फोटो आहेत कोल्हापूर टाइम्स टीम कचरा उठाव करण्यास खासगी ठेकेदाराचे होणारे दुर्लक्ष, सुरक्षारक्षकांची वाणवा आणि साफसफाईअभावी स्वच्छतागृहातून येणाऱ्या दुर्गंधीमुळे महापालिकेशेजारी असलेले छत्रपती शिवाजी मार्केट बकाल झाले आहे. या इमारतीतील भाजी मंडईत दिवसा आणि रात्रीही प्रेमी युगलांचा वावर असतो. रात्रीच्या ही जागा मद्यपींचा हक्काचा बार बनल्यासारखी आहे. या इमारतीत महापालिकेचा इस्टेट विभाग, पाणीबिल भरणा केंद्र, प्राथमिक शिक्षण विभाग आणि अन्य महत्त्वाची कार्यालयेही आहेत. महापालिकेच्या मुख्य कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर छत्रपती शिवाजी मार्केट. सुपर मार्केटचा दर्जा असलेल्या मार्केटमध्ये तब्बल २२० दुकानगाळे आहेत. त्याचबरोबर विस्तीर्ण अशा भाजी मंडईसह महापालिकेची शिक्षण, पाणी, इस्टेट अशी महत्त्वाची कार्यालये आहेत. महापालिकेची कार्यालये वगळता मार्केटमधील इतरठिकाणी मात्र अस्वच्छतेचे साम्राज्य निर्माण झाले आहे. यापूर्वी मार्केटमधील कचरा उठाव आणि स्वच्छता महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून नियमित केली जात होती. पण गेल्या काही महिन्यांपासून खासगी ठेकेदराला कचरा उठाव करण्यास परवानगी दिल्याने येथून नियमित कचरा उठवा केला जात नाही. ठिकठिकाणी साचलेला कचरा आणि स्वच्छतागृहातून सुटलेल्या दुर्गंधीमुळे नाक मुठीत घेऊनच चालावे लागते. या इमारतीच्या अनेक भिंती पान, गुटखा खाऊन रंगवल्या आहेत. मार्केटमध्ये एकीकडे स्वच्छतेचे तीन तेरा वाजलेले असताना भाजी मंडईमध्ये व्यापारी नसल्याने प्रेमी युगलांसह भटक्यांचा दिवसभर वावर सुरू असतो. शहरातील मध्यवस्तीत असलेले या मार्केटमधील काही भाग बंदिस्त असल्याने प्रेमी युगुलांना कोणीही हटकत नाहीत. काही व्यापाऱ्यांनी त्यांना हटकले असता वादावादी होत असल्याने त्याकडे दुर्लक्ष केले जाते. दिवसभर प्रेमी युगुलांचा असलेला वावर रात्री उशिरापर्यंत सुरू असतो. रात्री आठनंतर या इमारतीचा ताबा मद्यपी घेतात. मध्यंतरी पोलिसांनी ओपन बारवर कारवाई केल्यामुळे महापालिकेच्या इमारतींमध्ये मद्यंपींचा अड्डा भरत आहे. अनेकदा येथे रस्सामंडळही होत असल्याने येथे रिकाम्या वाट्या, ग्लास, पत्रावळ्यांचे ढीग पडलेले असतात. महापालिकेने येथे कार्यालयांसाठी सुरक्षारक्षकांची नेमणूक केली आहे. सुरक्षारक्षक केवळ कार्यालयांची देखरेख करतात, पण इतर ठिकाणी सुरक्षारक्षक नसल्याने बिनबोभाटपणे जेवणावळीसह इतर अवैद्य प्रकार सुरू असतात. येथील व्यापाऱ्यांनी अनेकवेळा प्रशासनाच्या याबाबतची माहिती दिली. पण याकडे फारशा गांभीर्याने प्रशासनाने पाहिलेले नाही. मार्केटमधील अंतर्गत सुविधांचा असा बोजवारा उडाल्याने पावसाळ्यामध्ये मार्केटमध्ये थेट पाणी येते. चप्पल लाइन येथील गटर बुजल्यामुळे पावसाचे पाणी येत असल्याचे अनेकवेळा प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले. पण त्याकडेही दुर्लक्ष केल्याने पावसाळ्यामध्ये तर मार्केटमध्ये दुर्गंधीमध्ये अधिक वाढ होत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. ३८ वर्षांत मार्केटला एकदाही रंगरंगोटी नाही गाळेधारकांच्या डिपॉझिटमधून मार्केटची उभारणी झाली. सुपर मार्केटचा दर्जा असलेल्या या मार्केटमध्ये पिण्याच्या पाण्यासह स्वतंत्र स्वच्छता गृह असणे अपेक्षित आहे. पण अशी कोणतीही सुविधा नसताना भाडे आकारणी मात्र सुपर मार्केटप्रमाणे केली जाते. जमा होणाऱ्या भाड्यातून ३८ वर्षांत एकादाही मार्केटची रंगरंगोटी केली नसल्याचा आरोप दुकानगाळेधारक करत आहेत. भाजी मार्केटच्या पाच हजार स्क्वेअर फुटात केवळ सहा ते सात व्यापारी आहेत. रस्त्यावर भाजीपाला विक्री सुरू असल्याने येथील व्यापाऱ्यांची संख्या रोडवली आहे. परिणामी येथे प्रेमी युगलांवर वाढला आहे. तर रात्रीच्यावेळी मार्केट मद्यपींचा अड्डाच बनून जातो. समीर बागवान, विक्रेते भाड्याचा दहा टक्के निधी देखभार दुरुस्तीसाठी राखीव ठेवला जातो. राखीव निधी मार्केटच्या कामासाठी वापरला जात नाही. चप्पल लाइनची गटर बुजल्यामुळे पावसाचे पाणी थेट मार्केटमध्ये येत आहे. बबन महाजन, दुकान गाळा मालक
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट