जिल्ह्यात सात विधानसभा मतदारसंघात बंडखोरी होण्याची शक्यता
Gurubal.Mali@timesgroup.com
gurubalmaliMT
कोल्हापूर
युतीची घोषणा आणि आघाडीची निश्चिती यामुळे विधानसभा लढण्यासाठी अनेकांना पक्षाचे चिन्ह मिळण्याची शक्यता कमी झाली आहे. यामुळे रिंगणात उतरायचेच म्हणून तयारी केलेल्या इच्छुकांकडून बंडखोरीचे निशाण फडकवले जाण्याची चिन्हे आहेत. समरजीत घाटगे, सत्यजित कदम, गोपाळ पाटील, संजय घाटगे, अरूण डोंगळे यांच्यासह अनेकजण विधानसभेत जाण्यासाठी इच्छूक असल्याने ते मैदानापासून दूर राहण्याची शक्यता नाही. करवीर, इचलकरंजी व कोल्हापूर दक्षिण वगळता सात मतदारसंघांत बंडाचा झेंडा उभारला जाण्याचे संकेत मिळत आहेत.
चार वर्षांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप व शिवसेना स्वतंत्रपणे लढली. भाजपची काही मतदारसंघांत ताकद नसल्याने या जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला बहाल करण्यात आल्या होत्या. सारेच स्वतंत्र लढल्याने सर्वच पक्षांना दहा जागा लढवण्याची संधी मिळाली. बहुतांशी इच्छुकांना रिंगणात उतरण्याची संधी मिळाल्याने बंडखोरीला लगाम बसला. यंदा मात्र ती परिस्थिती राहिली नाही. कारण भाजप व शिवसेनेची युती जाहीर झाली आहे. काँग्रेस व राष्ट्रवादीची आघाडी निश्चित आहे. यामुळे अनेकांना लढण्यासाठी पक्षाचा झेंडा मिळण्याची शक्यता मावळली आहे.
चार वर्षे तयारी केल्यानंतर अचानक पक्षाची उमेदवारी मिळणार नसल्याने अनेकांकडून बंडखोरी होणार हे निश्चित आहे. आघाडीच्या जागा वाटपानुसार काँग्रेसला कोल्हापूर दक्षिण, उत्तर, हातकणंगले, इचलकरंजी, करवीर,पन्हाळा शाहूवाडी तर राष्ट्रवादीला कागल, राधानगरी, चंदगड, शिरोळ हे मतदारसंघ मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कोल्हापूर उत्तर कुणालाही मिळाले तरी येथे बंडखोरी होणार आहे. माजी नगरसेवक सचिन चव्हाण, नगरसेवक सत्यजित कदम, दौलत देसाई यांनी मैदानात उतरण्याची तयारी केली आहे. त्यामुळे ते थांबतील असे वाटत नाही. राधानगरीतून काहीही झाले तरी आपण लढणार, अशी घोषणा अरूण डोंगळे यांनी केली आहे. ही जागा राष्ट्रवादीला जाणार असल्याने बंडखोरी करण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा पर्याय राहणार नाही. शिरोळची जागा देखील राष्ट्रवादीलाच मिळणार असल्याने गणपतराव पाटील बंडखोरीचे धाडस करणार का हे पहावे लागेल.
सेना सहा तर भाजपला चार जागा असा युतीचा फॉर्म्युला होण्याची चिन्हे आहेत. विद्यमान सहा आमदारांच्या जागा सेनेला मिळतील. त्यामुळे उमेदवारीसाठी भाजपचे 'कमळ' हातात घेतलेले राहुल देसाई, अनिल यादव हे बंडखोरी करण्याची शक्यता आहे. कागल मतदारसंघ भाजपला दिल्यास संजय घाटगे आणि सेनेला दिल्यास समरजीत घाटगे नवीन चिन्ह घेऊन मैदानात उतरतील अशी चर्चा आतापासून सुरू आहे. चंदगडमध्ये अप्पी पाटील, गोपाळ पाटील, रमेश रेडेकर हे देखील पक्ष न मिळाल्यास नवीन संधी शोधतील. दोन्ही काँग्रेस आघाडीत स्वाभिमानी सहभागी झाल्यास अनिल मादनाईक, प्रा. जालिंदर पाटील हे विधानसभेच्या मैदानापासून दूर राहणे कठीण आहे. यामुळे शिरोळमध्ये राजेंद्र पाटील यड्रावकर, मादनाईक की गणपतराव पाटील बंडखोरी करणार हे जागा वाटपानंतरच कळेल. करवीर, इचलकरंजी व कोल्हापूर दक्षिण येथे मात्र बंडखोरी होईल असे वाटत नाही. पण जिल्ह्यातील किमान सहा ते सात मतदारसंघांत बंडखोरी होणार असल्याचे संकेत आतापासूनच मिळत आहेत. त्याचा फटका बसू नये यासाठी चारही प्रमुख पक्षांनी आतापासून फिल्डींग लावण्यास सुरूवात केली आहे.
...
चौकट
विनय कोरे काय करणार ?
जनसुराज्य शक्ती पक्ष सध्या महाआघाडीत आहे. सेना आघाडीत येण्यापूर्वी जनसुराज्यला जिल्ह्यातील दोन जागा देण्याचा शब्द देण्यात आला होता. पन्हाळा शाहूवाडी व हातकणंगले या दोन जागा हा पक्ष भाजपच्या मदतीने लढण्याची शक्यता होती. पण आता सेनेच्या प्रवेशाने भाजपची कोंडी झाली आहे. या दोन्ही मतदारसंघात सेनेचे आमदार असल्याने आणि या जागा त्यांनाच मिळणार असल्याने जनसुराज्यला बंडखोरी करण्याशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही. मध्यम मार्ग म्हणून माजी आमदार विनय कोरे काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढतीचा पर्याय स्वीकारणार का हे सहा महिन्यानंतरच कळणार आहे.
...
चौकट
यांची बंडखोरी शक्य
कोल्हापूर उत्तर सत्यजित कदम, सचिन चव्हाण, दौलत देसाई
चंदगड गोपाळ पाटील, रमेश रेडेकर, संग्राम कुपेकर, राजेश पाटील
कागल संजय घाटगे, समरजीत घाटगे
शिरोळ अनिल यादव, अनिल मादनाईक, गणपतराव पाटील
हातकणंगले राजू आवळे
राधानगरी अरूण डोंगळे, राहुल देसाई, जीवन पाटील, प्रा. जालिंदर पाटील
शाहूवाडी पन्हाळा विनय कोरे, करणसिंह गायकवाड, मानसिंग गायकवाड,