हातकणंगले बंदला प्रतिसाद म. टा. वृत्तसेवा, हातकणंगले जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे अतिरेक्यांनी भ्याड हल्ला केला. यामध्ये भारतीय चाळीस जवान शहीद झाले. त्या शूर जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी व त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी होण्यासाठी हातकणंगले तालुका बंदचे आवाहन करण्यात आले होते. त्या आवाहनाला अनेक गावातील ग्रामस्थांनी प्रतिसाद देत आपले व्यवहार बंद ठेवून कडकडीत बंद पुकारला. दरम्यान हुपरी शहरातील शहरवासीयांनी एकत्र येऊन कँडल मार्च आयोजित करुन शहीद जवानांना भावपूर्ण वातावरणात श्रद्धांजली वाहिली. तसेच प्रत्येकवेळी भ्याड हल्ला करणाऱ्या या पाकिस्तानी अतिरेक्यांना चांगला धडा शिकवण्याची मागणी करण्यात आली. या कँडल मार्चमध्ये शालेय विद्यार्थी, जेष्ठ नागरिकांनी मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. नगराध्यक्षा जयश्री गाट, जिल्हा परिषद सदस्या स्मिता शेंडूरे, धैर्यशील माने, नानासाहेब गाट, नगरसेवक सूरज बेडगे, अमेय जाधव, लालासाहेब देसाई, संदीप वाईंगडे, सुरेश इंग्रोळे, शिवराज नाईक, राजेश होगाडे, शितल घोरपडे, शिवाजी शिंदे, नेताजी निकम, बाहुबली गाट आदीसह शहरातील सर्वपक्षीय नेते ,कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. हातकणंगले, कुंभोज, रुकडी, भादोले या गावातील नागरिकांनी भ्याड हल्लांचा निषेध करुन पाकिस्तान अतिरेक्यांच्या पुतळ्याचे दहन करुन कडकडीत बंद ठेवून शहिदांना आदरांजली वाहिली. आजरा कडकडीत बंद, निषेध फेरी म. टा. वृत्तसेवा, आजरा काश्मिर येथे पुलवामामध्ये गुरुवारी (ता. १४) सीआरपीएफच्या जवानांवर आत्मघातकी हल्ला करण्यात आला. या हल्ल्यामध्ये ४४ जवान शहीद झाले. या हल्ल्याचा सर्वच स्तरातून निषेध व्यक्त होत आहे. सोमवारी आजरा शहरात या हल्ल्याचा निषेध म्हणुन सर्व व्यवहार १०० टक्के बंद ठेवण्यात आले. शहरातील मेडिकल व्यावसायिकांनी देखील दुकाने बंद ठेवत निषेध नोंदविला. शहिदांवरील हल्ल्याबाबत सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. शुक्रवार व शनिवारी कँडल मार्च तसेच निषेध रॅली व निवेदने देऊन नागरिकांनी आपला संताप व्यक्त केला. शहरात बंद पाळण्यात आला. हा बंद १०० टक्के यशस्वी झाला. सोमवारी ग्रामीण भागात पाळक असतो. त्यामुळे शहरात गर्दी असते. मात्र बंदमुळे आज पूर्णत: शुकशुकाट जाणवत होता. सकाळी ११ वाजता सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी पाकिस्तानच्या विरोधात घोषणाबाजी करीत निषेध फेरी काढली आणि संभाजी चौकात पाकिस्तानचा प्रतिकात्मक पुतळा जाळला. कार्यकर्त्यांनी शहरातील आजरा महाविद्यालय, आजरा हायस्कूल, व्यंकटराव हायस्कूल, ऊर्दू हायस्कूल, रोझरी हायस्कूल, पं. दीनदयाळ विद्यालय या शाळात जाऊन शाळांना बंद करण्याची व सुटी देण्याची मागणी केली. यामुळे सर्व शाळाही बंद होत्या. एसटी वाहतूकसुद्धा बंद करण्यात आली. यामुळे १०० टक्के आजरा शहर बंद होते. या बंदमध्ये सर्वपक्षीय, सर्वधर्मीय कार्यकर्ते तसेच विविध संघटना सहभागी झाल्या होत्या.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट