म. टा. वृत्तसेवा, गारगोटी कूर ( ता. भुदरगड) येथील जीवन शिक्षण मतिमंद विद्यालयात संस्थापक व संस्था प्रशासनाने अनागोंदी व मनमानी कारभार करीत मतिमंद विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या शिष्यवृत्ती रक्कमेचा लाखोंचा अपहार केला आहे. बोगस विद्यार्थीसंख्या दाखवून शासकीय धान्याची लूट, आयकर सवलतीखाली लाखो रुपये मिळवणे आणि मतिमंद विद्यार्थ्यांना स्वत:च्या जनावरांचा गोठा, कुक्कुटपालन व्यवसाय व शेतात राबवून घेत आहेत असा आरोप मतिमंद विद्यार्थ्यांच्या पालकांनी केला आहे. संस्थेचा आर्थिक गैरकारभार व शालेय कामकाजाची खातेनिहाय चौकशी करावी आणि संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी या पालकांनी भुदरगड तहसीलदारांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात म्हटले आहे, टिक्केवाडी (ता. भुदरगड) येथील न्यू महाराष्ट्र शिक्षण संस्थेचे कूर येथे २००७ पासून जीवन शिक्षण मतिमंद विद्यालय सुरु आहे. संस्थेला २००९मध्ये पुणे येथील अपंग कल्याण आयुक्तालयाकडून कायम विनाअनुदान तत्वावर मतिमंद शाळा चालविण्यास परवानगी देण्यात आली. पण संस्थेचे संस्थापक शिवाजी पाटील व संचालक मंडळाने संस्थेचा कारभार एकाधिकार व घराणेशाहीने चालविला आहे. संस्थेने शाळेत ४० निवासी व १० अनिवासी विद्यार्थी दाखविले आहेत. प्रत्यक्षात पाच ते सहाच विद्यार्थी शाळेत हजर असतात. मात्र सर्व विद्यार्थ्यांची खोटी हजेरी कागदोपत्री दाखवली जात आहे. विद्यार्थ्यांच्या पालन-पोषणासाठी शाळेला तालुका पुरवठा विभागाकडून दरमहा २०० किलो तांदूळ व ४०० किलो गहू पुरवठा केला जातो. मात्र काही विद्यार्थी सध्या त्यांच्या मूळ गावी अन्य शाळेत शिक्षण घेत आहेत. त्यांच्याही नावे धान्य व शिष्यवृत्ती उचल केली जात असून शासनाची फसवणूक केली जात आहे. हे धान्य संस्थापकांच्या पोल्ट्रीतील कोंबड्यांना व गोठा प्रकल्पातील गाईंना खाद्य म्हणून वापरले जात आहे. मात्र धान्याचे खोटे विनीयोग रेकॉर्ड बनवून शासकिय धान्याचा मोठ्या प्रमाणात अपहार सुरु आहे. समाजकल्याण विभागामार्फत प्रत्येक मतिमंद विद्यार्थ्याला वर्षाला १८०० रुपये अपंग शिष्यवृत्ती दिली जात आहे. ही रक्कम विद्यार्थी व पालक यांच्या संयुक्त खात्यावर जमा करणे बंधनकारक आहे. पण संस्थेने मुख्याध्यापकांच्या नावे बँकेत खाते उघडून सदर शिष्यवृत्ती अनाधिकृतपणे जमा करुन त्याची स्वतः उचल केली आहे. विशेष म्हणजे विद्यार्थी व पालक यांच्या खोट्या सह्या करत शिष्यवृत्ती वितरणाचे कागदोपत्री रेकॉर्ड रंगविले आहे. याबाबत पालकांकडून शहानिशा व सह्यांचे नमुने तपासणी झाल्यास खरी गोष्ट समोर येईल. तसेच शाळा परिसर स्वच्छ व प्रदूषणमुक्त राखणे आवश्यक असतांनाही संस्थेने शाळा इमारतीध्येच पोल्ट्री व्यवसाय व लागूनच गाईंचा गोठापालन व्यवसाय सुरु केला आहे. मतिमंद विद्यार्थ्यांकडून जनावरांचे मलमूत्र काढणे, चारा आणणे-घालणे, पोल्ट्रीतील कोंबड्यांची व्यवस्था व स्वच्छता राखणे अशी कामे करवून घेतली जात असून या मुलांना नेहमी अस्वच्छ अवस्थेत व वातावरणात ठेवले जात आहे. त्यामुळे बहुतांश पालकांनी आपली मुले आपापल्या घरी नेली आहेत. तेंव्हा संस्थेच्या आर्थिक गैर कारभाराची व शालेय कामकाजाची खातेनिहाय चौकशी करावी व संबंधितांवर कडक कारवाई करावी अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनावर चंद्रकांत कांबळे (बिद्री), चंद्रकांत कांबळे (कूर), बाबासाहेब कांबळे (म्हसवे), अनंत शिंदे (शिंदेवाडी), रंगराव ढेरे (निढोरी), विजय भोसले (आदमापूर), नामदेव पाटील (मुदाळ), सौरभ कुंभार (वाघापूर), सुनीता पावले (कासारवाडा) यांच्यासह १९ पालकांच्या सह्या आहेत. निवेदनाच्या प्रती राज्याचे सामाजिक न्यायमंत्री, अपंग आयुक्तालय, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, समाजकल्याण अधिकारी, प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांना पाठविण्यात आल्या आहेत. व्यक्तीगत द्वेषातून तक्रार दरम्यान, याबाबत संस्थेचे अध्यक्ष शिवाजी पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी 'मतिमंद विद्यालयाबाबत केलेली तक्रार व्यक्तिगत द्वेषातून केली आहे. शिष्यवृत्तीची रक्कम पालकांच्या खात्यावर जमा केल्याने अपहाराचा आरोप चुकीचा आहे,' असे सांगितले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट