Gurubal.Mali@timesgroup.com Tweet@gurubalmaliMT कोल्हापूर : भोपळा फोडण्यासाठी विधानसभेला काँग्रेसचे जिल्ह्यातील सर्व नेते एकत्र आले. त्यांच्या एकीने थेट चौकार मारला. त्याचे सेलिब्रेशन सुरू असतानाच अचानक मंत्रिपदामुळे पुन्हा पक्षाला गटबाजीचे ग्रहण लागले. मंत्रिपदासाठी डावलल्याने नाराज झालेल्या आमदार पी. एन. पाटील यांचा गट आक्रमक झाल्याने जोरदार नाराजीनाट्य रंगले आहे. दबावाच्या राजकारणाने पुन्हा पी. एन. आणि राज्यमंत्री सतेज पाटील गटात पक्षाची विभागणी अधिक ठळकपणे होणार याचे संकेत स्पष्ट झाले आहेत. जिल्ह्यातील काँग्रेस पक्ष गेल्या पन्नास वर्षांत गटबाजीने सातत्याने पोखरला गेला. गटबाजीचा फटका नेहमीच पक्षाला बसला. पण, त्यातून नेत्यांनी फारसा धडा घेतला नाही. विधानसभेच्या गेल्या निवडणुकीत तर गटबाजीमुळे पक्षाचा एकही आमदार निवडून आला नाही. त्यापूर्वी झालेल्या निवडणुकीत चार जागा गटबाजीने गमवाव्या लागल्या होत्या. या पार्श्वभूमीवर सहा महिन्यांपूर्वी जिल्ह्यातील पक्षाचे सर्व गट एकत्र आले. तत्कालिन जिल्हाध्यक्ष प्रकाश आवाडे यांच्यासह सर्वांनी हात उंचावत एकीची शपथ घेतली. आवाडे, जयवंतराव आवळे, पी. एन., सतेज पाटील असे अनेक गट एकत्र आल्याने पक्ष मजबूत झाला असे म्हणतानाच काही महिन्यांत आवाडे यांनी पक्षाला रामराम ठोकला. त्यामुळे विधानसभेला काही ठिकाणी उमेदवार शोधण्याची वेळ पक्षावर आली. कठीण परिस्थितीत नूतन जिल्हाध्यक्ष सतेज पाटील आणि पी. एन. पाटील यांनी विधानसभेला ताकदीने आणि एकदिलाने सामोरे जाण्याचा निर्णय घेतला. त्याचा फायदाही झाला. चार जागा पक्षाच्या खात्यावर जमा झाल्या. हे श्रेय सामुदायिक होते. त्यामुळे कौतुकाचा वर्षाव सुरू झाला. विजयाचे सेलिब्रेशन सुरू असताना पक्षासमोर आता पुन्हा गटबाजीचा मोठा प्रश्न उभा राहिला आहे. एका राज्यमंत्रीपदाने जिल्ह्यात हा प्रश्न निर्माण झाला आहे. सतेज पाटील आणि पी. एन. या दोघांनी महिनाभर पदासाठी फिल्डींग लावली होती. यामध्ये सतेज यांनी बाजी मारली. राजकारणात आपल्या मागून आलेल्या नेत्याला मंत्रीपद देताना चाळीस वर्षे एकनिष्ठ राहिलो त्याची कदर न झाल्याची खंत पी. एन. यांना आहे. त्यामुळे नाराज आणि संतप्त झालेल्या या गटाने पक्ष सोडण्याचा इशारा दिला आहे. कठीण परिस्थितीत चार जागा निवडून आणल्याचे श्रेय सतेज यांना आहे. वीस वर्षे जिल्हाध्यक्ष म्हणून काम करताना पी. एन. पाटील यांना पक्ष जिवंत ठेवला. पण, दिल्लीतील संपर्कात सतेज यांनी बाजी मारल्यानेच त्यांना राज्यमंत्रीपद मिळाले आहे. मंत्रीपदाने पुन्हा एकदा या दोन नेत्यांमधील अंतर वाढणार आहे. मुळात या दोघांत गेली काही वर्षे दुरावा आहेच, पण तो फार कधी उघडपणे व्यक्त होत नव्हता. या निमित्ताने तो बाहेर पडला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून तो अधिक तीव्रपणे व्यक्त होताना दिसतो. पी. एन. गटाने पक्ष सोडण्याचा इशारा दिला आहे. सद्यस्थितीत ते शक्य नाही. हा दबावतंत्राचा भाग असणे साहजिक आहे. त्यांच्या भावनेची किमान राज्यपातळीवर दखल घेतल्यास भविष्यात त्यांनाही संधी दिली जाऊ शकते. त्यांची नाराजी पक्षनेते कशी दूर करणार हे चार दिवसांत स्पष्ट होईल. पण या निमित्ताने गटबाजीची पक्षाची परंपरा पुन्हा अधोरेखित झाली आहे. काँग्रेसमधील गटबाजी रत्नाप्पाण्णा कुंभार - श्रेष्ठी आण्णा कल्लाप्पाण्णा आवाडे - बाळासाहेब माने उदयसिंगराव गायकवाड - श्रीपतराव बोंद्रे सदाशिवराव मंडलिक - महादेवराव महाडिक मंडलिक - पी.एन., महाडिक गट महादेवराव महाडिक - सतेज पाटील जयवंतराव आवळे - कल्लाप्पाण्णा आवाडे पी. एन. पाटील - सतेज पाटील पी. एन. पाटील - आवाडे गट भरमू पाटील - नरसिंगराव पाटील
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट