जिल्हाधिकारीपदासाठी खेमनार यांना कोल्हापूरकरांच्या शुभेच्छा म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर सभागृहात पदाधिकारी आणि अधिकारी आमने-सामने आले की बऱ्याचदा कामकाजातील त्रुटी, प्रशासकीय कामकाजावरुन टीकेची झोड असे चित्र पाहावयास मिळते. मात्र, सोमवारी जिल्हा परिषदेच्या राजर्षी शाहू सभागृहात अधिकाऱ्यांवर कौतुकवर्षाव आणि भविष्यकालीन वाटचालीला शुभेच्छा संदेश असा कार्यक्रम रंगला. शाब्दिक कोट्या, हास्य विनोदाची जोड अशा वातावरणात माजी मुख्य कार्यकारी अधिकारी कुणाल खेमनार यांचा निरोप समारंभ रंगला. भविष्यात खेमनार यांना कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्त पदावर संधी मिळावी अशी सदिच्छा सभागृहाने व्यक्त केली. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सर्जेराव पाटील यांच्या हस्ते अंबाबाईची मूर्ती देऊन खेमनार यांचा सत्कार झाला. खेमनार यांची चंद्रपूरच्या जिल्हाधिकारीपदी बदली झाली आहे. पदाधिकारी, सदस्य आणि अधिकारी कर्मचाऱ्यांच्या प्रेमाने भारावून गेलेल्या खेमनार यांनी 'कोल्हापुरात खूप काही शिकायला मिळालं, येथील अनुभवाची शिदोरी आयुष्यभर पुरणारी आहे. कोल्हापूरच्या नागरिकांनी भरभरुन प्रेम दिले. सगळयांची साथ मिळाल्यामुळे सकारात्मक काम करु शकलो. सरकारी योजना जनतेपर्यंत पोहचवू शकलो या साऱ्याचे श्रेय कोल्हापूरलाच आहे. भविष्यात रेशन कार्ड काढून कोल्हापुरात स्थायिक व्हायला आवडेल' अशा शब्दांत त्यांनी भावना व्यक्त केल्या. उपसभापती पाटील, शिक्षण समिती सभापती अंबरिश घाटगे, गटनेते अरुण इंगवले, सदस्य राजवर्धन निंबाळकर, पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रियदर्शिनी मोरे, वित्त व लेखाअधिकारी संजय राजमाने, 'करवीर'चे माजी सभापती प्रदीप झांबरे यांनी डॉ. खेमनार यांच्या कामकाज पद्धतीविषयी गौरवोद्गार काढले. डिजिटल शाळा, झिरो पेंडन्सी, दिव्यांग उन्नती अभियान, प्लास्टिकबंदीचा निर्णय, क्रिडा स्पर्धा अशा विविध योजना आणि उपक्रमांची यशस्विता ही खेमणार यांच्या कुशल नेतृत्व व सकारात्मक काम करण्याच्या वृत्तीमुळे शक्य झाल्याचे सगळयांनी प्राजंळपणे सांगितले. उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविकांत आडसूळ यांनी स्वागत केले. प्रा. संजय लोंढे यांनी सूत्रसंचालन केले. उपमुख्य लेखावित्त अधिकारी राहूल कदम यांनी आभार मानले. बांधकाम समिती सभापती सर्जेराव पाटील पेरीडकर, महिला व बालकल्याण समिती सभापती वंदना मगदूम, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी सुषमा देसाई आदींच्या उपस्थितीत कार्यक्रम झाला. समाजासाठी कार्यरत राहणार कार्यक्रमात अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रजित देशमुख यांनी स्वेच्छानिवृत्ती निर्णय मागे घ्यावा अशी विनंती काहींनी केली. याप्रसंगी देशमुख यांनी डॉ. खेमनार यांच्या कार्याची मुक्तकंठाने प्रशंसा केली. 'स्वेच्छानिवृत्तीचा निर्णय पूर्ण विचाराअंती घेतला आहे. भविष्यात शेतकरी आणि समाजाच्या भल्यासाठी कार्यरत राहीन' अशी ग्वाही खेमनार यांनी दिली.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट