Bhimgonda.Desai@timesgroup.com
Tweet : @bhimgondaMT
कोल्हापूर : येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा पुरवठा कार्यालयात सर्वसामान्यांना प्रशासकीय कामानिमित्त कर्मचाऱ्यांना भेटण्यास जिल्हा पुरवठा अधिकारी राणी ताटे यांनी अघोषित बंदीचा तोंडी फतवा काढण्याच्या तक्रारी आहेत. यामुळे शिधापत्रिका, धान्य दुकानासंबंधीच्या तक्रारीवर तालुका पातळीवर न्याय न मिळाल्यास कोणाकडे दाद मागायची, असा प्रश्न उपस्थित होत आहे. परिणामी शिस्तीच्या नावाखाली एकाधिकारशाही लादत सामान्यांना न्याय नाकारण्याचा प्रकार या कार्यालयाकडून होत असल्याचा आरोपही होत आहे.
शहर आणि जिल्ह्यातील रास्त भाव दुकानांवर नियंत्रण ठेवणे, शिधापत्रिकाधारकांना दर महिन्याला धान्य वितरण करणे, नवीन शिधापत्रिका वाटप करणे, विभक्तीकरण अशा कामकाजासंबंधी जिल्हास्तरावरील तक्रारींचे निरसन करण्याची जबाबदारी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांची आहे. यापूर्वीच्या सक्षम अधिकाऱ्यांमुळे हा विभाग राज्यात नावलौकिक मिळवला होता. दरम्यान, चार महिन्यांपूर्वी राणी ताटे पुरवठा अधिकारी म्हणून रूजू झाल्या. अल्पावधीतच त्यांचे कामकाज वादग्रस्त बनले आहे.
गाव, तालुकास्तरावर हेलपाटे मारूनही न्याय न मिळालेले लोक जिल्हा पुरवठा कार्यालयात रोज येतात. कार्यालयात प्रवेश करताच एकाचवेळी तीन शिपाई त्यांना अडवतात. कुणाकडे काम आहे, पुढे जाऊ नका, आहे तिथेच थांबा, असे म्हणत रोखले जाते. ज्यांना भेटायचे आहे, त्यांचे नाव सांगितल्यानंतर पहिल्यांदा मॅडमना (जिल्हा पुरवठा अधिकारी ताटे) भेटा, असे म्हणतात. त्यानंतर संबंधित ताटे यांना भेटण्यासाठी चिठ्ठी देतात. मात्र, भेटीसाठी अनेक तास प्रतीक्षा करत थांबावे लागते, अशा स्वरूपाच्या तक्रारी आहेत. पत्रकारांनीही असा अनुभव अनेकवेळा आला आहे.
०००
जिल्हाधिकाऱ्यांची सहज भेट,
ताटेंकडे मात्र प्रतीक्षा
जिल्हाधिकारी दौलत देसाई सामान्यांना कोणत्याही दिवशी सहजपणे भेटतात. तक्रारदारांची व्यथा ऐकूण घेत न्याय मिळवून देण्यासाठी तत्परतेने कार्यवाही करतात. जिल्ह्याची प्रशासकीय जबाबदारी असतानाही कक्षासमोरील प्रत्येकाला ते सहज भेटू शकतात. याउलट केवळ पुरवठा विभागाचा कार्यभार असताना ताटे यांना भेटण्यासाठी तासनतास प्रतीक्षा करावी लागते. आठवड्यापूर्वी पूर्वसूचना देऊनही काँग्रेस पदाधिकाऱ्यांचे निवेदन घेण्यासाठी त्या उपस्थित राहिल्या नाहीत. त्यावेळी पदाधिकाऱ्यांनी त्यांचा निषेध करून ठिय्या आंदोलन केले होते.
००००
अधिकाऱ्यांत सुप्त संघर्ष
पुरवठा विभागात अनेक दिवसांपासून अधिकाऱ्यांतील सुप्त संघर्ष धुमसतो आहे. लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान कक्षात फायलींच्या फेकाफेकीचे प्रकारही घडल्याचे सांगितले जाते. यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात पुरवठा विभाग विशेष चर्चेत आला आहे. तेथे कामानिमित्त जाणाऱ्यांना सौजन्याची वागणूक मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. म्हणून एकाधिकारशाही लादणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात आंदोलन करण्याच्या पावित्र्यात काही संघटना आहेत.
००००
कोट...
लोकशाहीमध्ये जनता मालक आणि अधिकारी नोकर असतात. विविध घटकांतील लोक विविध प्रकारचे कर भरतात. त्यातून अधिकारी, कर्मचाऱ्यांचे पगार होतात. यांचे भान जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी ठेवावे. कार्यालयातील कोणत्याही कर्मचाऱ्यास भेटण्याचा अधिकार नागरिकांना आहे. यावर जिल्हा पुरवठा अधिकारी राणी ताटे निर्बंध आणू शकत नाहीत. कोल्हापुरात असे प्रकार खपवून घेतले जाणार नाही. प्रसंगी त्यांच्याविरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल.
सुभाष देसाई, संस्थापक अध्यक्ष, ब्लॅक पँथर
०००
कोट
सार्वजनिक वितरण व्यवस्थेतर्फे गरीब, वंचित घटकातील कुटुंबांना धान्य मिळते. यामुळे पुरवठा विभागाशी सर्वाधिक संपर्क सामान्य लोकांचा येतो. अशांना प्रशासकीय कामाकाजाच्या तक्रारीसंबंधी जिल्हा पुरवठा अधिकारी ताटे भेटत नसतील, गाऱ्हाणी ऐकूण घेत नसतील, कार्यालयातील कर्मचाऱ्यांना सर्वसामान्यांना भेटण्यास मनाई करत असतील तर हे कोल्हापूरची जनता सहन करणार नाहीत. कामकाजात सुधारणा न झाल्यास ताटे यांच्या बदलीची मागणी केली जाईल.
संजय पाटील, प्रदेश सचिव, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी
०००००