५५०० उमेदवारांना नोकरीची संधी
विद्यापीठातील महारोजगार मेळाव्यास प्रतिसाद; १७ हजारांवर उमेदवारांनी दिली मुलाखत
म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
चेहऱ्यावर हलकासा तणाव, हातात प्रमाणपत्र असलेल्या फाइल्स, फॉर्मल कपड्यांच्या वेशभूषेसह मुलाखतीत काय प्रश्न विचारले जातील?, नोकरी कुठे मिळेल, पगार किती असेल? आपली निवड होईल का? अशा असंख्य प्रश्नांसह साडेनऊ हजारांहून अधिक रोजगार संधींसाठी सुमारे १७ हजार २६९ उमेदवारांनी मुलाखत दिली. यातील साडेपाच हजारांहून अधिक जणांना नोकरीची संधी मिळाली. शिवाजी विद्यापीठाच्या कौशल्य व उद्योजकता विकास केंद्र आणि मध्यवर्ती रोजगार कक्ष यांच्यातर्फे शनिवारी महारोजगार मेळाव्याचे आयोजन केले होते. विद्यापीठ परिसराला रोजगार मेळाव्याच्या निमित्ताने यात्रेचे स्वरूप आले होते.
माहिती तंत्रज्ञान, बी.पी.ओ., सेवा क्षेत्र, एच.आर., विपणन, विक्री, बँकिंग, फायनान्स विमा, अन्य वित्तीय संस्था, वस्त्रोद्योग, टेलिकॉम, अभियांत्रिकी, आदींसह रिक्रुटिंगच्या क्षेत्रांत काम करणाऱ्या सुमारे १२२ कंपन्यांनी विविध ९,५३९ पदांसाठी उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. काही कंपन्यांनी लेखी तसेच ऑनलाइन परीक्षाही घेतल्या. या पदांसाठी यापूर्वीच दहा हजारांहून अधिक उमेदवारांनी ऑनलाइन व ऑफलाइन नावनोंदणी केली होती. सकाळपासूनच विद्यापीठाच्या लोककला केंद्रात स्पॉट नोंदणीसाठी उमेदवारांच्या रांगा लागल्या होत्या. त्यासाठी विद्यापीठ प्रशासनाने ५० नोंदणी कक्ष सुरू केले होते. मेळाव्यासाठी एकूण २३ हजार ७६९ उमेदवारांनी नोंदणी केली. नोंदणी केलेल्या उमेदवारांना विविध कंपन्या व त्यांच्या मुलाखत कक्षाची माहिती पत्रकाद्वारे तसेच ठिकठिकाणी माहिती फलकांद्वारे उपलब्ध करून दिल्यामुळे त्यांना थेट मुलाखतीच्या ठिकाणी जाता आले. रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, इलेक्ट्रॉनिक्स, वनस्पतीशास्त्र, भूगोल, मानव्यविद्या इमारत, वि.स. खांडेकर भाषा भवन, गणित आणि तंत्रज्ञान अशा नऊ विविध अधिविभागांमध्ये विविध कंपन्यांसाठी क्षेत्रनिहाय मुलाखतींची व्यवस्था केल्यामुळे एकाच ठिकाणी गर्दी न होता रोजगार मेळाव्याची प्रक्रिया सुरळीत पार पडली. त्याचप्रमाणे लोककला केंद्रात ३० विविध संस्थांनी स्टॉल्स उभारून सुमारे ६५०० उमेदवारांना विविध ५० कौशल्यांचे मोफत प्रशिक्षण दिले.
कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या हस्ते रोजगार व कौशल्य महामेळाव्याचे फीत कापून उद्घाटन झाले. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक महेश काकडे, शैक्षणिक सल्लागार डॉ. डी. आर. मोरे, विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. आर. व्ही. गुरव, विद्यापीठाच्या कौशल्य व उद्योजकता विकास केंद्राचे समन्वयक डॉ. ए. एम. गुरव, अधिष्ठाता डॉ. पी. डी. राऊत, डॉ. पी. एस. पाटील, डॉ. भारती पाटील, मध्यवर्ती रोजगार कक्षाचे समन्वयक डॉ. गजानन राशिनकर यांच्यासह अधिसभा, व्यवस्थापन परिषद व विद्या परिषदेचे सन्माननीय सदस्य उपस्थित होते.
०००००
मुलींचा सहभाग लक्षणीय
मेळाव्यात सहभागी झालेल्या उमेदवारांमध्ये मुलींची संख्या लक्षणीय होती. ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने मुली मुलाखतीसाठी आल्या होत्या. मास्टर्स डिग्री ते डिप्लोमा अशी शैक्षणिक पात्रता असलेल्या तरुणींनी मेळाव्यामध्ये आत्मविश्वासाने मुलाखती दिल्या.
००००
चोख व्यवस्था
विद्यापीठाचा सुरक्षा विभाग तसेच कोल्हापूर जिल्हा पोलिस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवल्यामुळे तसेच पार्किंगची स्वतंत्र व्यवस्था केल्यामुळे वाहतूक समस्या उद्भवली नाही. अग्निशमन बंब व प्राथमिक आरोग्य सुविधांनी सुसज्ज अँम्ब्युलन्सचीही स्थानिक प्रशासनाच्या वतीने व्यवस्था केली होती. विद्यापीठाने उमेदवारांना पिण्याच्या पाण्याची ठिकठिकाणी व्यवस्था केली होती.
००००
कोट....
महारोजगार मेळाव्यात सहभागी झाल्याने नोकरीच्या संधी कुठे आहेत याची नेमकी माहिती मिळाली. अनेकदा शैक्षणिक पात्रता असूनही नोकऱ्या कुठे उपलब्ध आहेत याची माहिती तरुणांपर्यंत पोहोचत नाही, त्यामुळे नोकरीपासून वंचित राहावे लागते. मेळाव्यामुळे माहितीचा संग्रह उपलब्ध झाला.
श्रीकांत माळी, कलाशाखा विद्यार्थी
मुलाखत देताना थोडे दडपण होते. फ्रेशर असूनही कंपन्यांच्या प्रतिनिधींच्या सहकार्यामुळे मुलाखत चांगल्याप्रकारे पार पडली. विद्यापीठ प्रशासनाने वाहतूक व्यवस्था चांगल्या पद्धतीने केली होती. नोकरीसाठी मुलाखतीला जाताना नेमकी काय तयारी करावी, याची सखोल माहिती मिळाली.
प्राची कुलकर्णी, रसायनशास्त्र विद्यार्थिनी
ग्रामीण भागातून मुलाखतीसाठी येणाऱ्या मुलींमध्ये काही प्रमाणात गोंधळलेली अवस्था असते. अशावेळी पालक या नात्याने आम्ही त्यांच्यासोबत येण्यास प्राधान्य दिले. एवढ्या मोठ्या प्रमाणात नोकरीच्या संधी एकाच छताखाली मिळाल्याने त्याचा फायदा तरुणांना नक्कीच होईल.
अर्जुन घुले, पालक, मौजे सांगाव
महारोजगार मेळाव्यासाठी महिनाभर आधीपासून तयारी सुरू होती. चांगल्या दर्जाचे उमेदवार मुलाखतीत पाहायला मिळाले. आमच्याकडे आधीच उमेदवारांची माहिती उपलब्ध झाल्याने उमेदवार निवडणे सोपे झाले. चांगले संभाषण कौशल्य, संगणक ज्ञान आणि विषयाचे सखोल ज्ञान असल्यास नोकरी मिळवणे सहजसोपे आहे.
प्रवीण कुंभोजकर, कंपनी प्रतिनिधी
०००००००००००००००००००००