म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर राज्य सरकारने गुरुवारी हिवाळी अधिवेशनात मराठा समाजाला आरक्षण जाहीर केल्यानंतर सकल मराठा समाजाने आरक्षणच्या लढ्यात बलिदान दिलेल्या ४२ जणांना अभिवादन केले. तर शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाने स्वतंत्रपणे ढोल-ताशांच्या गजरात आणि फटाके फोडून आरक्षणाच्या निर्णयाचा जल्लोष केला. राज्य सरकारने दुपारी विधानसभा व विधानपरिषदेत मराठा आरक्षण विधेयक पटलावर ठेवल्यानंतर ते एकमताने मंजूर करण्यात आले. त्यानंतर सकल मराठा समाजाने 'एक मराठा, लाख मराठा' अशा घोषणा देत सायंकाळी दसरा चौकात राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्याजवळ मेणबत्त्या प्रज्वलित करुन आंदोलनात बलिदान दिलेल्या ४२ जणांना आदरांजली वाहिली. तर भाजपचे कार्यकर्ते दुपारीच रस्त्यावर उतरले. त्यांनी बिंदू चौक आणि दसरा चौकात साखर, पेढे वाटून आनंद व्यक्त केला. शिवसेनेनेही दसरा चौकात जल्लोष केला. मराठा समाजाचे हुतात्मांना अभिवादन राज्य सरकारने मराठा आरक्षणाची घोषणा केल्यानंतर सकल मराठा समाजाने जल्लोष साजरा न करता आरक्षणाच्या प्रश्नी बलिदान दिलेल्या राज्यातील ४२ कार्यकर्त्यांना मेणबत्त्या प्रज्वलीत करून अभिवादन केले. आरक्षणाची लढाई ५० टक्के जिंकली असून पुढची ५० टक्के लढाईसाठी यापुढे लढा देऊ असा निर्धार यावेळी करण्यात आला. दसरा चौकातील राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्याला कार्यकर्त्यांनी अभिवादन करण्यात आले. यावेळी समन्वयक वसंत मुळीक म्हणाले, 'राज्य सरकारच्या भूमिकेचे आम्ही स्वागत करतो. कोल्हापूर ही आरक्षणाची नगरी आहे. समाजातील तरुणांनी बलिदान दिले आहे. आरक्षणासाठी समाजाने रस्त्यावर आणि कोर्टात दीर्घकाळ लढा दिला.' इंद्रजित सावंत म्हणाले, 'गेली तीस-चाळीस वर्षे लढाई देऊन आज आपण एक छोटी पायरी चढलो आहोत. मागासवर्ग आयोगाकडे एक लाख ८७ हजार निवेदने देऊन समाजाचा ओबीसीत समावेश करावा अशी मागणी केली होती. आघाडी सरकारने समाजाला दिलेले आरक्षण सहा महिने टिकले होते. या सरकारनेही स्वतंत्र कोट्यातून आरक्षण दिले आहे. ओबीसींतून आरक्षण न दिल्याने आज ५० टक्के विजय मिळवला आहे असे म्हणावे लागले.' हर्षल सुर्वे म्हणाले, 'समाजाने ओबीसीमध्ये टक्का वाढवावा केलेली मागणी मान्य झालेली नाही. आजच्या निर्णयाने समाजाला राज्यातील नोकऱ्यांत फायदा होणार आहे. पण केंद्रीय स्तरावरील परीक्षांत फायदा होणार नाही. तसेच हे आरक्षण टिकावे यासाठी समाजाला रस्त्यावरील लढाईबरोबर कोर्टात वकिलांची फौज ठेवावी लागणार आहे.' मुस्लिम बोर्डिंगचे चेअरमन गणी आजरेकर यांनी १६ टक्के आरक्षणामुळे मराठा समाजाला सवलती मिळतील अशी प्रतिक्रिया दिली. यावेळी स्वप्निल पार्टे, सचिन तोडकर, शाहीर दिलीप सावंत, प्रदीप जाधव, दुर्गेश लिंग्रस, अवधूत पाटील, शशिकांत पाटील, शैलजा भोसले, नेहा मुळीक यांच्यासह कार्यकर्ते सहभागी होते.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट