फोटो आहे
Maruti.Patil
@timesgroup.com
tweet: @MarutipatilMT
कोल्हापूर : महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकांकडून शहरात गेल्या १५ दिवसांपासून अतिक्रमण विरोधी कारवाई सुरू आहे. ठिकठिकाणचा विरोध मोडीत काढत पथकाने शहरातील अनधिकृत व विनापरवाना १५०० अतिक्रमणांवर हातोडा घातला आहे. पथकाच्या धडक कारवाईमुळे अनेक रहदारीचे रस्ते मोकळे झाले असून पादचाऱ्यांना फूटपाथचा वापर करता येऊ लागला आहे. परिणामी सर्वसामान्य शहरवासियांकडून कारवाईचे जोरदार स्वागत करून कारवाई नियमितपणे सुरू ठेवण्याची मागणी होऊ लागली आहे.
अनधिकृत व विनापरवाना जाहिरात फलकांमुळे शहराला विद्रुपीकरण प्राप्त झाले असतानाच अनेक महत्त्वाच्या चौकात व रहदारीच्या रस्त्यावर दुकानदारांनी केलेल्या अतिक्रमणामुळे पादचाऱ्यांना चालणेही मुश्कील बनले होते. विशेषत: महाद्वार, ताराबाई रोड, दसरा चौक, लक्ष्मीपुरी परिसर, व्हीनस कॉर्नर व राजारामपुरी आदी ठिकाणी मोठ्या वाहतूक कोंडीला सामारे जावे लागत होते. शहरात दिवसेंदिवस वाढत जात असलेल्या अतिक्रमणांकडे अतिक्रमण विभागासह प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने नगरसेवक व नागरिकांमध्ये संताप निर्माण झाला होता.
१९ डिसेंबरच्या महासभेत अतिक्रमण विभागाच्या भोंगळ कारभारवर टिकेचा भडिमार करताना संपूर्ण विभाग बरखास्त करण्याची मागणी केली होती. त्यानंतर खडबडून जागे झालेल्या प्रशासनाने व महापौर सरिता मोरे यांनी अतिक्रमण हटवण्याचे आदेश दिले. त्यानंतर पथकांने शहरात कारवाईचा धडाका लावला. शहर विद्रुपीकरण करणारे जाहिरात फलक, बॅनर्स हटवण्याबरोबरच अनधिकृत हातगाड्या व केबिन्सवर कारवाई केली. फेरीवाल्यांच्या हातगाड्या व केबिन्स हटवताना काही ठिकाणी विरोध व वादही झाला. पण पथकाने विरोध मोडीत काडत अतिक्रमणावर हातोडा घातला. शहरात सुरू असलेल्या या मोहिमेचे शहरवासियांकडून स्वागत होत असताना शिवसेना फेरीवाला संघटनेने मोर्चा काढून विरोध केला. पण प्रशासनाने त्याला कोणताही प्रतिसाद न देता कारवाई सुरूच ठेवली आहे. सुरुवातीच्या टप्प्यात जाहिरात फलक, अनधिकृत केबिन्स, हातगाड्या हटवल्यानंतर लवकरच मोहीम आणखी तीव्र करण्यात येणार आहे. त्यासाठी पोलिस बंदोबस्तासाठी महापालिका प्रशासन प्रयत्नशील आहे.
शहरातील ब्लॅक स्पॉट मोकळे
अपवाद वगळता विरोधाशिवाय कारवाई
अतिक्रमण झाल्यास अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करावी
उपशहर अभियंत्याची फिरती आवश्यक
रहदारीच्या रस्त्यावर वॉच ठेवण्याची गरज
पंधरा दिवसांत अतिक्रमणमुक्त ठिकाणे
सीपीआर चौक, दसरा चौक, लक्ष्मीपुरी, व्हिनस कॉर्नर, फोर्ड कॉर्नर, आईसाहेब महाराज पुतळा परिसर, पापाची तिकटी, भाऊसिंगजी रोड, महाद्वार रोड, ताराबाई रोड, गंगावेश, रंकळा स्टँड, न्यू शाहूपुरी, फिरंगाई मंदिर परिसर, जुना वाशीनाका, अंबाई टँक, राजारामपुरी, खरी, कॉर्नर, पाण्याचा खजिना, हॉकी स्टेडियम, संभाजीनगर.
अतिक्रमण विभागावर दबाव येत असल्याने अतिक्रमण निर्मूलन कारवाई होत नव्हती. महापौर व आयुक्तांनी अतिक्रमण हटवण्याचे आदेश दिल्यानंतर कारवाईला सुरुवात झाली. पण कारवाई झालेल्या ठिकाणी पुन्हा अतिक्रमण होऊ नये, यासाठी विभागीय कार्यालय, नगररचना, किंवा उपशहर अभियंत्यावर जबाबदारी निश्चिती केली पाहिजे.
अजित ठाणेकर, नगरसेवक
कोणताही पक्षपात न करता अतिक्रमण निर्मूलन मोहीम कायम ठेवावी. कारवाई केलेल्या ठिकाणांची पथकाने नियमित पाहणी करुन पुन्हा अतिक्रमण होणार नाही याची दक्षता घ्यावी. महाद्वार, ताराबाई रोड व राजारामपुरी अशा अत्यंत रहदारीच्या ठिकाणी पथकांने वारंवार पाहणी करावी. तसेच अतिक्रमण विभाग सक्षमपणे कार्यन्वित ठेवावा.
विजय खाडे-पाटील, नगरसेवक
गेल्या १५ दिवसांपासून सुरू असलेल्या अतिक्रमण निर्मूलन मोहिमेमध्ये किरकोळ स्वरुपाचा अडथळा वगळता कारवाईला फारसा विरोध झालेला नाही. कारवाईनंतर दोनवेळा पाहणी करुन पुन्हा अतिक्रमणे हटवली आहेत. कारवाईचा धडाका असाच सुरू राहणार आहे. प्रशासनाच्या पाठबळामुळे कारवाईला जोरात सुरू आहे.
पंडित पवार, अतिक्रमण विभागप्रमुख
अतिक्रमण हटवलेले साहित्य
डिजिटल बोर्ड : ९०
बॅनर व स्टँडी : १,१७४
शेड : १०५
केबिन्स : ५३
हातगाड्या : ७८
कारवाईत सहभागी कर्मचारी
उपशहर अभियंता : चार
अतिक्रमण विभाग प्रमुख : एक
नियमित कर्मचारी : ५०