म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
सुप्रीम कार्टाने माहिती तंत्रज्ञान कायद्यातील कलम ६६ अ रद्द केले आहे. त्यामुळे सोशल मीडिया मोकाट सुटण्याची भीती आहे. या पार्श्वभूमीवर सोशल मीडियाचा जबाबदारीने उपयोग करण्याचे भान नेटीझन्समध्ये येण्याची गरज असल्याचे मत या क्षेत्रातील तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे.
सोशल मीडियावर काही अक्षेपार्ह पोस्ट टाकली तर संबंधित व्यक्तीच्या अटकेचे अधिकार पोलिसांना देणारे हे कलम आहे. त्यानुसार ती वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूदही होती. पण सुप्रीम कोर्टाने हे कलम अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या घटनेतील तत्वांविरोधात असल्याचा निर्वाळा देत रद्द ठरवले आहे.
यासंदर्भात प्रतिक्रिया देताना सॉफ्टवेअर प्रोफेशनल संभाजी शिंदे म्हणाले, 'एखादी प्रतिक्रियासुद्धा अक्षेपार्ह ठरवून पोस्ट टाकणाऱ्यांविरोधात पोलिस कारवाई करू शकत होते. त्यामुळे सुप्रीम कोर्टाचा निर्णय हा योग्यच म्हणावा लागतो. शेवटी काय अक्षेपार्ह आहे, हे ठरवायचे कसे असा प्रश्न निर्माण व्हायचा.'
भारतीय दंड संहितेनुसार अक्षेपार्ह, अश्लील किंवा अवमानकारक मजकूर असेल तर त्यावर कारवाईची तरतूद आहेच. त्यामुळे सुप्रीम कोर्टाचा निर्णय स्वागतार्ह आहे असे ते म्हणाले. 'सोशल मीडियावर अनेक विषयांवर चर्चा होत असतात. बरेच नामवंत विचारवंत आपले विचार सोशल मीडीयावर टाकतात. त्यावर कमेंटच्या स्वरुपात चर्चा होते. अर्थात सोशल मीडियाचा गैरवापर होण्याचे प्रकारही मोठे आहे, हे नाकारण्यासारखे नाही, असे ते म्हणाले.
सोशल मीडिया आणि अन्य माध्यमे यांच्यात फरक असल्याचे सांगून ते म्हणाले, 'वृत्तपत्र, टीव्ही अशा माध्यमांत काय दाखवले जावे, काय छापले जावे यावर नियंत्रण असते. सोशल मीडियात तशी स्थिती नसते. एखादी बाब अक्षेपार्ह असल्याची तक्रार केल्यानंतरच ती पोस्ट संबंधित सोशल मीडीया हटवते, पण तशी तक्रार कुणी करायला पुढे येत नाही. तसेच सोशल मीडियाचा एकूण आवाका फारच मोठा असल्याने त्यावरून अफवांचे पीक पसरवण्यात, निवडणुकात विरोधकांची बदनामी करण्यासाठी सोशल मीडियाचा वापर होताना दिसतो. यावर कसे नियंत्रण आणायचे हा प्रश्नच आहे. त्यासंदर्भात काही यंत्रणा उभी करावी लागेल.'
सॉफ्टवेअर प्रोफेशनल गिरीष चव्हाण यांनी सांगितले. ते म्हणाले, 'ज्यांना टीव्ही, वृत्तपत्रे अशा पारंपरिक माध्यमांपर्यंत पोहचता येत नाही अशांना सोशल मीडियाचा आधार असतो. याचा विचार केला तर सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयाचे स्वागत करावे लागते. सोशल मीडियावरील गैरप्रकार रोखण्यासाठी नेटिझन्सनीच सतर्क असले पाहिजे. एखादी पोस्ट अक्षेपार्ह वाटली तर त्याविरोधात तक्रार केली पाहिजे. आवश्यकतेनुसार पोलिसांतही तक्रार केली पाहिजे. तसेच ऑनलाइन सिक्युरिटीचे पालन आपण स्वत:च केले तर ते योग्य ठरेल.'
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट