आठवड्यात शहरात जबरी चोरीच्या दोन घटना घडल्या. शुक्रवारी (ता. २ फेब्रुवारी) दिवसाढवळ्या कावळा नाका परिसरात, राजेश मोटर्ससमोर दोघांनी कोयत्याचा धाक दाखवून एका इस्टेट एजंटाकडील १७ लाखांची रोकड लुटली. तर बुधवारी (ता. ७ फेब्रुवारी) भल्या पहाटे, सहा वाजता पाच लुटारुंनी गुजरी परिसरात मुंबईच्या सराफाकडून ३४ लाखांचे दागिने लुटून पोबारा केला. अशा स्वरुपाच्या लुटालुटीच्या प्रकारांसह पोलिसांदेखत टोळक्यांची हुल्लडबाजी, सावकारांचा जाच आणि पोलिसांनाच दमदाटी करण्याचे प्रकारही वाढले आहेत. त्यामुळे शहराच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
दोन महिन्यांपूर्वी लक्ष्मीपुरीत रिलायन्स मॉलच्यासमोर चोरट्यांनी एका कंपनीच्या कर्मचाऱ्याकडील सुमारे सात लाखांची रक्कम लुटून पोबारा केला. या घटनेतील चोरटे अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. तर महिन्यापूर्वी राजारामपुरीत महिलेच्या मोपेडच्या डिकीतील १५ तोळ्यांचे सोन्याचे दागिने अज्ञातांनी लंपास केले. पंधरा दिवसांपूर्वी लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याच्या पाठीमागेच एका व्यापाऱ्याची दुचाकीच्या हँडलला लावलेली पावणेदोन लाखांची रोकड असलेली बॅग चोरट्याने काही क्षणात लांबवली.
गेल्या आठवडाभरात, २ फेब्रुवारीला चौघांनी एका इस्टेट एजंटावर चटणीपूड फेकून १७ लाखांची रक्कम लुटली. या घटनेत संबंधित इस्टेट एजंट जखमी झाले. ही घटना ताजी असताना अवघ्या सहाव्या दिवशी गुजरी परिसरात जबरी चोरीचा प्रकार घडला. बुधवारी पहाटे पाच लुटारुंनी मुंबईचे सराफ कांतीलाल मेहता यांना मारहाण करून लुटले. लुटारुंनी तब्बल एक किलोचे, ३४ लाख रुपयांचे दागिने घेऊन कारमधून पळ काढला. या घटनांनी शहरातील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्नाण केले आहे.
पोलिसही असुरक्षित
अशा घटनांतून सामान्य नागरिकांच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण होत असताना पोलिसही सुरक्षित नसल्याचे चित्र शहरात दिसत आहे. पंधरा दिवसांपूर्वी रात्री उशिरा मध्यवर्ती बसस्थानक परिसरात राजेंद्रनगरातील एका टोळक्याने बंदोबस्तावरील पोलिसांनाच घेरले होते. त्यावेळी पोलिसही टोळक्याच्या दहशतीखाली होते. रविवारी (ता. ४) झालेल्या फुटबॉल सामन्यानंतर पोलिसांसमोरच दोन्ही संघांचे समर्थक भिडले. तरुणांच्या हुल्लडबाजीने फुटबॉल स्पर्धांवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याने पोलिसांनी वेळीच ठोस भूमिका घेऊन हुल्लडबाजांवर कडक कारवाई करणे गरजेचे आहे. अन्यथा टवाळखोर, फाळकूटदादा, खासगी सावकार सर्वसामान्य नागरिकांना शांततेत जगू देणार नाहीत.
