिळवल्यानंतर फलटण येथील श्रीराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूक प्रचारात रामराजे यांनी उदयनराजेंवर अतिशय खालच्या पातळीवर जाऊन शाब्दिक हल्ला चढवला होता.
मंगळवारी उदयनराजे दिल्लीहून साताऱ्यात आल्यानंतर रामराजेंच्या थिल्लर वक्तव्यांचा निषेध केला. त्यांनी कार्यकर्त्यांना संयम बाळगण्याच्या सूचना केल्या. परंतु, कार्यकर्ते विश्रामगृहावरुन दुपारी साडे चारच्या सुमारास थेट पोवई नाक्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ जमले. या वेळी कार्यकर्त्यांनी रामराजेंसह त्यांच्या दोघा बंधूंवर पोलिसांसमोरच जहरी टीका केली. कार्यकर्ते या ठिकाणी रामराजेंचा पुतळा दहन करणार म्हणून, या ठिकाणी शेकडो पोलिस बंदोबस्तासाठी आले होते. पण, काही कार्यकर्त्यानी गनिमी काव्याने अजिंक्य कॉलनीकडे जाणाऱ्या रस्त्यावर रामराजेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. या घटनेमुळे पोलिसही चांगलेच गांगरुन गेले, त्यांनी धरपकड करण्यास सुरुवात केली. पोलिसांनी पुतळा दहनप्रकरणी अकरा जणांना ताब्यात घेऊन जामिनावर सोडून दिले. उदयनराजे यांनी बुधवारी सकाळी पत्रकार परिषदेचे आयोजन केले आहे. दरम्यान, जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसने या प्रकरणी पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी लक्ष्य घालावे, अशी मागणी केली आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट