म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर एमएससीआयटी प्रशिक्षण मुदतीत पूर्ण केले नसल्याच्या कारणावरुन कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीतील रकमेत कपात केली जात आहे. त्यामुळे हजारो कर्मचाऱ्यांना आर्थिफ फटका बसत आहे. वेतन वसुलीला आठवडाभरात कायमस्वरुपी स्थगिती मिळावी आणि त्या संदर्भातील आदेश तत्काळ निघावा यासाठी प्रयत्न करू' अशी ग्वाही आमदार प्रकाश आबिटकर यांनी दिली. रविवारी आचार्य विद्यानंद सांस्कृतिक भवनात कोल्हापूर जिल्हा परिषद कर्मचारी युनियन व सर्व संवर्ग संघटना, आरोग्य कर्मचारी संघटना, ग्रामसेवक संघटना, व सर्व शिक्षक संघटनांतर्फे एमएससीआयटी प्रशिक्षण आणि वेतन वसुली यासंदर्भात आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी मेळावा झाला. मेळाव्यात 'वेतन वसुलीला कायमस्वरुपी स्थगिती मिळावी, अन्यथा आंदोलनाशिवाय पर्याय नाही असा इशारा विविध कर्मचारी संघटनांनी दिला. कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला न्याय मिळावा म्हणून आमदार आबिटकर यांनी सातत्याने प्रयत्न केल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. आमदार आबिटकर यांनी एमएससीआयटी प्रशिक्षणप्रश्नी आठवडाभरात मंत्रालयात संबंधित विभागाच्या सचिवांची बैठक घेऊन कायमस्वरुपी तोडगा काढू असे सांगितले. आरोग्य कर्मचारी संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष एम. एम. पाटील म्हणाले, 'एमएससीआयटी प्रशिक्षणप्रश्नी वेतन वसुलीला तात्पुरती स्थगिती देण्याचा निर्णय झाला. पण कर्मचाऱ्यांना पुन्हा वेतनवाढीतील रकमेच्या वसुली संदर्भात नोटीसा दिल्या आहेत. लाखो रुपयांचा फटका बसत आहे. याप्रश्नी लवकर सामान्य प्रशासन विभाग, माहिती व तंत्रज्ञान विभाग आणि ग्राम विकास विभागाच्या मुख्य सचिवांची एकत्रित बैठक घेऊन वेतन वसुली थांबविण्याचा आदेश निघावा.' याप्रसंगी ग्रामसेवक संघटनेचे के. आर. किरुळकर, शिक्षक संघटनेचे मोहन भोसले यांची भाषणे झाली. शिक्षक संघटनेचे राजाराम वरुटे यांनी प्रास्ताविक केले. कर्मचारी युनियनचे धनंजय जाधव यांनी स्वागत केले. याप्रसंगी एम. आर. पाटील, बी. डी. चौगुले, विजय पाटील, सुरेश सुतार, प्रविण मुळीक, अल्ताफ शेख, रवि पाटील, सुरेश कोळी, प्रमोद तौंदकर, रामदास झेंडे प्रमुख उपस्थित होते. निर्णय घ्यायला भाग पाडू आरोग्य कर्मचारी संघटनेचे राज्याध्यक्ष अरुण खरमाटे म्हणाले, 'एमएससीआयटी प्रशिक्षण प्रश्नी कर्मचाऱ्यांना नाहक त्रास होऊ नये म्हणून प्रयत्न सुरू आहेत. मात्र, प्रशासनातील काही मंडळी यामध्ये आडकाठी आणत आहेत. जाणूनबुजून त्रास देण्याचा खटाटोप चालू राहिल्यास राज्यभर आंदोलन छेडू. त्यामुळे प्रशासनाला काम करणे मुश्किल होईल. कर्मचाऱ्यांच्या बळावर योग्य निर्णय घ्यायला प्रशासनाला भाग पाडू.'
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट