प्रा. एन. डी. पाटील यांची माहिती, कृषी पंपांची वीज दरवाढ कमी करण्याची मागणी म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर 'कृषी पंपांची अन्यायी वीज दरवाढ कमी करण्याचे आश्वासन सरकारने पाळले नाही. यामुळे २४ डिसेंबरला महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशनच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर, सांगली, सातारा, पुण्यापर्यंत ठिकठिकाणी राष्ट्रीय महामार्ग रोको आंदोलन केले जाईल. कोल्हापुरातील आंदोलन महामार्गावरील पंचगंगा पुलावर होईल', अशी माहिती ज्येष्ठ नेते प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. प्रा. पाटील म्हणाले, 'कृषी पंपांची वीजदरवाढ एकतर्फी, अन्यायी केली आहे. यामुळे वाढलेली वीज दरवाढ कमी करावी, या मागणीसाठी २७ मार्चला वीज ग्राहकांचा धडक मोर्चा विधानभवनावर आयोजित केला होता. त्यावेळी जिल्हातील आमदारांच्या शिष्टमंडळासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी चर्चा केली. चर्चेत राज्यातील सर्व ४१ लाख शेतीपंपधारकांची वीजबिले दुरूस्ती केली जातील, वीज बिले दुरूस्त झाल्यानंतरच कृषी संजीवनी योजना राबवण्यात येईल, उपसा जलसिंचन योजनांची बिले १ रूपये १६ पैसे प्रतियुनिट दराने भरून घेतली जातील, उच्चदाब वीज ग्राहकांच्या बिलातील थकबाकी १५ ऑगस्ट २०१८ पर्यंत निकाली काढल्या जातील, शेत जमिनीचे सरकारी पाणी आकाराचे दर निश्चित करण्यात येतील, असे आश्वासन दिले होते. मात्र प्रत्यक्षात यातील एकही आश्वासन पूर्ण झालेले नाही. म्हणूनच हायवे रोको आंदोलन करण्यात येणार आहे.' महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे म्हणाले, 'सरकार चार वर्षे खोटी आश्वासने देत आहे. आतापर्यंत चारवेळा कृषी पंपांची अन्यायी वीज दरवाढ केली. पाचव्यांदा दरवाढ करण्याची तयारी केली आहे. याला शेतकऱ्यांचा विरोध आहे. वाढीव वीजदर कमी करण्यासाठी दिलेल्या आश्वासनाच्या पुर्ततेसाठी ऊर्जामंत्री बावनकुळे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. मात्र आतापर्यंत त्यांनी काहीही केले नाही. हायवे रोको आंदोलनात खासदार राजू शेट्टी, धनंजय महाडिक यांच्यासह आमदार सतेज पाटील सहभागी होतील. विरोधी पक्षांच्या नेत्यांनाही आमंत्रण दिले आहे. मोठ्या संख्येने शेतकरी रस्त्यावर येतील. जोपर्यंत सरकार वाढीव वीज बिल कमी करण्याचा आदेश काढत नाही, प्रत्यक्ष अंमलबजावणी होत नाही, तोपर्यंत आंदोलन स्थगित करण्यात येणार नाही.' यावेळी बाबसाहेब भुयेकर, आर. जी. तांबे, विक्रांत पाटील, मारूती पाटील आदी उपस्थित होते. --------------- चौकट शेतीपंप वीजवापरात घोटाळा 'प्रचंड प्रमाणात होणारी वीजगळती, चोरी, भ्रष्टाचार झाकत सरकारी अनुदान लाटून महावितरणने मोठा घोटाळा केला. विद्युत नियामक आयोगाच्या निकालावरून घोटाळ्यावर शिक्कामोर्तब झाल्याचा आरोप होगाडे यांनी यावेळी केला. सरकारने आयोगावर आपल्याला हव्या त्या आणि रबरी शिक्क्याप्रमाणे कार्यपध्दती असलेल्या लोकांची निवड केली असल्याचा आरोपही त्यांनी केला.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट