आपण समाजाचाच भाग आहोत, ही जाणीव कलाकाराला स्वत:लाच व्हायला हवी. त्यासाठी त्याने स्वत:ला समाजाशी जोडून घ्यायला हवे; अन्यथा तो व्यवस्थेचा टीकाकार कधी होणार? असा सवाल ज्येष्ठ समीक्षक आणि विचारवंत प्रा. गौतमीपुत्र कांबळे यांनी व्यक्त केला. सेक्युलर मूव्हमेंटने पाचगणीमध्ये महाराष्ट्रातील निवडक चित्रकारांची कार्यशाळा घेतली होती. त्यातील कलाकृतींच्या प्रदर्शनाचा प्रारंभ कोल्हापुरात आज (रविवार) पासून होत आहे. या पार्श्वभूमीवर प्रमुख संयोजक असलेले प्रा. कांबळे यांच्याशी साधलेला संवाद….
००००००
अस्वस्थतेचा हुंकार साहित्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात व्यक्त झाला. तसा तो चित्र-शिल्पकलेच्या माध्यमातून व्यक्त होतोय का?
सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा की, भाषेचे व्याकरण, शब्द याची जी सार्वत्रिक साक्षरता निर्माण झाली, तशी चित्राची भाषा, रंगरेषा, त्याचे व्याकरण याची सार्वत्रिक साक्षरता झाली नाही. दुसरा मुद्दा असा की, प्रत्येक माध्यमाची जशी ताकद असते, तशी त्याची एक मर्यादाही असते. या सगळ्या प्रकाराला शिक्षणपद्धतीही जबाबदार आहे किंवा त्या त्या क्षेत्रातील जाणकारही जबाबदार आहेत. एक मात्र खरे आहे की, हजार पानांच्या पुस्तकाने जो परिणाम होणार नाही, त्याहून अधिक परिणाम एखाद्या चित्राच्या माध्यमातून होऊ शकतो.
आता मुद्दा असा की, पहिली गोष्ट म्हणजे भाषा आणि साहित्य, चित्र आणि कला यांची मांडणी आणि फरकामध्ये तुलना होऊ शकत नाही. हीही गोष्ट खरी आहे की, जेव्हा एखादी व्यवस्था जाचक बनते तेव्हा तिच्याविरुद्धचा एक निषेध, तिच्याविरुद्धचे आपले मत मांडण्याचे कर्तव्य प्रत्येक माध्यमाने केले पाहिजे, साहित्याच्या माध्यमातून ते केले असले तरी त्याची जेवढी प्रसिद्धी झाली किंवा आधी म्हटल्याप्रमाणे त्याची सार्वत्रिक साक्षरता असल्यामुळे लोकांपर्यंत ते जेवढ्या प्रमाणात पोहोचले तेवढ्या प्रमाणात ते कलेच्या म्हणजे चित्रांच्या माध्यमातून असो, शिल्पकला असो, ते पोहोचलेले नाही. यासाठी हेतूपुरस्सर प्रयत्न करावे लागतील.
सेक्युलर मूव्हमेंटने तशी सुरुवात केलेली आहे. आणखी एक गोष्ट की, भारतासारख्या देशात आजही अनेक कला जातीशी निगडित आहेत, ही एक मोठी शोकांतिकाच आहे. मला एवढेच म्हणायचे आहे की, साहित्याबद्दलच्या साक्षरतेइतकी साक्षरता चित्र आणि शिल्पकलेच्या बाबतीत झाली तर आविष्करणही तितक्याच ताकदीने होईल. मला वाटते की, अस्वस्थतेची जाणीव जेवढी साहित्यिकांना आहे, तेवढीच चित्र आणि शिल्प, कलावंतांना आहे; पण मुद्दा आहे तो त्याच्या आविष्कार करण्याच्या मर्यादेचा आणि ताकदीचा.
वर्तमानाबद्दल चित्रकार, शिल्पकार आणि कलावंत सजग तरी आहेत का? तुम्ही शिक्षणव्यवस्थेतील दोषाचा मुद्दा मांडला, शिक्षणव्यवस्थाच त्यांच्या आविष्करणातील अडथळा ठरते का?
शिक्षणव्यवस्थेत चित्रकला या विषयाचे दुय्यम-तिय्यम स्थान आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. म्हणजे चित्रकला हा विषय सक्तीचा केला तर पहिला मुद्दा बऱ्यापैकी निकालात निघतो. म्हणजे चित्रकलेचीही एक सार्वत्रिक भाषा तयार होईल ना?
सामाजिक बांधिलकी म्हणून किंवा व्यवस्थेविरोधात चित्रकलेच्या माध्यमातून आपले मत नोंदविणाऱ्या कलावंतांचा विचार केला तर मला आठवण येते ती एम. एफ. हुसेन यांसारख्या अपवादात्मक कलावंताची. ते सोडले तर फारसे काही प्रयोग झालेत, असे वाटत नाही; पण एक गोष्ट खरी की, व्यवस्थेविरोधात जेव्हा तुम्ही तुमचे माध्यम वापरता तेव्हा त्याची किंमतही मोजण्याची तयारी ठेवावी लागते आणि या संदर्भात चित्रकार हा मुळातच आपण समाजापासून वेगळे आहोत, अशा एका भ्रामक कोषात अडकलाय की काय, अशी शंका येते. म्हणजे 'मला काय त्याचे?... समाजात जे घडते त्याचा माझा संबंध नाही…' अशा एका भ्रामक समजुतीत तो अडकलाय की काय, अशी शंका येते. म्हणण्यापेक्षा ते एक वास्तवही आहे.
हा मुद्दा नेमकेपणानं कसा सांगाल?
म्हणजे असे की, जो जो कोणी संवेदनशील आणि विवेकी कलावंत आहे, तो तो आपले मत, आपला विचार मांडण्यासाठी आपले माध्यम वापरतोच. पुन्हा मुद्दा तिथेच आहे की, ज्या व्यवस्थेविरोधात आपले माध्यम वापरायचे त्या व्यवस्थेचे आकलन…... आणि त्याचाच अभाव आहे. म्हणजे नेमकेपणानेच बोलायचे म्हटले तर एखादा उत्कृष्ट चित्र काढणारा चित्रकार त्याला तो ज्या समाजात राहतो त्या समाजाचा इतिहास, भूगोल, संस्कृती, विचारप्रणाली, चळवळी याविषयी किती भान असते, असा एक प्रश्नच आहे ना!
म्हणजे आकलनाच्या पातळीवरच्याच मर्यादा आहेत का?
हो, आहेत! मर्यादा म्हणण्यापेक्षा जाणून घ्यायला बसला तर कुणापेक्षाही कलावंत कमी नाही. परंतु, आधी म्हटल्याप्रमाणे त्याला असे सतत वाटत राहते की, मी समाजापेक्षा कुणीतरी वेगळा आहे. आपण कलावंत आहोत, आपले आणि समाजाचे काही नाते नाही. त्याला कारण म्हणजे जगभरात जे चुकीचे समज पसरवले गेले, म्हणजे कलेसाठी कला, कलेचा हेतू लोकांना आनंद देणे, कलेचा विषय सामाजिक बांधिलकीचा असू शकत नाही, कुठल्यातरी विचाराला तुमची कला बांधली तर ती प्रचारकी थाटाची होईल आणि तशी ती झाली की, सौंदर्यमूल्याला दुरावते, असे जे समज त्या त्या क्षेत्रातील कलावंतांवर, कलाअभ्यासकांवर प्रस्थापित लोकांनी बिंबवले, त्याचाही कदाचित तो परिणाम असेल.
असे असेल तर त्यांच्या विचाराच्या कक्षा विकसित करण्यासाठी काय करावे लागेल?
महाराष्ट्रापुरते बोलायचे झाले तर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला पर्याय म्हणून किमान दहा-बारा साहित्य संमेलने सुरू असल्याची नोंद आहे. मग ते फुले-आंबेडकरी संमेलन असो, विद्रोही असो, बौद्ध, ग्रामीण, आदिवासी संमेलन असेल. …गावपातळीवरही वर्षांनुवर्षे साहित्य संमेलने भरताहेत. तशी चित्रकारांचीसुद्धा संमेलने भरवणे हा पहिला उपाय. दुसरे, याआधी महाराष्ट्रात चित्रकारांची संमेलने व्हायची. १९५१ साली शंकरराव किर्लोस्करांच्या उपस्थितीत संमेलन झाले होते. स्वातंत्र्यपूर्व काळापासून चित्रकारांची संमेलने होत होती. आम्ही पाचगणीत चित्रकारांची निवासी कार्यशाळा घेण्याचा प्रयत्न केला, तशा कार्यशाळा घेतल्या तरी चित्रकार, कलावंतांमध्ये भोवतालाचे एक सजग भान निर्माण व्हायला मदत होईल, असे वाटते. कलावंत हा समाजाचा भाग आहे. तो सजग असला पाहिजे, व्यवस्थेविरोधाचा टीकाकार असला पाहिजे, ही जाणीव त्याची त्यालाच व्हायला हवी. त्यासाठी त्याने स्वत:ला समाजाशी जोडून घ्यायला हवे; अन्यथा तो व्यवस्थेचा टीकाकार कधी होणार?
००००००