जि.प. लोगो
.......................
फोटो आहे.
जि. प. सभेत मान्यता, सर्वाधिक निधी बांधकाम विभागास
म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
जिल्हा वार्षिक नियोजन समितीमधून ग्रामिण भागातील विविध विकासकामे, मूलभूत सुविधा निर्माण करण्यासाठी मिळालेल्या १३२ कोटी ४९ लाख ४१ हजार रूपयांच्या आराखड्यास शुक्रवारी जिल्हा परिषद विशेष सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली. आराखड्यात सर्वाधिक निधी बांधकाम विभागावर खर्च करण्यात येणार आहे. दरम्यान, मार्च एंडिंगची वाट न पाहता आराखड्यातील सर्वच कामे त्वरित सुरू कराव्यात, अशी मागणी सर्वच सदस्यांनी केली. जिल्हा परिषद अध्यक्षा शौमिका महाडिक अध्यक्षस्थानी होत्या. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी प्रशासनाची बाजू सांभाळली.
जिल्हा परिषदेतील वेगवेगळ्या विभागाकडून नियोजन समितीमधून मिळणाऱ्या निधीतून विकासकामे करण्यात येणार आहे. त्या विकास आराखड्यास मंजुरी देण्यासाठी सभा आयोजित केली होती. आराखड्यातील अनेक कामांवर वादळी चर्चा झाली.
सदस्य शिवाजी मोरे म्हणाले, 'पुढील वर्षी मार्च महिन्याच्याआत लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागेल. त्यानंतर विकासकामे करण्यावर मर्यादा येतात. त्यामुळे आराखड्यातील कामे तातडीने सुरू करावीत.' विजय भोजे म्हणाले, पंचगंगा काठावरील गावांत सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्यासाठी जिल्हा नियोजन समितीमधून निधीची तरतूद करावी. त्यातून संबंधित ग्रामपंचायतींना प्रकल्प बांधण्याची सक्ती करण्यासंबंधीचा ठराव करावा. शिरोळ, हातकणंगले तालुक्यात सुमारे १८ हजार कॅन्सरग्रस्त रूग्ण सापडले आहेत. त्यांच्या उपचार विम्यासाठी ३० ते ४० लाख रूपये द्यावेत. त्यासंबंधीचे ठराव करावेत.'
जिल्हा नियोजन, क वर्ग पर्यटन, जन सुविधांमधून निधी वाटपात पक्षापतीपणा केल्याचा आरोप मनोज फराकटे, सतिश पाटील, पांडूरंग भांदिगरे यांनी केला. सत्ताधारी सदस्य आणि विरोधकांत २५ लाख निधींचा फरक असल्याचे फराकटे यांनी निदर्शनास आणले. ते म्हणाले, 'आम्ही विरोधात असलो तरी लोकप्रतिनिधी आहे. सभागृहात कोणीही स्वीकृत सदस्य नाहीत. त्यामुळे निधी वाटपात सत्ताधाऱ्यांनी विरोधकांनाही गृहीत धरावे. गृहीत धरणार नसाल तर आम्ही विरोधक मागे बसतो केवळ सत्ताधाऱ्यांनी सभागृह चालवावे.' त्यावर अध्यक्षा महाडिक यांनी विरोधी सदस्यांनाही निधी दिला आहे. तुमच्या बोरीवडे गावात १२ लाख दिल्याचे सांगितले. निधीतील पक्षपातीपणावर भांदिगरे यांनीही प्रश्न उपस्थित केला. त्यावर कोणत्याही सदस्यास २५ लाख रूपये दिले आहे, त्यांचे नाव सांगा अशी प्रतिप्रश्न भांदिगरे यांना महाडिक यांनी केली. त्यावर भांदिगरे यांनी सभागृहात नाव सांगण्यास नकार दिला. विरोधकांनाही निधी देताना झुकते माप द्यावे, अशी मागणी सतीश पाटील यांनी केले. अरूण इंगवले यांनी नाविन्यपूर्ण उपक्रमातून प्राथमिक शाळांभोवती संरक्षण भिंत बांधण्यासाठी निधीची तरतूद विकास आराखड्यात करावी, अशी मागणी केली.
यावेळी अशोक माने, राहुल आवाडे, डॉ. पद्माराणी पाटील, सचिन बल्लाळ, प्रसाद खोबरे यांची चर्चेत भाग घेतला. उपाध्यक्ष सर्जेराव पाटील, सभापती अंबरीश घाटगे, सर्जेराव पाटील - पेरीडकर, शुभांगी शिंदे, विशांत महापुरे यांच्यासह अधिकारी, सदस्य उपस्थित होते.
--------------------
चौकट
कोणत्या विभागास किती निधी ?
येत्या वर्षभरात विभागनिहाय खर्च होणारा निधी असा : अपारंपरिक ऊर्जा साधणे बसवणे : १ कोटी, पशुसंवर्धन : ३ कोटी ७२ लाख ४३ हजार, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा : ८० लाख १८ हजार, पाणी व स्वच्छता : २५ कोटी ३७ लाख ९० हजार, ग्रामपंचायत : १६ कोटी ३५ लाख ७४ हजार, लघु पाटबंधारे : १० कोटी ७४ लाख २६ हजार, बांधकाम : ३० कोटी ८५ लाख ९० हजार, प्राथमिक शिक्षण : ८ कोटी १८ लाख ११ हजार, एकात्मिक बाल विकास सेवा योजना : २ कोटी, आरोग्य : ६ कोटी ६७ लाख, ग्रामीण पाणी पुरवठा : २६ कोटी ५२ लाख, ८८ हजार, समाजकल्याण : २५ लाख.
---------------
चौकट
मराठा आरक्षणाचा ठराव
मराठा समाजास तत्काळ आरक्षण मिळावे, असा ठराव शिवाजी मोरे यांनी मांडला. तर लिंगायत समाजाला ओबीसीचे आरक्षण मिळावे, स्वतंत्र धर्माला मान्यता मिळावी, असा ठराव प्रसाद खोबरे यांनी मांडला. दोन्ही ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आले.
--------------------