म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
विधानसभेला स्वतंत्र लढण्याची चार वर्षे तयारी करत असलेल्या भाजपसमोर युतीमुळे अडचणींचा डोंगर उभा राहणार आहे. युतीच्या सूत्रानुसार शिवसेनेला सहा जागा द्याव्या लागणार असून उर्वरित चार जागांच भाजपला मिळण्याची चिन्हे आहेत. नव्या निर्णयाने पन्हाळा-शाहूवाडी मतदारसंघातील जनसुराज्य शक्ती पक्षाचे अध्यक्ष, माजी मंत्री विनय कोरे यांची मोठी अडचण होणार आहे. महाआघाडीतून बाहेर पडण्याशिवाय त्यांच्यासमोर दुसरा पर्याय राहणार नसून युतीचा सर्वाधिक फायदा सेनेचा होणार आहे. मात्र, विधानसभेची तयारी करत असलेल्या भाजपचे नेते, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेश जाधव, शिरोळ भाजपचे अनिल यादव, शिवसेनेचे संग्राम कुपेकर, कागलचे माजी आमदार संजय घाटगे अशा अनेकांची चांगलीच कोंडी झाली आहे.
शिवसेना व भाजपची युती सोमवारी रात्री जाहीर झाली. त्यांचे जागा वाटप झाल्याने विधानसभेला जिल्ह्यात सध्याच्या सहा जागा मिळणार हे जवळजवळ निश्चित आहे. उर्वरित चारपैकी दोन जागाांवर भाजपचे आमदार आहेत. चंदगड आणि कागलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार असून या जागा भाजपला मिळण्याची शक्यता आहे. ही युती व्हावी यासाठी सेनेच्या आमदरांचा आग्रह होता. भाजप तर त्यासाठी अगतिक झाल्याचे चित्र होते. आता युतीची घोषणा झाल्याने विधानसभेच्या हालचालींना वेग येणार आहे.
विनय कोरेंचे काय करणार
विधानसभेच्या जिल्ह्यात दोन जागा देण्याचा शब्द देत जनसुराज्य शक्ती पक्षाला भाजपने महाआघाडीत सामील करून घेतले. पण, हातकणंगले आणि पन्हाळा या जनसुराज्य पक्षाच्या हक्काच्या जागा शिवसेनेकडे असतील. तेथे सेनेचे विद्यमान आमदार आहेत. त्यामुळे या जागा ना भाजपला मिळतील ना जनसुराज्यला. त्यामुळे आघाडीत घेतलेल्या विनय कोरेंचे काय करायचे हा मोठा प्रश्न महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासमोर असेल. मैत्रीपूर्ण लढत करायची की आघाडीतून बाहेर पडायचे याबाबत कोरेंना तातडीने निर्णय घ्यावा लागणार आहे.
कागल, चंदगडमध्ये सेनेची अडचण
युती करताना सहा मतदार संघ सेनेकडेच असतील. उर्वरित कागल, चंदगड, कोल्हापूर दक्षिण व इचलकरंजी या चार मतदार संघावर भाजप दावा करेल. ते त्यांना मिळण्याची दाट शक्यता आहे. यामुळे मात्र कागलमधून इच्छूक असलेले संजय घाटगे व चंदगडमधून तयारी केलेले संग्राम कुपेकरांची मोठी अडचण होईल. सेना स्वतंत्र लढेल म्हणून हे दोघे चार वर्षे तयारी करत आहेत. त्यांना रिंगणात उतरणे अवघड होणार असले तरी म्हाडा चे अध्यक्ष समरजित घाटगे यांना मात्र सहजपणे उमेदवारी मिळणार आहे. चंदगडमध्ये अनेकजण इच्छूक असले तरी भाजपला उमेदवार निवडण्याचे आव्हान आहे. गोपाळराव पाटील, रमेश रेडेकर, अप्पी पाटील अशी काही नावे सध्या चर्चेत आहेत.
महेश जाधव, अनिल यादवांची कोंडी
कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून लढण्यासाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी जोरदार फिल्डींग लावली आहे. युतीमुळे आमदार राजेश क्षीरसागर हेच युतीचे उमेदवार ठरणार असल्याने जाधव यांच्या तयारीवर पाणी फिरणार आहे. युतीचा फायदा मात्र विद्यमान आमदारांना होणार आहे. जाधव यांच्यासारखीच अवस्था शिरोळमधील अनिल यादव यांची होणार आहे. अनेक वर्षे काँग्रेसमध्ये राहून त्यांना तेथे उमेदवारी मिळाली नाही. आता भाजपची उमेदवारी मिळावी म्हणून ते या पक्षात आले. पण हा मतदारसंघ सेनेकडे असल्याने त्यांना उल्हास पाटील यांचा प्रचार करावा लागणार आहे. भाजपमधून लढण्यासाठी राधानगरीत राहुल देसाई भाजपवासी झाले. पण तेथेही त्यांना रिंगणात उतरता येणार नाही.
फायदा सेनेलाच
सहा मतदारसंघात सेनेचे आमदार असल्याने हे सर्व मतदारसंघ या पक्षाला मिळतील. तेथे भाजपची ताकद मिळणार असल्याने या सहा ठिकाणी धनुष्यबाणाला मदत होणार आहे. याशिवाय भाजपला कागल व चंदगडमध्ये मदत होईल. कोल्हापूर दक्षिण व इचलकरंजी मतदारसंघ भाजपकडेच असतील. भाजपने उमेदवारी देतो म्हणून तीन वर्षात अनेकांच्या हातात कमळ दिले आहे. पण त्यांना उमेदवारी देणे अवघड होणार आहे.
पालकमंत्र्यांचे काय?
पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे कोल्हापूर उत्तर मतदारसंघासह राधानगरी-भुदरगड मतदारसंघातून लढतील अशा शक्यता वर्तविण्यात येत होत्या. मात्र, आता युती झाल्याने उत्तर मतदारसंघ सेनेचे आमदार राजेश क्षीरसागर, राधानगरी-भुदरगड मतदारसंघ आमदार प्रकाश आबिटकर यांच्याकडेच राहिल. दोन्ही मतदारसंघ सेनेकडे असल्याने पालकमंत्री पाटील हे कोठून लढणार ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
यांचा होणार फायदा ?
- राजेश क्षीरसागर
- सुजित मिणचेकर
- प्रकाश आबिटकर
- उल्हास पाटील
- सत्यजित पाटील
- चंद्रदीप नरके
- सुरेश हाळवणकर
- अमल महाडिक
यांची होणार कोंडी
- महेश जाधव
- राहुल देसाई
- संजय घाटगे
- अनिल यादव
- विनय कोरे
- राजू आवळे
- सत्यजित कदम