तारिख घटना ठिकाण
४ डिसेंबर २०१७ ७ लाखांची रक्कम लंपास रिलायन्स मॉलसमोर लक्ष्मीपुरी
२५ जानेवारी २०१७ मोपेडमधून १५ तोळ्यांचे दागिने लंपास राजारामपुरी
१५ जानेवारी दुचाकीच्या हँडलची पावणेदोन लाखांची बॅग लांबवली लक्ष्मीपुरी
२ फेब्रुवारी एजंटला मारहाण करून १७ लाख लुटले राजेश मोटर्ससमोर, कावळा नाका
३ फेब्रुवारी बांधकाम व्यावसायिकाला धमकावले देवकर पाणंद
७ फेब्रुवारी सराफाचे ३४ लाखांचे दागिने लुटले गुजरी कॉर्नर ते रंकाळा रोड
लुटीनंतर फसली नाकाबंदी
बुधवारी गुजरी परिसरात झालेल्या लुटीनंतर पोलिसांनी नाकाबंदी केली. मात्र, चोरटे त्याआधीच शहराबाहेर पडल्याचे सीसीटीव्ही फुटेजवरून स्पष्ट झाले. विशेष म्हणजे नाकाबंदी संपल्यानंतर संशयित चोरट्यांची कार पुन्हा शहरातूनच कावळा नाकामार्गे पुणे-बेंगळुरू महामार्गाकडे गेली. संशयित कार शहराबाहेर गेल्याचे लक्षात येताच त्या मार्गावरील नाकाबंदी का वाढवली नाही? शहरात येणाऱ्या वाहनांची तपासणी दिवसभर का सुरू ठेवली नाही? असे प्रश्न उपस्थित झाले आहेत.
असुरक्षित सोनेवाहतूक
कोल्हापुरात सोन्या-चांदीची उलाढाल मोठी आहे. हुपरीत रोजच चांदीचे कोट्यवधी रुपयांचे व्यवहार होतात. सोने, चांदी घेऊन जाणाऱ्या सराफांवर अनेकदा हल्ले होतात. मोठा ऐवज लुटला जातो, तरीही सोने आणि चांदीच्या सुरक्षित वाहतुकीबद्दल सराफ असोसिएशन दक्षता का घेत नाही असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
'बँक आणि एटीएम सेंटर्ससाठी पैसे पाठवणाऱ्या कंपन्या ज्याप्रमाणे शस्त्रसज्ज सुरक्षारक्षकासह पैशांची ने-आण करतात, त्याप्रमाणे पुरेशा संरक्षणात मौल्यवान दागिन्यांची वाहतूक करणे गरजेचे आहे. याबाबत सराफ असोसिएशनशी चर्चा करण्याची सूचना पोलिस अधिकाऱ्यांना केली आहे.
- संजय मोहिते, पोलिस अधीक्षक
सावकारांची दहशत कायम
शहरात खासगी सावकारांकडून नागरिकांची लूट सुरू आहे. पाच दिवसांपूर्वीच लक्षतीर्थ वसाहत परिसरातील एका खासगी सावकाराने बांधकाम व्यावसायिकाला पिस्तुलाचा धाक दाखवून दोन फ्लॅटची मागणी केली होती. याच खासगी सावकाराने दमदाटी करून काही फ्लॅट बळकावले आहेत. राजकीय लागेबांधे आणि काही पोलिसांशी हातमिळवणी केल्याने त्याची दुकानदारी वाढली आहे. गुन्हा दाखल होऊनही पोलिसांकडून अटक होत नसल्याने त्याची दहशत वाढली आहे. अशी अनेक प्रकरणे पोलिस ठाण्यांपर्यंत पोहोचतही नाहीत हे वास्तव आहे.
गस्तीचे पोलिस गायब
प्रत्येक पोलिस ठाण्यात गस्ती पथक आहे. शिवाय शहर पोलिस उपअधीक्षकांचेही स्वतंत्र पथक शहरात गस्त घातले, असे सांगितले जाते. सात महिन्यांपूर्वी शहरात पोलिसांनी सायकल गस्तीचा प्रयोग केला. मात्र काही दिवसांतच ही सायकल गस्त थांबली. बंदोबस्ताशिवाय पोलिस रस्त्यावर फिरताना दिसत नाहीत. टोळक्यांना पोलिसांचा धाक उरलेला नाही. यातच स्थानिक लोकप्रतिनिधींकडून मदत मिळत असल्याने हुल्लडबाज, फाळकूटदादांचे फावले आहे. याला आळा घालण्यासाठी पोलिसांना ठोस भूमिका घ्यावी लागेल.
वाढलेल्या लूटमारीच्या घटना रोखण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत. मोठ्या रकमांचा व्यवहार ऑनलाइन करणे बंधनकारक आहे. तरीही काही लोक कोणत्याही सुरक्षेविना मोठ्या रकमा सोबत बाळगतात. मौल्यवान वस्तूंबाबतही अशी दक्षता घेणे गरजेचे आहे.
- डॉ. प्रशांत अमृतकर, शहर पोलिस उपअधीक्षक
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट