एलबीटी विरोधात व्यापाऱ्यांचा मोर्चा, बेमुदत उपोषण सुरू
म. टा. वृत्तसेवा, सांगली
एक एप्रिलपासूनच एलबीटी रद्द करावा, या मागणीसाठी व्यापाऱ्यांनी पुकारलेल्या सांगली बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. शहराच्या मध्यवर्ती भागातील बहुतांश दुकाने बंद होती. मोर्चा काढून व्यापाऱ्यांनी निषेध नोंदवला, तसेच रेल्वे स्टेशन चौकात गुरुवारपासून बेमुदत उपोषणही सुरू करण्यात आले आहे.
आर्थिक वर्षअखेर आल्याने महापौर आणि महापालिकेचे अधिकारी दुकानात घुसून करवसुली करीत आहेत. त्याच्या निषेधार्थ एलबीटी हटाओ कृती समितीने गुरुवारी बंद पुकारला होता. गणपती पेठ, कापड पेठ, हरभट रोड, तरुण भारत व्यायाम मंडळ परिसर, मारुती रोड आदी ठिकाणी बहुतांश दुकाने बंद होती. काही ठिकाणी दरवाजे किलकिले करून व्यवहार सुरू होते.
गणपती मंदिरात महाआरती करून व्यापाऱ्यांनी मोर्चा काढला. मोर्चा शहरातून फिरून जुन्या रेल्वे स्टेशन चौकात आला. तेथे बेमुदत उपोषण सुरू झाले. कृती समितीचे नेते, समीर शहा, विराज कोकणे, सुरेश पटेल, अनंत चिमड आदी उपोषणात सहभागी झाले आहेत.
'राज्य सरकारने एक ऑगस्टपासून एलबीटी रद्द करण्याचे आश्वासन दिले आहे, पण अर्थसंकल्पात त्याबाबत कोणतीही तरतूद नाही. हा कर एक एप्रिलपासून रद्द करावा, ही आमची प्रमुख मागणी अद्याप कायम आहे. महापौर, त्यांचे सहकारी, अधिकारी दुकानांत घुसून व्यापाऱ्यांना दमदाटी करून तोडफोड करीत आहेत. धमक्या देत आहेत,' असा आरोपही व्यापाऱ्यांनी केला.
एलबीटी न भरणाऱ्या ४४० व्यापाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे महापालिका प्रशासनाने ठरविले आहे. यात कृती समितीच्या नेत्यांचाही समावेश असेल. या सर्वांना दिलेल्या जप्तीपूर्व नोटिशीची मुदत एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात संपताच जप्तीची कारवाई सुरू केली जाईल, असे महापालिकेच्या प्रवक्त्याने सांगितले.
एलबीटीवरील दंड-व्याज आधी माफ करावे. करातच ते समाविष्ट करावे. याबाबत राज्यभर निवेदने दिली जातील. एलबीटी तत्काळ रद्द करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी निवडणुकीपूर्वी दिले होते. ते त्यांनी पाळावे. या प्रश्नावर महाराष्ट्र बंद केला जाईल.
- समीर शहा, एलबीटी हटाओ कृती समितीचे अध्यक्ष
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट