म. टा. वृत्तसेवा, पंढरपूर
पंढरीच्या विठुरायाच्या मंदिराला मूळ रूपात आणण्यासाठी पुरातत्त्व विभागाने कामाला सुरुवात केली आहे. पुरातत्त्व विभागाचा विज्ञान विभागाने या कामाला सुरुवात केली असून, हेमाडपंथी असलेल्या मंदिरातील दगडांना त्याच्या मूळ रूपात आणण्यात येणार आहे. विठुरायाचे मंदिर अकराव्या शतकात किंवा त्यापूर्वी बांधण्यात आल्याचे इतिहासात दाखले सापडतात. काही पुराणातील दाखल्यानुसार आणि शिलालेखाच्या अभ्यासामध्ये मंदिर अकराव्या शतकाच्या आसपास बांधण्यात आले. पुढील काळात या मंदिराचा विस्तार होत गेला. मात्र, मूळ मंदिर गाभारा, चौखांबी आणि सोळखांबी इतकेच असल्याचे सांगण्यात येते. या हजार वर्षांत अनेक राज्यकर्त्यांच्या काळात मंदिरात विविध प्रकारच्या सुधारणा घडविण्यात आल्या. अलीकडच्या काळात मात्र मंदिर सजावट आणि सुशोभीकरणाच्या नावाखाली मूळ दगडी असलेल्या मंदिराला विविध प्रकारचे रंग आणि इतर रसायनयुक्त रंग देण्यात आले. कालांतराने त्यावरच दुसरे रंग लावण्यात येत होते. यावरच अनेक वर्षे घाण आणि धुळीचे थर चढत गेले. अनेक ठिकाणी दिवे लावल्याने काजळी चढली होती, तर काही ठिकाणी तेलकट थर चढल्याने मंदिराचे मूळरूप फार पूर्वीच लुप्त होऊन गेले होते.
मंदिर समितीवर थोड्या काळासाठी आलेले तत्कालीन जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी हा विषय तडीस लावत पुरातत्व विभागाशी संपर्क साधून मंदिराला मूळरूपात आणण्याचे काम पुरातत्व विभागाकडे सोपविले होते. आता प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे.
असे सुरू आहे काम
मंदिर समितीच्या मागणीनुसार पुरातत्त्व विभागाने त्यांच्या विज्ञान विभागातील रसायन तज्ज्ञ अनिल पाटील यांच्याकडे काम सोपविले आहे. पाटील यांनी त्यांच्या सोबत दहा-बारा तज्ज्ञ कारागीर घेऊन मंदिरातील विठ्ठल सभामंडपापासून कामाला सुरुवात केली आहे. सभामंडपातील दगडी भिंती, दीपमाळेवरील घाण, रंग आणि इतर थर त्यांच्या जवळील विविध रसायनाचा वापर करून स्वच्छ करण्यास सुरुवात केली आहे. सुरुवातीला दगडांवरील घाणीच्या थरानुसार संबंधित रसायनाचा ब्रशच्या साहाय्याने लेप देऊन नंतर साफ करायच्या हार्ड ब्रशच्या साहाय्याने त्याला घासण्यात येते. प्रत्येक दगड काळजीपूर्वक घासून त्याला त्याच्या मूळ रूपात आणण्यात येत आहे. मंदिराच्या बाहेरील भिंती, नामदेव पायरी, सभामंडप, सोळखांबी, चौखांबी यासह मंदिरातील सर्व दगडी बांधकामे या पद्धतीने साफ केली जाणार आहेत.
चार महिन्यात होणार काम
मंदिराच्या गाभाऱ्याचे काम करण्याबाबचा निर्णय अद्याप निर्णय मंदिर समितीने घेतला नाही. वास्तविक पुरातत्व विभागानेच विठ्ठल मूर्तीच्या संवर्धनासाठी गाभाऱ्यात भिंतीला बसविलेले मार्बल फारशा आणि गाभाऱ्यातील प्रखर दिवे हटविण्याच्या सूचना दिल्या होत्या. सध्या तरी मंदिरातील संपूर्ण दगडी भिंती, पुरातन दगडी नक्षीदार खांब, दगडी नक्षीकाम याला मूळ रूप देण्याचे काम केले जाणार आहे. या कामाला अंदाजे चार महिन्याचा अवधी लागणार असून, यासाठी जवळपास ३३ लाखांचा खर्च होणार आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट