म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
लीड
............
कोल्हापूर-वैभववाडी रेल्वे मार्गाच्या प्रत्यक्ष कामाला लवकरच सुरुवात होत असल्याची माहिती केंद्रीय वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू यांनी बुधवारी दिल्लीत दिली. यामुळे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र जोडण्याच्या महत्वकांक्षी योजनेला गती मिळाली. उद्योग, कृषी, व्यापार, पर्यटन अशा अनेक क्षेत्रांच्या विकासाचा हा मार्ग कोल्हापूरसह कोकणासाठी उपयुक्त ठरणार आहे. उद्योगांच्या वाढीसह कोकण आणि कोल्हापुरातील पर्यटनही बहरणार आहे. १०३ किलोमीटर अंतर असलेल्या या मार्गासाठी १३७५ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. यातील अर्धी रक्कम राज्य सरकार देणार आहे. सुरेश प्रभू यांनी रेल्वे खात्याचा कार्यभार स्वीकारल्यानंतर कोकण-कोल्हापूर जोडण्याच्या मागणीला गती मिळाली. अनेक वर्षांच्या मागणीनंतर साकारणारा हा रेल्वे मार्ग निर्धारित वेळेत पूर्ण व्हावा यासाठी मात्र लोकप्रतिनिधींना पाठपुरावा करावा लागेल.
..................
कृषी उत्पादनांची वाहतूक सुलभ
कोल्हापुरातून साखर, गूळ, दूध, अन्नधान्य, भाज्या, इथेनॉल, नवसागर, उद्योगांसाठी लागणारी साधने कोकणात पाठवली जातात. याशिवाय कोकणातून आंबा, काजूगर, मासळी, चिरा, कच्चे लोखंड, वाळू कोल्हापुरात आणले जाते. रोज तीनशे ते चारशे अवजड ट्रक आणि टेम्पोची वाहतूक कोकण ते कोल्हापूरदरम्यान सुरू असते. यातून कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. रस्तेमार्गांवरून सध्या सुरू असलेली वाहतूक खर्चिक आणि वेळखाऊ आहे. या तुलनेत रेल्वे वाहतूक कमी खर्चिक आणि वेळेची बचत करणारी आहे. साखर, गूळ, दूग्धजन्य पदार्थांची समुद्रमार्गे वाहतूक आणि निर्यात करणेही यामुळे शक्य होणार आहे. कोल्हापूर ते वैभववाडी दरम्यान असलेल्या रेल्वे स्थानकांचाही विकास होणार आहे, त्यामुळे या रेल्वे स्थानकांच्या आसपास व्यापारपेठा वाढू शकतात. कोल्हापुरातील कृषी उत्पादनांसाठी हा रेल्वेमार्ग विकासाचे नवे दरवाजे उघडेल, असा विश्वास या क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केला.
उद्योग रुळावर
कोल्हापुरातील उद्योगांसाठी लागणारे कच्चे लोखंड, कोळसा, वाळू हे कोकणातून आणावे लागते, तर कोल्हापुरातून सिमेंट, स्टिल, उद्योगांसाठी आवश्यक असणारी यंत्रसामग्री कोकणात पाठवली जाते. समुद्रमार्गे येणाऱ्या वस्तू जयगड बंदरातून कोल्हापुरात येतात. कोल्हापूर ते वैभववाडी रेल्वे मार्गामुळे कोकण आणि कोल्हापुरातील उद्योगांना उर्जा मिळणार आहे. कोल्हापूरच्या औद्योगिक वसाहतींमधील यंत्रसामग्री रेल्वेने कोकणात पोहोचू शकते. कच्च्या मालाच्या वाहतुकीसाठी रेल्वे सोयीची ठरत असल्याने उद्योजकांच्या खर्चात बचत होणार आहे. याशिवाय नवीन रेल्वे मार्गावरही नव्याने लहान-मोठ्या औद्योगिक वसाहती तयार होऊ शकतात. यामुळे रोजगार निर्मिती होण्यासह दुर्गम परिसराचा विकास होणार आहे. गगनबावडा हे महत्त्वाचे रेल्वे स्टेशन असेल, त्यामुळे गगनबावडा परिसराचा विकास होण्याची संधी निर्माण झाली आहे. टेक्स्टाईल, ऑटोमोबाइल, साखर उद्योगासह भाजीपाला, दुधाची निर्यात वाढणार आहे.
पर्यटन बहरणार
कोल्हापूर हे कोकणचे प्रवेशद्वार मानले जाते, त्यामुळे महाराष्ट्रासह उत्तर भारतातून येणारे पर्यटक कोल्हापूरमार्गेच कोकणात जातात. सध्या कोकणात जाण्यासाठी आंबा, करूळ, भुईबावडा, फोंडा, आंबोली या घाटांचा वापर केला जातो. याला कोल्हापूर ते वैभववाडी हा रेल्वेचा पर्याय उपलब्ध होणार आहे. सह्याद्रीच्या डोंगररांगा, घनदाट जंगल, कोसळणारे धबधबे, खोल दऱ्या, ढग आणि धुक्याची दुलई यांनी नटलेला निसर्ग पाहण्याची संधी या मार्गावर मिळणार आहे. याशिवाय १०३ किलोमीटरच्या मार्गात २६ बोगदे आणि छोटे-मोठे १३० पूल आहेत. पर्यटकांसाठी या मार्गावरील प्रवास स्वप्नवत ठरणार असल्याने कोल्हापूर-कोकणातील पर्यटन वाढीलाही मोठा फायदा होणार आहे. कोकण रेल्वेप्रमाणे कोल्हापूर-वैभववाडी हा मार्गही आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरू शकतो.
प्रलंबित मागण्यांनाही मिळावी चालना
कोल्हापूर-कोकण रेल्वेने जोडण्याची मागणी गेल्या २० वर्षांपासून सुरू होती. अखेर या मागणीला मंजुरी मिळून त्याच्या कामालाही सुरुवात होत आहे. मात्र, कोल्हापूर-पुणे मार्गाचे दुहेरीकरण, विद्युतीकरण या मागण्याही अद्याप प्रलंबित आहेत. दोन वर्षांपूर्वीच कोल्हापूर-पुणे मार्गाच्या विद्युतीकरणाची घोषणा झाली. यासाठी ६१५ कोटी रुपयांची तरतूदही केली. मात्र, याला अपेक्षित गती मिळाली नाही. याशिवाय कोल्हापूर-मिरज मार्गावर एक उड्डाणपूल आणि एक भुयारी मार्गही मंजूर आहे. कराड-चिपळूण मार्गाचेही काम वेळेत पूर्ण झाल्यास कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात रेल्वेचे जाळे विस्तारणार आहे. ही प्रलंबित कामे वेळेत मार्गी लागल्यास रेल्वे प्रवास गतिमान आणि सोयीस्कर होऊ शकतो. कोल्हापूर-वैभववाडी मार्गासह कोल्हापूर-पुणे मार्गाचे विद्युतीकरण आणि दुहेरीकरणासाठी लोकप्रतिनिधींना पाठपुरावा करावा लागणार आहे.
कोल्हापूर व वैभववाडीसह १० स्टेशन
उड्डाणपूल ५
भुयारी मार्ग ४
छोटे पूल ८५
मोठे पूल ४५
बोगदे २६
सर्वांत मोठ्या लांबीचा बोगदा १७५० मीटर
.................
कोट
'वीस वर्षांपासून सुरू असलेल्या कोल्हापूरकरांच्या मागणीला अखेर मूर्त रूप मिळाले. वर्षापूर्वीच मंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते भूमीपूजन झाले होते. महिन्याभरात कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती खुद्द मंत्र्यांनीच दिल्याने स्वप्नवत मार्गाचे काम सुरू होत आहे. सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश येत असल्याने याचा विशेष आनंद आहे.
धनंजय महाडिक, खासदार
...........
कोट
' कोल्हापूर-कोकण जोडण्यासाठी २००९ पासून माझ्याकडून पाठपुरावा सुरू होता. अखेर या कामाला सुरुवात होत आहे. कोल्हापूरसह मराठवाडा, विदर्भ कोकणाला जोडणारा हा मार्ग असेल. यातून कोकणसह कोल्हापूरच्या विकासाची संधी उपलब्ध झाली आहे. या मार्गामुळे कोकण रेल्वेवरील ताण कमी होईल.
राजू शेट्टी, खासदार