महापालिका लोगो म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी भाजप-शिवसेनेने एकत्रित लढण्याचा निर्णय घेतल्याने त्याचा परिणाम स्थानिक महापालिका राजकारणावर होण्याची शक्यता आहे. युतीमुळे ताराराणी आघाडीचे नगरसेवक कोणाचा प्रचार करायचा या धर्मसंकटात अडकणार आहेत. खासदार धनंजय महाडिक यांचा प्रचार करायचा की महापालिकेतील युतीप्रमाणे सेनेच्या उमेदवाराचा प्रचार करायचा असे दुहेरी संकट त्यांच्यासमोर असणार आहे. खासदार महाडिक यांची आघाडी म्हणून ताराराणी आघाडीची ओळख असली, तरी महापालिकेत भाजपसोबतची युती तोडणार का आणि काँग्रेस-राष्ट्रवादीपासून सेना दूर जाणार का? असे अनेक प्रश्न या युतीमुळे निर्माण झाले आहेत. मात्र सेना सत्तेतून बाहेर पडल्यास आणि ताराराणीने भाजपची साथ सोडल्यास महापालिकेचा राजकीय सारीपाटच बदलून जाईल. २०१५ मध्ये झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, सेना, ताराराणी आघाडी स्वतंत्रपणे लढले. मात्र या लढतीत सर्वांनी सोयीची भूमिका घेतली. काँग्रेस २९, राष्ट्रवादी १५, ताराराणी आघाडी १९, भाजप १४ व सेनेचे चार नगरसेवक महापालिकेत कार्यरत आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीने सेनेच्या मदतीने महापालिकेची सत्ता काबीज केली. सत्तारुढ गटाकडे सद्य:स्थितीत ४८ तर विरोधी आघाडीकडे ३३ नगरसेवक आहेत. दोन अपात्र आणि पाच नगरसेवकांवर अपात्रतेची टांगती तलवार असल्याने हे संख्याबळ ४१ पर्यंत कमी होऊ शकते. यातून पुन्हा सेनेचे चार नगरसेवकांनी राज्यपातळीवरील युतीप्रमाणे बाहेर पडून भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला तर सत्तेची समीकरणे बदलू शकतात. पण त्याचवेळी ताराराणी आघाडीतील नगरसेवक कोणती भूमिका घेणार याला महत्त्व येणार आहे. आघाडीसह भाजपमधीलही काही नगरसेवक खासदार महाडिक यांना मानणारे आहेत. ते महाडिकांचा पर्यायाने राष्ट्रवादीचा प्रचार करणार की युतीच्या उमेदवाराचा करणार हे गुलदस्त्यात राहील. महाडिकांचा प्रचार केला, तर ते महापालिकेच्या सत्तेत सहभागी होतील का? आणि सध्याचे सत्तारुढ गटाचे काँग्रेस-राष्ट्रवादीचे नगरसेवक त्यांना स्वीकारतील का? असे अनेक प्रश्न या निमित्ताने निर्माण होतील. पण वरिष्ठ पातळीवरुन आदेश आल्यास सेनेच्या नगरसेवकांना महापालिकेत भाजपसोबत जावे लागेल. भाजप, ताराराणी व सेना एकत्र आल्यास महापालिकेतील संख्याबळ ३७ होईल, तर काँग्रेस-राष्ट्रवादीचे संख्याबळ ३८ होईल. त्यामुळे महापालिकेचे राजकारण लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा ढवळून निघेल. .......................... चौकट पदे कायम राहतील ? सत्तारुढ गटाने पदांचा फॉर्म्युला निश्चित केला आहे. त्यानुसार अपवाद वगळता महापौर, उपमहापौर व सभापतींचा कार्यकाळ संपताच इतरांना संधी दिली जाते. पण राज्यात झालेल्या युतीमुळे भाजप-सेना स्थानिक पातळीवर एकत्र आल्यास सत्तारुढ गटाकडे काठावरील बहुमत राहील. फुटाफुटीचा इतिहास आणि काठावरील बहुमत पाहता, पद बदलाचे धारिष्ट्य सत्तारुढ गट दाखवेल अशी शक्यता कमी आहे. त्यामुळे पुढील काळात पदांमध्ये बदल होईल याची शक्यता कमीच राहील. ....................................... चौकट महापालिकेतील पक्षीय बलाबल काँग्रेस : २९ राष्ट्रवादी काँग्रेस : १५ ताराराणी आघाडी : १९ भाजप : १४ शिवसेना : ४ एकूण : ८१
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट