धागा ... संस्कृतीचा, परंपरेचा .......... लोगो
..................
कर्नाटकाच्या विविध भागातील बांधव झाले कोल्हापूरशी समरस
म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
कुणी व्यापार व्यवसायाच्या निमित्ताने तर कुणी रोजगाराच्या शोधात कोल्हापूर गाठले. काही संस्थानकाळात तर काहीजण ७० ते ८० वर्षापूर्वी कोल्हापुरात स्थायिक झाले आहेत. आता या कुटुंबीयांची चौथी, पाचवी पिढी कोल्हापुरात आहे. कर्नाटकाच्या विविध भागातील ही मंडळी कोल्हापूरशी समरस झाली आहेत. विविध जातीधर्मातील या मंडळींनी गावाकडील पाऊलखुणा जपताना येथील संस्कृती, रितीरिवाज पूर्णपणे अंगिकारली आहे. सण समारंभापासून गणेशोत्सवापर्यंत या मंडळीनी दोन्ही प्रातांतील संस्कृतीचा मिलाफ घडवत उत्सवाचा न्यारा थाट निर्माण केला आहे.
सीमाभागातील बेळगाव, चिकोडी, निपाणीसह अथणी, विजापूर, धारवाड, हुबळी अशा विविध भागातून कोल्हापुरात येऊन स्थायिक झालेल्या नागरिकांची संख्या हजारोंच्या पटीत आहेत. काही कुटुंबे व्यापारात आहेत तर काही नोकरी, व्यवसाय करत आहेत. कोल्हापुरातील धान्य व्यापारात तर नष्टे, कटके, लकडे, दिवटे, गाडवे, हळदे, वाली, कदम, कामत, रासम, पाटील, अथणे, माने अशी कितीतरी कुटुंबे आहेत. यांच्यासह विविध जातीधर्मातील लोक नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने कोल्हापूरकर बनले. मूळचे कर्नाटकचे असलेल्या आणि गेल्या पाच पिढया कोल्हापूरच्या मातीशी समरस झालेल्या कुटुंबीयांचा आज विस्तार झाला आहे. सण, समारंभ उत्सवात सगळे भाऊबंद जमतात. बाप्पांच्या स्वागतासाठी काही ठिकाणी कुटुंबीयांच्या तीन पिढ्या एकत्र येतात.
'बाप्पाच्या आगमनाच्या वार्तेपासून शनिवार पेठेतील काकांच्या घरी एकच धामधूम असते. प्रत्येकजण बाप्पाच्या स्वागताच्या तयारीत गुंतलेला असतो. गणेशमूर्ती भोवती सजावट, रोषणाईसाठी तर बच्चे कंपनीही सरसावलेली असते. घरगुती गणेश उत्सव कालावधीत रोज सकाळ आणि संध्याकाळी कुटुंबातील सगळे सदस्य जमतात. नष्टे कुटुंबीय हे कोल्हापूरशी समरस झाले आहेत. कोल्हापूरची संस्कृती, रितीरिवाज, सण समारंभ सारं काही इथल्या संस्कृतीशी मिळतेजुळते असल्याचे संदीप नष्टे यांनी सांगितले. संदीप हा नष्टे कुटुंबांतील कोल्हापुरातील चौथ्या पिढीचा प्रतिनिधी.
व्यापार, रोजगाराच्या शोधार्थ अनेकांनी कोल्हापूरची वाट धरली. या उद्यमशील नगरीत अनेकांनी अर्थार्जनासाठी वेगवेगळे व्यवसाय सुरू केले. पूर्वापार व्यापार व्यवसाय सांभाळत असतानाच काहीजणांनी आता वेगवेगळे व्यवसाय सुरू केले आहेत. मात्र सण, समारंभ, उत्सव आणि त्या माध्यमातून संस्कृतीशी विणलेली घट्ट नाळ कायम आहे. घरगुती स्वरुपात गणेशोत्सव साजरा करण्याबरोबरच सार्वजनिक तरुण मंडळाच्या गणेशोत्सवात त्यांचा सहभाग आहे. ही मंडळी रहायला वेगवेगळ्या ठिकाणी असली तरी सण, समारंभाला एकत्र येतात. गणेश चतुर्थीची तयारी आठ दिवस अगोदर सुरू होते. या उत्सवासाठी सगळी भावंडे, त्यांची मुले एकवटतात. सकाळ, संध्याकाळ पूजा अर्चा, आरती होते. या निमित्ताने तीन पिढ्या एकत्र येतात.
.................
गौराई गीतांची परंपरा
गल्लीत घरोघरी गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना होते. पाच दिवसाचा उत्सव संपला की घरगुती गणेशमूर्तीची विसर्जन मिरवणूक एकत्र काढली जाते. आजही वाजतगाजत विसर्जन मिरवणूक निघते. पूर्वी गणेश उत्सवाच्या कालावधीत झिम्मा फुगडी व इतर सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या स्वरुपात व्हायचे. मुली, गृहिणी लोकगीते, झिम्मा फुगडीवर फेर धरायच्या. गल्लोगल्ली गौराईची गाणी रंगायची. नव्या पिढीतील युवतीही गौराईची गीते म्हणत परंपरा जपत आहेत.